'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये गुगलने ५ वर्षांच्या कालावधीत १५ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा भाग म्हणून नवीन सबसी केबल्सद्वारे भारताला अमेरिकेशी जोडण्याची घोषणा केली आहे. कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार, 'अमेरिका-इंडिया कनेक्ट' नावाच्या त्यांच्या सहयोगी पायाभूत सुविधा उपक्रमाद्वारे विशाखापट्टणम येथे नवीन आंतरराष्ट्रीय सबसी गेटवे स्थापित केला जाईल.
याशिवाय भारताला सिंगापूर, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाशी जोडणारे ३ नवीन सबसी मार्ग आणि ४ धोरणात्मक फायबर-ऑप्टिक मार्ग देखील तयार केले जातील, असे कंपनीने नमूद केले.
नवी दिल्लीतील 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये बोलताना गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई म्हणाले, हा उपक्रम भारत, अमेरिका आणि दक्षिण गोलार्धातील अनेक ठिकाणांदरम्यान एआय कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी नवीन सबसी केबल मार्ग प्रदान करतो. या प्रसंगी त्यांनी आपला विश्वास व्यक्त करताना सांगितले, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) बाबतीत भारताचा प्रवास विलक्षण असणार आहे.
त्यांनी पुढे असेही सांगितले की, गुगल भारतातील 'एम्स' (AIIMS) सोबत भागीदारी करत असून रुग्ण त्यांची लक्षणे कशी नोंदवू शकतात किंवा माहिती देऊ शकतात आणि डॉक्टरांना मदत करण्यासाठी एआय कशा प्रकारे अहवाल तयार करू शकते, यावर संशोधन केले जात आहे.