सबीहा फातिमा, बंगळूर
दिल्लीच्या अरुंद गल्लीत संध्याकाळ झालीय. हवेत कव्वालीचे सुमधुर सूर घुमताहेत. गुलाबाच्या फुलांचा सुगंध आणि जळणाऱ्या ऊदचा वास एकमेकांत मिसळून गेलाय. रंगीबेरंगी चादरींनी सजलेली दुकानं मावळत्या प्रकाशात चमकताहेत. लोक फुलांच्या टोपल्या घेऊन जाताहेत. आशेने भरलेल्या हातांमध्ये इबादतच्या चिठ्ठ्या घट्ट पकडलेल्या आहेत आणि काही माणसं जाड रजिस्टर घेऊन नावं लिहिण्यासाठी बसलेली आहेत.
या ओळखीच्या वातावरणात एक नौजवान शांतपणे उभा राहून हे सर्व मोठ्या कुतूहलाने पाहतोय. एक माणूस पुढे येतो आणि त्याच्या हातात सुंदर नक्षीकाम केलेली चादर देतो. “दर्ग्यावर ही चादर अर्पण कर, तुझी दुआ लवकरच कुबूल होईल”, असं तो माणूस म्हणतो.
काही पावलं पुढं गेल्यावर दुसरा आवाज येतो. “तुझं नाव नोंदवून घे, तुझ्यासाठी एक खास दुआ केली जाईल”, असं तो आवाज सांगतो. तो नौजवान थोडा वेळ थांबतो. त्याच्या मनात सवाल निर्माण होतो. त्याच्याआधीही अनेक विचारवंतांच्या मनात हाच सवाल आला असेल. ‘खानकाहचा खरा मकसद हाच होता का’, हा तो सवाल असतो. हा कुठल्या दर्ग्याबद्दलचा सवाल नाहीय. तो अखंड संस्कृतीविषयीचा सवाल आहे.
.jpg)
आज खानकाह हा लफ्ज उच्चारला, तरी आपल्यापैकी अनेकांच्या डोळ्यांसमोर हिरव्या कापडाने झाकलेली संतांची कबर, दरवर्षी होणारा उरूस, अकीदतने भरलेली कव्वाली आणि भाविकांची मोठी गर्दी उभी राहते. पण खानकाहची खरी ओळख यापेक्षा खूप मोठी होती. खानकाह म्हणजे एखाद्या संताचं नुसतं विश्रांतीस्थान नव्हे. त्यांच्या हयातीतच त्याची स्थापना झालेली असायची. तिथे लोकांना पनाह तर मिळायचीच पण माणसांना घडवण्याचं मोठं काम तिथे होत असे. तिथे इबादत केली जायची. पण केवळ इबादत करणं हा त्याचा एकमेव मकसद कधीच नव्हता.
चारित्र्याची जोपासना करणं, रुह पाक करणं आणि लोकांना चांगलं इंसान कसं बनायचं हे शिकवणं, हा त्याचा सर्वात मोठा मकसद होता. म्हणूनच कदाचित इस्लामच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला खानकाहच्या भव्य इमारती पाहायला मिळत नाहीत, पण खानकाहचा खरा रुह मात्र तिथेच दिसून येतो.
मदिनामधल्या पैगंबरांच्या मशिदीजवळच्या 'असाब-ए-सुफ्फा' या साध्या चौथऱ्याकडे पाहा. त्या सहकाऱ्यांकडे ना दौलत होती, ना जमिनी होत्या, ना ऐहिक जिंदगीतल्या कोणत्याही सुखसोयी होत्या. तरीही त्यांच्याकडे याहून खूप मोठा खजिना होता. इल्म, इमानदारी, निःस्वार्थपणा आणि परवरदिगार व पैगंबर मुहम्मद यांच्याशी असलेलं अतूट नातं, ही त्यांची सर्वात मोठी दौलत होती. या साध्या प्रारंभातून मोठी निर्माण झाली आणि पुढे मुस्लिम दुनियेत महान खानकाह विकसित झाले.
.jpg)
इस्लामिक रुहानियत कधीच बाह्य दिखाव्यावर उभी राहिलेली नाही. खलिफा उमर इब्न अल-खत्ताब यांची जिंदगी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आपल्या अखेरच्या मुक्कामी ते गंभीर जखमी अवस्थेत पडलेले असताना, त्यांना नवीन पांढऱ्या कफनमध्ये दफन करावं, असा सल्ला त्यांच्या मुलाने दिला. पण खलिफा उमर यांनी याचा अदबीने इन्कार केला. “मेलेल्या इंसानला नवीन कपड्यांची गरज नसते आणि माझे जुने कपडे पुरेसे आहेत”, असं ते म्हणाले. याच फलसफ्यावर पुढे खानकाह उभे राहिले.
कपड्यांपेक्षा अखलाखला, दिखाव्यापेक्षा अदबला आणि इमारतीपेक्षा इमारतीतल्या रुहला जास्त अहमियत देणारं हे फलसफा आहे. इस्लामी कॅलेंडरच्या चौथ्या शतकापर्यंत खुरासान, पर्शिया आणि मध्य आशियामध्ये तालिब-ए-इल्मचे अनेक गट तयार होऊ लागले होते. संन्यासी, आलिम आणि भटके दरवेशी एकाच छताखाली एकत्र राहत असत. ते सर्वजण एकत्र इबादत करत, कुराणचं पठण करत, खुदाचा जिक्र करत, थकलेल्या मुसाफिरांचा इस्तकबाल करत आणि स्वतःच्या अहंकाराविरुद्ध मोठा लढा देत असत. या साध्या मर्कजला पुढे खानकाह म्हणून ओळखलं जाऊ लागलं. हा पर्शियन लफ्ज खाना (घर) आणि गाह (ठिकाण) या दोन शब्दांपासून बनला आहे. पण त्याचा अर्थ केवळ 'घर' असा अजिबात नव्हता. लोकांची मुकम्मल जिंदगी बदलून टाकणारं घर, अशी त्याची खरी ओळख होती.
क्षणभर डोळे मिटा आणि आठशे वर्षांपूर्वी तुम्ही एखाद्या खानकाहमध्ये दाखिल होत आहात, अशी कल्पना करा. पहाटेची इबादत नुकतीच मुकम्मल झालीय. अंगणात सन्नाटा पसरलाय. अंधार ओसरत असताना काही तेलाचे दिवे अजूनही लुकलुकताहेत. कोपऱ्यात नौजवान तालिब शांतपणे कुराणची उजळणी करताहेत. दुसऱ्या कोपऱ्यात बुजुर्ग दरवेशी शांत ध्यानात मग्न होऊन बसलाय. बावरचीखान्यातून ताज्या भाजलेल्या भाकरीची खमंग खुशबू येतेय. प्रवेशद्वारावर थकलेला मुसाफिर धुळीने माखलेले बूट काढतोय. तू कुठून आला आहेस, असं त्याला कोणीही विचारत नाही. त्याचा मजहब, त्याची जुबान किंवा सामाजिक हैसियत याबद्दल कोणीही काहीही विचारत नाही. तिथे असलेला माणूस फक्त हसतो आणि “या, आधी जेवण करून घ्या” असं मुहब्बतने म्हणतो. हाच खरा खानकाह होता.
.jpg)
आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण त्याला एकाच वेळी अनेक नावं देऊ शकतो. रुहानी पनाहगाह, मदरसा, सार्वजनिक बावरचीखाना, मुसाफिरखाना, कुतुबखाना आणि समुपदेशन मर्कज अशी त्याची अनेक रूपं होती. या सर्वांपेक्षा अहम म्हणजे, तिथे लोकांच्या दिलातले रोग, अहंकार, मत्सर, लोभ आणि स्वार्थ यावर सबुरीने इलाज केले जात असत. मुर्शिद किंवा रुहानी रहनुमा आपल्या शागिर्दांना दुआ किंवा मंत्र तर शिकवायचाच. शिवाय तो त्यांचं संपूर्ण चारित्र्य घडवण्याचं काम करत असे.
एखादा रईस खूप अहंकार घेऊन आला, तर त्याला सामूहिक भोजनाच्या वेळी गरिबांच्या शेजारी बसायला सांगितलं जायचं. एखाद्या आलिमला स्वतःच्या इल्मचा अहंकार झाला, तर त्याला सर्वांसाठी भाकरी भाजायला बावरचीखान्यात पाठवलं जायचं. खानकाहचा पहिला सबक सोपा होता. परवरदिगारच्या दरबारात सगळी माणसं बरोबर आहेत.
महान सुफी बुजुर्ग भारतीय उपखंडात आले, तेव्हा ते नुसते नवीन मजहबचे प्रचारक म्हणून आले नाहीत. ते नव्या तहजीबचे निर्माते म्हणून आले. लाहोरमधले दाता गंज बक्ष, अजमेरमधले ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती, दिल्लीतले निजामुद्दीन औलिया, मुल्तानमधले बहाउद्दीन झकारिया आणि गुलबर्गा इथले ख्वाजा बंदा नवाज गेसू दराज यांनी असे खानकाह कायम केले. मजहब, जात, जुबान किंवा सामाजिक हैसियतचा कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांसाठी या खानकाहचे दरवाजे नेहमी खुले असत. या संस्थांनी इस्लामचा प्रसार करण्याहूनही मोठं काम केलं. त्यांनी भारतीय उपखंडाची सामायिक तहजीब घडवण्यात मोठा हातभार लावला.
तिथे पर्शियन जुबानचा स्थानिक जुबानशी मेळ बसला. तिथे साहित्याची भरभराट झाली. संगीताला नवीन रुहानी ओळख मिळाली. अमीर खुस्रोसारख्या शायरांनी आपल्या मुर्शिदच्या रहनुमाईखाली अकीदतची अजरामर कलेत तब्दीली केली. मदरशांनी मोठे आलिम घडवले आणि खानकाहने उत्तम इंसान घडवण्याची कोशिश केली, असं म्हणलं तर ती बिलकुल अतिशयोक्ती ठरणार नाही.
पण काळ एका जागी कधीच थांबत नाही. प्रत्येक रिवायत काळाच्या कसोटीवर टिकावी लागते. महान सुफी बुजुर्ग या दुनियेतून रुख्सत झाल्यावर त्यांची विश्रांतीस्थानं साहजिकच मुहब्बत आणि आठवणींची मुकामं बनली. लोक नवीन इल्म हासिल करण्यासाठी तिथे परत आले नाहीत. बुजुर्गांची जिंदगी आठवण्यासाठी, दुआ करण्यासाठी आणि त्यांनी दिलेल्या मूल्यांशी पुन्हा जोडलं जाण्यासाठी आवाम तिथे येऊ लागली. हा बदल स्वाभाविक होता.
बुजुर्गांच्या कबरीभोवती बांधलेला दर्गा आणि खानकाह हे दोन्ही लफ्ज हळूहळू एकमेकांशी जोडले गेले. सुरुवातीला या दोन्हींमध्ये काही फरक नव्हता. खानकाह ही जिवंत गुरूची शाळा होती आणि दर्गा हे त्यांच्या वारशाचं स्मरण करण्याचं मुकाम बनलं. पण शतकं उलटून गेल्यावर काही ठिकाणी त्याचा मूळ मकसद बदलू लागला. एकेकाळी कोणत्याही भेदभावाविना सर्वांसाठी तिथे लंगर शिजवला जात असे. पण नंतर तिथे हळूहळू देणग्या मोजायचं काम जास्त अहम झालं. मुर्शिद आपल्या शागिर्दांना अहंकारावर मात करायला शिकवत असत. पण त्याऐवजी काही ठिकाणी व्यक्तीपूजेची प्रथा रूढ व्हायला लागली. चादर, फुलं, पाक धागा आणि रजिस्टर्स यांसारख्या गोष्टी एकेकाळी अकीदतचं प्रतीक होत्या. पण काही दर्ग्यांमध्ये याच गोष्टी हळूहळू संघटित अर्थव्यवस्थेचा हिस्सा बनत गेल्या.
पण म्हणजे ही काही प्रत्येक खानकाहची किंवा प्रत्येक दर्ग्याची कहाणी नाहीय. अनेक मुकामांनी आजही आपला मूळ रुह इमानदारीने जपून ठेवलाय. काही थोडक्या लोकांच्या चुकांवरून प्रत्येक रुहानी संस्थेचं मूल्यमापन करणं चुकिचं ठरेल.
चुनार या प्राचीन शहरात एक कहाणी आजही आदराने सांगितली जाते. मुघल बादशाह जहांगीरच्या काळात बाबा कासिम शाह सुलेमानी यांचा रुहानी असर चांगलाच वाढला होता, असं लोक सांगतात. पण यामुळे शाही दरबारात मोठी बेकरारी निर्माण झाली होती. अशा अखलाखी अधिकारातून भविष्यात राजकीय ताकद निर्माण होऊ शकते, अशी भीती बादशाहला वाटू लागली होती.
.jpg)
स्थानिक रिवायतनुसार बाबा कासिम शाह यांना गिरफ्तार करून चुनारच्या मजबूत किल्ल्यात कैद करण्यात आलं. त्यांच्या मनगटावर आणि घोट्यावर लोखंडाच्या जड साखळ्या बांधल्या गेल्या आणि पहारेकरी रात्रंदिवस तिथे पहारा देत असत. पण इथे या कहाणीला वेगळंच वळण लागतं. अजानचे सूर हवेत घुमताच त्या साखळ्या रहस्यमयरीत्या आपोआप गळून पडत असत, असे चुनारमधले बुजुर्ग लोक सांगतात. बाबा कासिम शाह शांतपणे तुरुंगातून बाहेर पडायचे, सुकूनने आपली इबादत मुकम्मल करायचे आणि पुन्हा आपल्या कोठडीत परत यायचे. त्यांचं काम मुकम्मल होताच, काहीही घडलं नसल्यासारख्या त्या साखळ्या पुन्हा त्यांच्या अंगाभोवती बांधल्या जायच्या. या हैरतअंगेज घटनांची खबर शेवटी बादशाह जहांगीरपर्यंत पोहोचली. कुतूहलापोटी आणि कदाचित काहीशा अदबीने त्याने स्वतः या प्रकरणाची खात्री करण्यासाठी तिथे धाव घेतली. तो चमत्कार आहे असं वाटून बादशाहने स्वतःच्या अमलबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला, असं तिथली रिवायत सांगते. त्याने बुजुर्गांची माफी मागितली आणि खानकाह उभारण्यासाठी जमीन दान केली.
या कहाणीतला प्रत्येक तपशील ऐतिहासिक पुराव्यांद्वारे साबित करता येईल का, हा आलिमांच्या चर्चेचा विषय आहे. पण चमत्कारापेक्षा त्यातून मांडल्या जाणाऱ्या सत्यामुळे ही कहाणी शतकानुशतकं टिकून राहिली आहे. त्यातला पैगाम चिरंतन आहे. राजकीय सत्ता अखलाखी अधिकाराला घाबरतेच. पण आज ना उद्या, त्या सत्तेला अखलाखीसमोर झुकावं लागलंच आहे. दक्षिण आशियातला खानकाहचा इतिहास अशा अनेक कहाण्यांनी भरलेला आहे. यापैकी काही कहाण्या इतिहासकारांनी नोंदवून ठेवल्या आहेत. तर इतर अनेक कहाण्या सामान्य आवामच्या स्मरणात जिवंत आहेत. त्यांचा स्रोत कोणताही असो, या सर्व कहाण्या त्याच सत्याकडे बोट दाखवतात. खानकाह हे कधीच फक्त इबादतचं मुकाम नव्हतं. ती मुकम्मल समाजाची स्पंदनं होती.
आज तुम्ही गुलबर्गा, अजमेर, दिल्ली, कलियार किंवा खुलदाबाद इथल्या खानकाह आणि दर्ग्यांमध्ये गेलात तर तुम्हाला तिथं दोन भिन्न जगं एकत्र पाहायला मिळतील. त्यातलं पहिलं जग शतकानुशतकाच्या जुन्या रिवायतशी जोडलेलं आहे. तिथे अजूनही लंगर भुकेल्यांना अन्न देतो. मुसाफिरांना तिथे आजही पनाह मिळते. कुराणची तिलावत तिथे आजही केली जाते. अनेक लोक खऱ्या सुकूनच्या शोधात तिथे आजही येतात.
यातलं दुसरं जग मात्र मुकम्मल आधुनिक आहे. पर्यटन, व्यापार, राजकीय असर, सोशल मीडिया आणि मजहबचं अर्थकारण यांनी काही पाक मुकामांचं वातावरण बदलून टाकलं आहे. तिथली गर्दी आता पूर्वीपेक्षा कितीतरी वाढली आहे. अकीदत आणि व्यावसायिक उद्योग तिथे खांद्याला खांदा लावून उभे असलेले दिसतात.
यापैकी कोणतीही बाजू म्हणजे मुकम्मल वास्तव नव्हे. दोन्ही बाजू पाहिल्याशिवाय आपण भूतकाळ किंवा वर्तमानकाळ नीट समजून घेऊ शकत नाही. म्हणूनच, खानकाह बदलले आहेत का, हा खरा सवाल नाहीय. आपण त्यांचा मूळ रुह जपण्यात कामयाब झालो आहोत का, हाच खरा सवाल आहे. विटा, घुमट किंवा अंगण यांनी खानकाहची ओळख कधीच बनलेली नव्हती. तर ती महान प्रवृत्ती होती. ती मोठी तहजीब होती. इंसानची किंमत दौलत, घराणं, कपडे किंवा प्रसिद्धीवरून मोजली जात नसे, तर अदब, करुणा आणि अखलाखवरून मोजली जात असे. असा समाज तिथे घडवला गेला. मजहबी आलिम घडवणं हा त्याचा मकसद नव्हता. चांगले इंसान घडवणं, हा त्याचा मकसद होता.
मुर्शिद पुस्तकातले सबक शिकवण्यापूर्वी अखलाखचे सबक देत असे. अदबीशिवाय मिळवलेलं इल्म हे ओझं बनतं, असे सबक त्याच्या शागिर्दांना मिळायचे. तसेच खिदमतशिवाय केलेली इबादत अपूर्ण राहते आणि आवामला इंसानियतपासून दूर नेणाऱ्या रुहानियतने आपला खरा रुह आधीच गमावलेला असतो, हेदेखील ते शिकायचे.
पण काळाने या संस्थेतही मोठे बदल केले आहेत. अनेक खानकाह आजही तालीम, खैरात आणि रुहानी रहनुमाईची चैतन्यशील मर्कज म्हणून उभी आहेत. मात्र, इतर काहींनी हळूहळू वेगळीच भूमिका स्वीकारली आहे. त्यांचा रुहानी असर आता सामाजिक असर बनला आहे. आणि त्यांचा सामाजिक असर आता मोठ्या राजकीय असरमध्ये बदलतो आहे. दक्षिण आशियातल्या निवडणुकांदरम्यान राजकारणी लोक अनेकदा मशहूर रुहानी रहनुमांच्या भेटी घेतात. ते तिथे केवळ दुआ घेण्यासाठी येत नाहीत. आदरणीय मुर्शिदचा पाठिंबा किंवा त्यांची सदिच्छा हजारो निस्सीम अनुयायांवर मोठा असर टाकू शकते, हे या राजकारण्यांना चांगलं माहीत असतं. या अर्थाने, अखलाखी तब्दीलीचं मर्कज असलेल्या काही खानकाह आता राजकीय मुस्तकबिल घडवण्याची ताकद असलेल्या संस्था बनल्या आहेत. ही वास्तविकता सांगणं म्हणजे त्या संस्थेचं महत्त्व कमी करणं अजिबात नाहीय. प्रत्येक काळात टिकणारी संस्था शेवटी सत्तेशी जोडली जाते, ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. आणि सत्ता नेहमीच आपला ठसा उमटवते, याची आठवण इतिहास आपल्याला सतत करून देतो.
केवळ इबादतच्या जागा वाढवणं हा उपासनेचा मकसद कधीच नव्हता, तर आपलं दिल मवाळ करणं हा त्यामागचा खरा मकसद होता. लंगर म्हणजे केवळ भुकेल्यांना रिझक देणं नव्हतं. सर्व प्रकारचे भेदभाव संपतात, तिथूनच खऱ्या सन्मानाला सुरुवात होते, याची सतत याद करून देण्याचं काम लंगर करत असे.
आजची दुनिया एकमेकांशी खूप जोडलेली दिसत असली तरी ती आतून खूप दुभंगलेली आहे. म्हणूनच, आज आपल्याला इमारतीच्या रूपात नाही, तर विचाराच्या रूपात खानकाहच्या खऱ्या रुहची पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे. अशा ठिकाणी इल्मला अदबीची, अकीद्याला करुणेची आणि खिदमतला इमानदारीची मोठी जोड दिली जाते. काळाबरोबर अनेक खानकाह बदलले आहेत, हे काही खरं नुकसान नव्हे. त्यांच्या भिंती जपण्याच्या नादात आपण अनेकदा ती मूळ मूल्यंच विसरून गेलो आहोत, हे आपलं सर्वात मोठं नुकसान आहे. याच मूल्यांची जोपासना करण्यासाठी त्यांची उभारणी झाली होती. केवळ आपले अनुयायी निर्माण करणं हा त्यांचा मकसद कधीच नव्हता. विचारशील आणि रहमदिल इंसान घडवणं, हे त्यांचं खरं ध्येय होतं. म्हणूनच, खानकाहचा हा महान वारसा मोठ्या राज्यांपेक्षाही जास्त काळ टिकून राहिला आहे. अनेक साम्राज्यं नष्ट झाली आणि हुक्मरान विस्मरणात गेले. पण खानकाहने दिलेले सबक आजही टिकून आहेत. काहीही न विचारता सर्वांचं इस्तकबाल करणं, कोणतीही अपेक्षा न ठेवता खिदमत करणं आणि सत्तेचा मोह न ठेवता कयादत करणं, हे ते महान सबक आहेत. खानकाह हा खरा इंसान बनण्याचा रास्ता होता आणि तो आजही तसाच आहे.