गणेशोत्सव केवळ सण नाही, तर संस्कृती, परंपरा आणि एकतेचा संगम आहे. देशभरात दहा दिवस अगदी धूमधड्याक्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातच रोवली गेली. यावर्षी राज्य सरकारने हा उत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून जाहीर केला आहे. हा दर्जा मिळाल्याने या उत्सवाला शासकीय स्तरावर अनुदान आणि मदत मिळणार आहे. लोकसहभाग, डिजिटल प्रसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता समाजाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे.
या उत्सवातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मुंबईतील लालबागचा राजा. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला हा गणपती राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून जगभर ओळखला जातो. आज लालबागच्या उत्सवाचे ९२वे वर्ष. नवसाचा गणपती म्हणून देखील प्रसिद्ध असलेला हा गणपती केवळ इच्छापूर्तीचेच नाही तर सामाजिक एकतेचे देखील प्रतीक आहे. लालबागचा राजा उत्सव मंडळाच्या एका कृतीतून जगाला हिंदू-मुस्लीम सामाजिक ऐक्याचे दर्शनही घडले आहे. ते कसे आजच्या या विशेष लेखातून जाणून घेऊया.
एकतेची वीण घातलेला मखमली पडदा
यंदा लालबागच्या राजाची आरास तिरुपती बालाजीच्या स्वर्ण थीमवर आधारित आहे. राजाची भव्य मूर्ती गडद लाल रंगाच्या पितांबरात सुवर्ण सिंहासनावर विराजमान झालेली आहे. डाव्या हातात धारण केलेले चक्र, उजव्या हातात शंख आणि डोक्यावर भव्य मुकुट घातलेले हे रूप भाविकांना मंत्रमुग्ध करत आहे. गणरायाभोवती चमकणारे दिवे, सोन्याची सजावट आणि प्रवेशद्वारावर उभे हत्ती यामुळे मंडपाला जणू काही राजवाड्याचे स्वरूप देण्यात आले आहे. हे सर्व असले तरीही या वर्षाच्या सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे मंडपासमोरचा ५० फूट उंच मखमली पडदा.
यंदा तिरुपती बालाजीचा भव्य मुकूट साकारण्यात आल्याने मंडपाची उंचीही ५० फुटांपर्यंत वाढवावी लागली. त्यामुळे या मंडपासमोर आवश्यक असलेला भरजरी मखमली पडदा तयार करणे हे खरे तर मोठे आव्हान होते. खूप प्रयत्न करूनही कुशल कारागीर मिळणे अवघड झाले होते. मंडळातर्फे त्यासाठी देशभर कारागिरांचा शोध सुरू झाला आणि शेवटी तोडगा मिळाला तो उत्तर प्रदेशातील एका मुस्लीम व्यक्तीकडे. लखनऊच्या एका गावातील मोहम्मद रईस खान यांनी आपल्या साथीदारांसह हा पडदा तयार करण्याचे आव्हान पेलवले. मंडळाने सोपवलेले हे काम त्यांनी चोखपणे पूर्ण करून आपली कलाकुसर अप्रतिम रीतीने सादर केली आहे.

५० फूट उंच मखमली पडद्याची वैशिष्ट्ये
मंडपासमोर बसवला गेलेला हा पडदा ५० फूट उंच आणि रुंद आहे. त्याच्या निऱ्या बसवलेला घेरही तब्बल आठ फुटाचा आहे. लखनऊहून आलेले मोहम्मद रईस खान पाच ते सहा दिवसांहून अधिक काळ या पडद्यासाठी मशीनवर रात्रंदिवस मेहनत घेत होते. मखमल आणि भरजरी नक्षीकाम असलेल्या या पडद्यामुळे लालबागच्या राजाची यंदाची आरास अधिक भव्य दिसत आहे. हा पडदा केवळ सजावटीपुरता मर्यादित नसून तो एकता, श्रद्धा आणि कलेचा संगम बनला आहे.

मुस्लीम कारागीरांच्या प्रतिक्रिया
प्रसिद्ध लालबागचा राजाच्या सजावटीचे काम करण्याचे सौभाग्य लाभल्याचा आनंद रईस खान यांनी व्यक्त केला. बीबीसीला प्रतिक्रिया देताना ते म्हणतात, "गणेशोत्सव हा आमचाही सण आहे. आम्हाला पैशाशी काही देणंघेणं नाही. लखनऊमध्येही आम्हाला जास्त पैसा मिळत होता. पण आम्हाला इथं येऊन काम करायचं होत आणि फक्त बाप्पांना खूश करायचं होतं. सजावटीचे काम आम्ही खूप मनापासून काम केलं आहे."
भावूक स्वरात ते पुढे म्हणतात, "मला हिंदू-मुस्लीम भेद नाही करायचाय, तर सगळ्यांना सोबत घेऊन चालायचंय. राजकारण हे आपलं काम नाही, हिंदू-मुस्लीम भेदभाव फक्त राजकारण्यांनाचं करू द्या. आपला सर्वांचा ईश्वर एकच आहे, फक्त सर्वांची श्रद्धा वेगवेगळी आहे."
लालबागचा राजाच्या गणेशमूर्तीच्या पायाखाली ठेवण्यात आलेली मऊसर गादी मेहमूद अली शेख यांनी तयार केलेली आहे. बीबीसीला प्रतिक्रिया देताना मेहमूद म्हणाले, "गेल्या १० वर्षांपासून मी माझ्या कलेद्वारे लालबागच्या राजाची सेवा करत आहेत. आपण धार्मिक भेदभाव न करता जेवढे एकत्र राहू तेवढे चांगले आहे. याने सामाजिक वातावरणही चांगले राहील. देशाच्या उन्नतीसाठी आपली एकता अधिक गरजेची आहे. कारण एका हाताच्या ताकदीपेक्षा दहा हातांच्या ताकदीत अधिक बळ आहे."
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना म्हटले की, "अनेक जाती, धर्म आणि भाषेचे लोक इथे एका छताखाली एकत्र काम करतात. इथे मुस्लीम बांधवदेखील अनेक प्रकारची काम करत आहेत. गेले पाच-सहा दिवस अगदी मेहनतीने त्यांनी पडदा बनवण्याचे काम केले आहे. लालबागचा राजा मंडळ नेहमीच एकतेचा संदेश देत असते. त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नाही."
गणेशोत्सवाच्या पार्शभूमीवर समाजात धार्मिक सौहार्द निर्माण करण्याच्या हेतूने एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने व्हिडीओ बनवला होता. मात्र या व्हिडीओमुळे अनेकांच्या 'भावना' दुखवल्या गेल्या. त्या व्हिडीओमध्ये मुस्लिम मुर्तीकाराकडून मूर्ती विकत घेतल्यामुळे वादंग पेटले होते. समाजात द्वेषयुक्त विचारांची सरशी होत असताना महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय गणपती म्हणून ओळख असलेल्या लालबागचा राजा उत्सव मंडळाने सौहार्दाची घट्ट वीण घातली आहे. त्यांच्या या कृतीने हिंदू-मुस्लीम सौहार्दाला विरोध करणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे आणि सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा ठळकपणे अधोरेखित झाली आहे.