मुंबई
शाहरुख खानला बॉलिवूडचा 'बादशाह' उगाच म्हणत नाहीत, हे त्याने आपल्या वागण्यातून परत सिद्ध करून दाखवलंय. सिनेमाच्या पडद्यावरचा हा 'हिरो' खऱ्या आयुष्यातही मोठ्या मनाचा माणूस आहे, याचा अनुभव नुकताच सगळ्या महाराष्ट्राने घेतला. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. पण हा सिनेमा आज तुमच्या-आमच्यापर्यंत पोहोचण्यामागे शाहरुख खानचा खूप मोठा वाटा आहे. स्वतः प्रवीण तरडेंनीच नुकताच यामागचा भावूक किस्सा सांगितला.
संकटाचा काळ आणि रखडवलेलं काम
प्रवीण तरडे त्यांच्या रांगड्या आणि मातीशी जोडलेल्या दमदार सिनेमांसाठी ओळखले जातात. 'देऊळ बंद'च्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर प्रेक्षक 'देऊळ बंद २' ची आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमाचं शूटिंग तर पूर्ण झालं होतं, पण खरा अडथळा आला तो पोस्ट-प्रॉडक्शनच्याकामात. कारण सिनेमाचं बजेट पूर्णपणे संपून गेलं होतं. या सिनेमाच्या व्हीएफएक्स आणि डीसीपीचं काम शाहरुख खानच्या मालकीच्या 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' या भारतातल्या सर्वात नावाजलेल्या आणि सुसज्ज स्टुडिओमध्ये सुरू होतं. काम तर पूर्ण झालं होतं, पण निर्मात्यांकडे पैसेच उरले नसल्याने 'रेड चिलीज'चं तब्बल ४२ लाख रुपये देणं बाकी होतं. नियमाप्रमाणे हे बिल भरल्याशिवाय सिनेमा थिएटरमध्ये पाठवणं शक्यच नव्हतं. सिनेमा रिलीज व्हायची तारीख जवळ येत होती, पैशांची काहीच जुळवाजुळव होत नव्हती आणि सगळी टीम मोठ्या टेन्शनमध्ये अडकली होती. हा सिनेमा आता डब्यातच जातोय काय, अशी भीती सगळ्यांना वाटू लागली होती.
किंग खानची मोठी मदत
ही अडचण शाहरुख खानच्या कानावर पडली आणि त्याने क्षणाचाही उशीर न लावता असा काही निर्णय घेतला की सगळ्या मराठी चित्रपटसृष्टीची मनं जिंकून घेतली. पैशांअभावी कोणत्याही चांगल्या सिनेमाचं काम आणि रिलीज थांबायला नको, असे स्पष्ट आदेश शाहरुखने आपल्या 'रेड चिलीज'च्या टीमला दिले. त्याने मोठेपणा दाखवून 'देऊळ बंद २' चं तब्बल ४२ लाख रुपयांचं थकीत बिल झटक्यात माफ करून टाकलं! शाहरुखच्या या निर्णयामुळे सिनेमाच्या मार्गातला सर्वात अडथळा दूर झाला आणि 'देऊळ बंद २' ठरलेल्या वेळेत एकदम दिमाखात रिलीज झाला. प्रादेशिक सिनेमासाठी बॉलिवूडच्या सुपरस्टारने कसलीही व्यावसायिक अपेक्षा न ठेवता दाखवलेला हा मोठेपणा खरंच खूप दुर्मिळ आहे.
बॉक्स ऑफिसवर ८० कोटींची कमाई आणि तरडेंची कृतज्ञता
शाहरुखच्या या मदतीचं खऱ्या अर्थाने चीज झालं, असंच म्हणावं लागेल. रिलीज झाल्यानंतर 'देऊळ बंद २' ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. प्रेक्षकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं आणि बघता बघता या सिनेमाने तब्बल ८० कोटी रुपयांची कमाई केली. आज हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतल्या सर्वात यशस्वी सिनेमांमध्ये गणला जातो. मुलाखतीत हा प्रसंग सांगताना प्रवीण तरडे खूपच भावूक झाले होते. त्यांनी हात जोडून शाहरुख खानचे मनापासून आभार मानले. "त्यावेळी शाहरुख खानने ती ४२ लाखांची मदत केली नसती आणि आमचं बिल माफ केलं नसतं, तर हा सिनेमा कदाचित कधीच रिलीज झाला नसता," असं ते म्हणाले. "शाहरुखच्या या मदतीमुळेच आज आम्ही हे ८० कोटींचं मोठं यश बघू शकतोय." प्रवीण तरडेंच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावरही शाहरुख खानच्या या मोठेपणाचं खूप कौतुक होतंय.
पैसा आणि व्यावसायिक गणितांच्या पलीकडे जाऊन कला आणि माणुसकीचा विचार झाल्यावरच खऱ्या अर्थाने मोठे सिनेमे आणि मोठे कलाकार घडतात. शाहरुख खानने 'देऊळ बंद २' ला केलेली ही मदत दाखवून देते की, शाहरूख खान हा फक्त बॉक्स ऑफिसचाच नाही, तर खऱ्या आयुष्यातही मनाचा 'बादशाह' आहे.