शिक्षणानंतर खान सर आता बिहारला देणार ‘या’ आरोग्य सुविधा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 d ago
पटनाचे प्रसिद्ध शिक्षक आणि युट्यूबर खान सर
पटनाचे प्रसिद्ध शिक्षक आणि युट्यूबर खान सर

 

अभिषेक कुमार सिंह, पटना/वाराणसी

पटनाचे प्रसिद्ध शिक्षक आणि युट्यूबर खान सर आतापर्यंत त्यांच्या खास शिकवण्याच्या पद्धतीसाठी आणि गरीब विद्यार्थ्यांना कमी फीमध्ये शिक्षण देण्यासाठी ओळखले जात होते. आता त्यांनी एक नवी वाट धरली आहे. शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवल्यानंतर, आता ते वैद्यकीय क्षेत्रात क्रांती करण्यासाठी उतरले आहेत.

त्यांचा उद्देश आहे की, बिहारमधील प्रत्येक जिल्ह्यातील लोकांना स्वस्त, सोपी आणि आधुनिक आरोग्य सेवा मिळावी. जेणेकरून उपचारासाठी त्यांना दुसऱ्या शहरात जावे लागू नये किंवा जास्त खर्च करावा लागू नये.

विद्यार्थ्यांच्या फीमधून देणार आरोग्य सेवा
खान सर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ते बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिस सेंटर, ब्लड बँक, डायग्नोस्टिक सेंटर आणि एक जागतिक दर्जाचे रुग्णालय सुरू करणार आहेत. विशेष म्हणजे, ते हे सर्व कोणत्याही सरकारी मदतीशिवाय, फक्त त्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीमधून करणार आहेत. ही फी केवळ शिक्षणाचे शुल्क नाही, तर त्यातून समाजाला काहीतरी परत देण्याची एक जबाबदारीही आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

खान सर यांनी सांगितले की, किडनी खराब झालेल्या रुग्णांसाठी डायलिसिस हा एक मोठा खर्च असतो. एकदा डायलिसिस करण्यासाठी सुमारे ४,००० रुपये लागतात आणि एका महिन्यात हा खर्च ५०,००० रुपयांपर्यंत पोहोचतो. हे गरीब कुटुंबांसाठी खूप कठीण आहे. 

हे लक्षात घेऊन, त्यांनी बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिस सेंटर उघडण्याचा निर्णय घेतला आहे. येथे आधुनिक मशीन्सद्वारे खूप कमी पैशांत ही सुविधा दिली जाईल. पहिल्या टप्प्यात १० डायलिसिस मशीन्स आधीच आल्या आहेत आणि त्यांचे काम सुरू झाले आहे. या मशीन्स जर्मनी आणि जपानमधून मागवण्यात आल्या आहेत.

प्रत्येक सणाला नव्या आरोग्य सेवेची भेट
खान सर यांची योजना फक्त इथपर्यंत मर्यादित नाही. त्यांनी सांगितले आहे की, प्रत्येक सणाला बिहारच्या जनतेला एक नवीन आरोग्य सेवेची भेट मिळेल. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ते एक ब्लड बँक सुरू करतील, ज्यात जपानहून आणलेले आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान असेल. या ब्लड बँकमुळे गरजू लोकांना लगेच रक्त मिळेल. रक्ताच्या कमतरतेमुळे कोणाचाही जीव जाणार नाही, असा त्यांचा उद्देश आहे.

दिवाळीच्या वेळी ते बिहारला एक जागतिक दर्जाचे रुग्णालय देणार आहेत. या रुग्णालयात सरकारी दरात उपचार होतील, पण सुविधा मात्र मोठ्या खासगी रुग्णालयांसारख्या असतील. सर्वात खास गोष्ट म्हणजे, या रुग्णालयात काम करणारे डॉक्टर तेच असतील, जे कधीकाळी खान सर यांच्या कोचिंगमध्ये शिकले आहेत.

छठ पूजेच्या वेळी ते एक आधुनिक डायग्नोस्टिक सेंटर सुरू करतील. यात सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या उपलब्ध असतील. येथील मशीन्सही जपान, जर्मनी आणि अमेरिकेतून मागवल्या जात आहेत. या सर्व कामांसाठी खान सर यांनी आरा येथील कोइलवर मौजामध्ये ९९ गुंठे जमीन विकत घेतली आहे. येथेच या सर्व वैद्यकीय सुविधांची पायाभरणी केली जाईल. कोणत्याही प्रसिद्धीशिवाय त्यांनी रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन ३० मिनिटांत जमिनीची नोंदणी केली. त्यांची साधेपणाची ही गोष्ट दिसून येते.

'शिक्षण आणि सेवा' यांचा साधणार संगम 
खान सर यांची ही कल्पना त्यांच्या शिवभक्त असल्याचाही परिचय देते. सावनच्या शेवटच्या सोमवारी कपाळावर टिळा लावून त्यांनी या संकल्पाची घोषणा केली. ते म्हणाले, "शिक्षणामुळे बदल शक्य आहे, तर सेवेने का नाही?"

बिहारसारख्या राज्यात, जिथे अजूनही ग्रामीण भागात आरोग्य सेवा कमी आहेत, खान सर यांचा हा प्रयत्न एका चांगल्या भविष्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. त्यांनी शिक्षणाला एक माध्यम बनवून तरुणांना आत्मनिर्भर केले. आता ते आरोग्याला एक सेवेचे माध्यम बनवत आहेत. हे केवळ बिहारसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी एक प्रेरणादायी उदाहरण बनू शकते.

खान सर यांचा हा संकल्प फक्त एका व्यक्तीचा विचार नाही, तर समाजाचा आरसा आहे. यात असे दिसते की, शिक्षक फक्त शिकवण्यापुरते मर्यादित राहत नाहीत, तर गरज पडल्यास समाजाच्या सर्वात मोठ्या गरजांची जबाबदारीही आपल्या खांद्यावर घेतात. शिक्षण ते सेवा असा हा प्रवास आहे. यामुळे येणाऱ्या काळात लाखो लोकांचे आयुष्य बदलेल.

खान सर यांनी हे सिद्ध केले आहे की, जर तुमचे इरादे चांगले असतील आणि विचार स्पष्ट असतील, तर सरकारी मदतीची किंवा कोणत्याही मोठ्या व्यासपीठाची गरज नसते – एक शिक्षकही समाजात क्रांती घडवू शकतो.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter