भारतीय सिनेसृष्टीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर अखेर चित्रपट साकारला जाणार आहे. आता प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आमिर खान आणि संवेदनशील चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी ही जबाबदारी उचलली आहे, मात्र या महत्त्वपूर्ण बायोपिकच्या वाटचालीत एक काळेकुट्ट वास्तवही दडलेलं आहे - अनेक निर्मात्यांनी केवळ 'मसाला' नसल्यामुळे हा प्रकल्प नाकारला होता.
फाळकेंचे नातू चंद्रशेखर श्रीकृष्ण पुसाळकर यांनी उघड केले की लेखक हिंदुकुश भारद्वाज आणि त्यांचे पुत्र अविष्कार यांनी चार वर्षांच्या तपशीलवार संशोधनानंतर ही पटकथा लिहिली, परंतु जेव्हा निर्मात्यांकडे हे कथानक घेऊन गेले, तेव्हा अनेकांनी "या कथेत कमर्शियल घटक नाही" असं म्हणत पाठ फिरवली होती, पण तेव्हाच राजकुमार हिराणी यांनी पुढाकार घेत, "हा केवळ व्यवसायासाठी नाही, तर देशाच्या सिनेसंस्कृतीचा आदर म्हणून आम्ही हा चित्रपट बनवणार आहोत", असं ठामपणे सांगितलं.
आमिर खानदेखील फाळकेंच्या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेत आहे. चित्रपटात फाळकेंच्या बालपणापासून ते 'राजा हरिश्चंद्र' निर्मितीपर्यंतचा प्रवास आणि त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांचे मोलाचे योगदानही दाखवले जाणार आहे. त्यांनी आपले दागिने विकून फाळकेंना लंडनला पाठवले. चित्रीकरणाच्या वेळी रिफ्लेक्टर सांभाळले आणि संपादनातही सहभाग घेतला. या सगळ्या गोष्टी सिनेमातून समोर येणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जानेवारी २०२६ मध्ये सुरुवात होणार आहे.