नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमींसोबत काम करण्यासाठी मनोज बाजपेयी उत्सुक; मासूमच्या सीक्वलमध्ये दिसणार एकत्र

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
अभिनेता मनोज बाजपेयी
अभिनेता मनोज बाजपेयी

 

प्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयी याने दिग्दर्शक शेखर कपूर यांचे आभार मानले आहेत. 'बँडिट क्वीन' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शेखर कपूर यांनी कॅमेऱ्यासमोर अभिनय करण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा धडा शिकवला होता, असे मनोजने सांगितले. मात्र, या चित्रपटाने इंडस्ट्रीत त्याच्यासाठी तात्काळ नवीन संधींचे दरवाजे उघडले नाहीत, अशी कबुलीही त्याने दिली. 

शेखर कपूर यांच्या 'मासूम: द नेक्स्ट जनरेशन' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या निमित्ताने मनोज बाजपेयी पुन्हा एकदा या दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करणार आहे. दरोडेखोर ते राजकारणी बनलेल्या फूलन देवी यांच्या जीवनावर आधारित १९९४ मधील 'बँडिट क्वीन' या चरित्रपटात मनोजने मान सिंग ही छोटी भूमिका साकारून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.

"बँडिट क्वीन या चित्रपटाने माझ्या करिअरसाठी फारशी चमक दाखवली नाही, पण इतर कलाकारांच्या करिअरसाठी मात्र नक्कीच चमत्कार केला. मला राम गोपाल वर्मा यांचा चित्रपट (सत्या) साधारण साडेचार ते पाच वर्षांनंतर मिळाला. या प्रवासाला मोठा वेळ लागला कारण माझे पात्र खूप शांत होते आणि त्या काळात चित्रपटसृष्टी, निर्माते आणि प्रेक्षकांना शांत किंवा मूक अभिनय फारसा समजत नव्हता," असे बाजपेयी यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले. 

शेखर कपूर यांनी दिलेला सल्ला मनोज बाजपेयींना आजही तंतोतंत आठवतो, ज्यामध्ये त्यांनी कॅमेऱ्याऐवजी केवळ अभिनयावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते आणि हा सल्ला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत पाठीशी राहिला.

कॅमेरा विसरा आणि अभिनयावर लक्ष केंद्रित करा
शेखर कपूर यांच्या त्या सल्ल्याबद्दल बोलताना मनोज म्हणाला की, "ते मला म्हणाले होते की तिथे कॅमेरा आहे असा विचारच करू नकोस, फक्त तुझा अभिनय कर. त्यानंतर मी कधीही कॅमेऱ्याची परवा केली नाही. मी फक्त माझ्या अभिनयाची काळजी घेतली आणि त्या दृश्यामध्ये मला नेमके काय करायचे आहे यावरच लक्ष केंद्रित केले." राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेता असलेल्या मनोज बाजपेयी यांनी 'मासूम: द नेक्स्ट जनरेशन' या चित्रपटात दिग्गज कलाकार नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी यांच्यासोबत काम करण्याबद्दल प्रचंड आनंद व्यक्त केला आहे.

हे काम अतिशय उत्साहवर्धक असणार असल्याचे सांगत तो म्हणाला की, जेव्हा तुम्ही अतिशय उत्कृष्ट कलाकारांसोबत काम करत असता, तेव्हा तुमचा अभिनय अधिक बहरणार असतो आणि तुम्हाला अतिरिक्त मेहनत करावी लागते हे माहीत असते. अशा वेळी तुम्ही कोणताही क्षण गृहीत धरू शकत नाही. माझ्यासाठी शेखर कपूर यांच्यासोबत पुन्हा काम करण्याचा उत्साह खूप मोठा असून या चित्रपटाच्या स्क्रिप्ट रीडिंगसाठी ते कधी बोलावतात याची मी वाट पाहत आहे, असे मनोजने स्पष्ट केले.

अनुराग कश्यपसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा
मनोज बाजपेयी यांनी आपला जुना सहकारी आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यासोबत पुन्हा एकदा एकत्र काम करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली असून त्याला 'एक उत्तम विचारवंत आणि बंडखोर' असे म्हटले आहे. कश्यपने मनोज बाजपेयी यांच्या 'सत्या', 'शूल' आणि 'कौन' यांसारख्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांसाठी लेखक म्हणून काम केले होते. त्यानंतर त्याने 'गँग्स ऑफ वासेपूर' या दोन भागांच्या क्राईम ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन केले, ज्यामध्ये मनोजने साकारलेली सरदार खान ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.

बंडखोर लोकांसोबत काम करायला आवडते कारण ते समाजाच्या चालू पद्धतीवर खूश नसतात, असे सांगत मनोज म्हणाला की त्यांच्या या बंडखोरीमुळे केवळ कथेलाच नाही तर तुमच्या अभिनयालाही एक नवी धार मिळते. अनुरागला मी तो २१ ते २२ वर्षांचा असल्यापासून ओळखतो आणि तो नेहमीच एक उत्साही तरुण राहिला आहे. आता त्याचे वय झाले असले तरी तो काहीतरी पथदर्शक करण्यासाठी सज्ज आहे. जे लोक स्वभावाने अस्वस्थ आणि बंडखोर असतात, ते काही काळासाठी शांत बसू शकतात पण त्यांच्यात तुम्हाला धक्का देण्याची आणि आश्चर्यचकित करण्याची क्षमता नेहमीच असते, असे कौतुक मनोजने केले.

मनोज बाजपेयी सध्या त्यांच्या 'गव्हर्नर: द सायलेंट सेव्हियर' या चित्रपटाच्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत, जो खऱ्या घटनांवर आधारित असून १९९० च्या दशकातील आर्थिक संकटावर प्रकाश टाकतो. चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.