रामनवमी २०२६ : जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व
Story by आवाज़ मराठी | Published by Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
दयाराम वशिष्ठ
सनातन धर्मात अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात, परंतु रामनवमीचे महत्त्व अत्यंत विशेष आहे. भगवान विष्णूंनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला, तो हा दिव्य दिवस. रामनवमी म्हणजे सत्य, धर्म, मर्यादा आणि आदर्श जीवन तत्त्वांचा उत्सव होय. या दिवशी संपूर्ण भारतात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा केली जाते, घराघरांत श्रीरामाची आराधना होते आणि भक्त रामायण, रामचरितमानस तसेच रामरक्षा स्तोत्राचे पठण करतात. या दिवशी भाविक श्रीरामाच्या बालरूपाची पूजा करून जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करतात.
रामनवमीचे धार्मिक महत्त्व
रामनवमी हा सनातन धर्मात सत्याच्या स्थापनेचे प्रतीक असलेला सण आहे. या दिवशी अयोध्या नगरीत राजा दशरथाच्या घरी भगवान विष्णूंनी राम रूपात जन्म घेतला. शास्त्रानुसार, जेव्हा पृथ्वी अधर्म, अत्याचार आणि राक्षसी शक्तींनी त्रस्त झाली होती, तेव्हा देवांच्या प्रार्थनेवरून भगवान विष्णूंनी श्रीरामाचा अवतार धारण केला.
रामनवमीची पौराणिक कथा
वाल्मीकी रामायणानुसार अयोध्येचे राजा दशरथ यांना पुत्र नव्हता. ऋषी वशिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञानंतर यज्ञकुंडातून दिव्य खीर प्राप्त झाली. राजा दशरथाने ही खीर कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा या तिन्ही राण्यांना दिली. याच खिरीच्या प्रभावाने श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या चार दिव्य पुत्रांचा जन्म झाला. वाल्मीकी रामायणात श्रीरामाच्या जन्माचे वर्णन असे केले आहे की, चैत्र मासाच्या नवमी तिथीला, पुनर्वसु नक्षत्रात आणि ग्रह-नक्षत्रांच्या अत्यंत शुभ स्थितीत माता कौशल्याने सर्वलोकपूजित श्रीरामाला जन्म दिला.
भगवान श्रीरामाचे आदर्श जीवन
भगवान श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. जीवनातील मर्यादा आणि धर्माच्या नियमांचे सर्वोत्तम पालन करणारा पुरुष, असा याचा अर्थ होतो. त्यांनी पुत्र, भाऊ, पती, मित्र आणि राजा अशा सर्व रूपांत आदर्श प्रस्थापित केले आहेत. वाल्मीकी रामायणात म्हटले आहे की, श्रीराम हे धर्माचे साक्षात स्वरूप आहेत. त्यांचा स्वभाव अत्यंत सज्जन असून पराक्रम सत्य आणि न्यायावर आधारित आहे.
रामनवमी पूजा विधी
रामनवमीला मध्यान्ह काळात पूजा केली जाते. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर पूजेच्या जागी पिवळे कापड पसरून श्रीराम, सीता माता, लक्ष्मण आणि हनुमानजींची मूर्ती स्थापित करावी. देवाला गंगाजलाने स्नान घालून चंदन, पिवळी फुले आणि दागिने अर्पण करावेत. त्यानंतर खीर, केशर भात आणि मिठाईचा भोग चढवावा. नैवेद्यात तुळशीचे पान आवर्जून ठेवावे. पूजेत राम नामाचा जप आणि रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. शेवटी आरती करावी. या दिवशी घराच्या मुख्य दारावर धर्मध्वज लावणे अत्यंत शुभ मानले जाते.
भगवान श्रीरामाची भक्ती
श्रीरामाची भक्ती जीवनात शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा निर्माण करते. गोस्वामी तुलसीदासजींनी लिहिले आहे की, भगवंताला केवळ प्रेम प्रिय आहे. जो खऱ्या मनाने त्यांची भक्ती करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हा सण आपल्याला धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश देतो.
अर्थात, सर्व जगाला आनंद देणारे, युद्धभूमीवर धीर धरणारे आणि करुणेचे सागर असणाऱ्या श्रीरामचंद्रांना मी शरण जातो.
रामनवमी कधी आहे?
पंचांगानुसार, यावर्षी रामनवमी २६ मार्च रोजी साजरी केली जाईल. चैत्र शुक्ल पक्षाची नवमी तिथी २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी सुरू होईल आणि २७ मार्च रोजी सकाळी १० वाजून ६ मिनिटांनी समाप्त होईल. रामनवमीचा मध्यान्ह काळ २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजून २७ मिनिटांपासून दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असेल. श्रीरामाचा जन्म दुपारी झाला असल्याने हा उत्सव २६ मार्च रोजीच साजरा होईल.
रामनवमीचे महत्त्व आणि आपण ती का साजरी करतो?
रामनवमी हा हिंदू धर्माचा वसंत ऋतूतील सण असून तो विष्णूंचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामाच्या जन्माचा आनंदोत्सव आहे. हा दिवस वसंत नवरात्रीचा समारोप मानला जातो. अयोध्येचे राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांचा पुत्र म्हणून श्रीरामाचा जन्म झाल्याने हा दिवस महत्त्वाचा आहे. भक्त या दिवशी रामायण आणि श्रीमद्भागवतातील श्लोकांचे पठण करतात.
अशी श्रद्धा आहे की, या दिवशी प्रार्थना केल्याने जीवनात दिव्य शक्ती येते आणि वाईट शक्ती दूर होतात. लोक भजन-कीर्तन करतात आणि देवाला फळे-मिठाई अर्पण करतात. मुख्य उद्देश श्रीरामाप्रती श्रद्धा व्यक्त करणे हाच असतो.
रामनवमीचे विधी
या दिवशी भाविक एक दिवसाचा उपवास करतात. हा उपवास सूर्योदयापासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत चालतो. अनेक ठिकाणी श्रीरामाच्या बालमूर्तीला पाळण्यात ठेवून जन्मोत्सव साजरा केला जातो. आरती आणि प्रसादानंतर राम-सीतेचा विवाह सोहळा देखील पार पडतो. काही ठिकाणी सार्वजनिक भोजनाचे आयोजन केले जाते. रामकथा आणि भागवताचे वाचन करून जीवनातील नकारात्मकता दूर करणे, हेच या सणाचे खरे महत्त्व आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -