बॉलिवूड अभिनेता बाबील खान आता मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या 'गांधी बाजार संडे मार्केट' (Gandhi Bazar Sunday Market) या पहिल्यावहिल्या मल्याळम चित्रपटाच्या शूटिंगला सिलिगुडीमध्ये सुरुवात झाली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन बाबू जनार्दनन करत असून, यामध्ये बाबीलसोबत अपर्णा बालमुरली, दीपक परंबोल, निखिल नायर, जॉनी अँटनी, जगदीश, सुधीर करमना, उन्नी राजा, अथमिया आणि जयशंकर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
'मल्याळम सिनेसृष्टीत पाऊल ठेवणे ही एक नवी सुरुवात'
या नवीन प्रवासाबद्दल बोलताना बाबील म्हणाला, "मल्याळम चित्रपटांच्या प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि भावनिक खोलीमुळे या सिनेसृष्टीने माझ्या हृदयात नेहमीच एक खास जागा निर्माण केली आहे. एक अभिनेता म्हणून, नवीन जगात आणि नवीन लोकांसोबत काम केल्यानेच प्रगती होते, यावर माझा ठाम विश्वास आहे. सिलिगुडीमध्ये 'गांधी बाजार संडे मार्केट'चे शूटिंग सुरू करणे माझ्यासाठी खूप भावनिक आणि नाविन्यपूर्ण आहे."
बाबू सरांसोबत आणि दिग्गज कलाकारांसोबत काम करणे हा एक उत्तम अनुभव असेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. तो पुढे म्हणाला की, "मला नेहमीच अशा कथांचा भाग व्हायचे होते ज्यांचा दीर्घकाळ प्रभाव राहील आणि जे मला केवळ एक अभिनेता म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही घडवतील. हा चित्रपट मला नेमकी तीच संधी देत आहे. मल्याळम सिनेसृष्टीत पाऊल ठेवणे हा माझ्या करिअरमधील केवळ एक नवीन अध्याय नाही, तर तो एक असा प्रवास आहे ज्याची सुरुवात करताना मला कृतज्ञता वाटत आहे."
बाबील खानचा अभिनयाचा प्रवास
दिवंगत ज्येष्ठ अभिनेता इरफान खान यांचा मुलगा असलेल्या बाबीलने २०२२ मध्ये नेटफ्लिक्सवरील 'कला' (Qala) या चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. १९८४ च्या भोपाळ वायू दुर्घटनेवर आधारित 'द रेल्वे मेन' या वेब सीरिजमधील त्याच्या भूमिकेचेही प्रेक्षकांकडून मोठे कौतुक झाले होते. नुकताच तो २०२५ मध्ये झी फाईव्हवर (ZEE5) प्रदर्शित झालेल्या 'लॉगआउट' या सायबर-थ्रिलर चित्रपटात निमिषा नायरसोबत झळकला होता.