शारीक अदीब अन्सारी
आकाशात चंद्रकोर दिसताच जगभरातील सुमारे १.८ अब्ज मुस्लिम 'रमजान-उल-मुबारक' या पवित्र महिन्यात प्रवेश करतात. दक्षिण आशियामध्ये याला 'रमजान' आणि अरब जगतात 'रमादान' म्हटले जाते. भाषेतील हा फरक असला तरी त्यामागची भावना जगभर एकच आहे. अरबी भाषेतील मूळ शब्द 'रमिदा' (म्हणजे तीव्र उष्णता किंवा भाजून काढणे) यावरून हा शब्द आला आहे. हे प्रतीक आहे पापे आणि मनातील अशुद्धी जाळून टाकण्याचे.
रमजानला ऐतिहासिकदृष्ट्या खूप खोल अर्थ आहे. याच पवित्र महिन्यात, इसवी सन ६१० मध्ये, मक्केजवळील हिरा गुहेत प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर जिब्रईल (गॅब्रिएल) यांच्यामार्फत पवित्र कुराणची पहिली आयत अवतरली होती. हा ईश्वरी संदेश केवळ अरबस्तानसाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवी संस्कृतीसाठी एका मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरला. कुराणमध्ये 'लैलातुल कद्र' (शक्तीची रात्र) चे वर्णन आले आहे, जी रमजानच्या शेवटच्या दहा दिवसांमध्ये असते. ही रात्र हजार महिन्यांपेक्षा श्रेष्ठ मानली जाते, यावरून या महिन्यात दडलेल्या आध्यात्मिक संधीची महती स्पष्ट होते.

इसवी सन ६२४ मध्ये, म्हणजेच मदिन्याला स्थलांतर (हिजरत) केल्यानंतर दुसऱ्या वर्षी रमजानचे रोजे (उपवास) अधिकृतपणे अनिवार्य करण्यात आले. नमाज, दानधर्म (जकात), हज आणि श्रद्धेची साक्ष यांसोबतच 'रोजा' हा इस्लामच्या पाच आधारस्तंभांपैकी एक बनला. महत्त्वाचे म्हणजे, उपवास ही संकल्पना केवळ इस्लामपुरती मर्यादित नाही; ज्यू धर्मातील 'योम किप्पूर' आणि ख्रिश्चन धर्मातील 'लेंट'मध्येही याचे साम्य आढळते. यावरून अब्राहमिक परंपरांमधील आत्मसंयम आणि आत्मशुद्धीचा सामायिक वारसा दिसून येतो.
इतिहासातील काही अत्यंत महत्त्वाच्या घटनाही रमजान महिन्यातच घडल्या आहेत. इसवी सन ६२४ मधील 'बद्रची लढाई', जी सुरुवातीच्या मुस्लिम समाजासाठी संयमाचा आणि जिद्दीचा कसोटीचा क्षण होता, ती याच महिन्यात झाली. इसवी सन ६३० मध्ये मक्केचा शांततापूर्ण विजय याच महिन्यात झाला, जो सलोखा, न्याय आणि अन्यायावर नैतिक धैर्याच्या विजयाचे प्रतीक होता. हे ऐतिहासिक टप्पे दाखवून देतात की रमजानचा संबंध नेहमीच आंतरिक शिस्त आणि सामाजिक परिवर्तनाशी राहिला आहे.
रमजानचा मूळ उद्देश केवळ अन्न-पाण्यापासून दूर राहणे इतकाच नाही. पहाटे 'सहरी'पासून ते सूर्यास्ताच्या 'इफ्तार'पर्यंत, श्रद्धावान लोक शारीरिक सुखांचा त्याग करतात, ज्याचा उद्देश 'तकवा' म्हणजेच ईश्वराचे भान आणि भीती मनात रुजवणे हा असतो. उपवासामुळे इच्छाशक्ती प्रबळ होते, वासनांवर ताबा मिळवता येतो आणि वंचितांबद्दल मनात सहवेदना निर्माण होते. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी स्पष्ट केले होते की, नैतिक आचरणाशिवाय केलेला उपवास हा पोकळ आहे. सत्य, नम्रता आणि करुणा हेच भक्तीचे खरे मापदंड आहेत, याची आठवण त्यांनी करून दिली.

इस्लामिक दिनदर्शिका चंद्रावर आधारित असल्याने, ग्रेगोरियन वर्षाच्या तुलनेत रमजान दरवर्षी साधारण अकरा दिवस आधी येतो. यामुळे मुस्लिमांना वेगवेगळ्या ऋतूंमध्ये उपवास करण्याचा अनुभव मिळतो. कधी कडक उन्हाळ्यातील १६ तासांहून अधिक काळाचे दिवस, तर कधी हिवाळ्यातील छोटे दिवस. काळाचे हे चक्र इस्लामची जागतिक सर्वसमावेशकता आणि विविध हवामान व संस्कृतींना सामावून घेण्याची वृत्ती दर्शवते.
जगभरात रमजान विविध सांस्कृतिक परंपरांतून व्यक्त होतो. दक्षिण आशियामध्ये, सामुदायिक इफ्तारमुळे शेजारी आणि कुटुंबे एकत्र येतात. तुर्कीमध्ये ओटोमन काळापासून चालत आलेली पहाटे ढोल वाजवण्याची प्रथा आजही जपली जाते. इजिप्तमध्ये कंदील लावून रस्ते प्रकाशमान केले जातात, जे आनंदाचे प्रतीक आहेत. या महिन्यात दानधर्माला ऊत येतो, विशेषतः 'जकात' आणि 'जकात-उल-फित्र'च्या माध्यमातून, जेणेकरून समाजातील अत्यंत गरजू व्यक्तीही सन्मानाने ईद साजरी करू शकेल. मशिदींमध्ये 'तरावीह'च्या नमाजासाठी गर्दी होते, ज्यामध्ये महिनाभरात संपूर्ण कुराणचे पठण केले जाते.
मात्र, या उदात्त प्रथांच्या जोडीला, आजच्या काळातील काही गोष्टींवर प्रामाणिकपणे विचार करणे गरजेचे आहे. समाजातील काही घटकांमध्ये, रमजानच्या मूळ उद्देशावर बाजारूपणा आणि दिखाऊगिरीचे सावट येत आहे की काय, अशी भीती वाटते. भव्य इफ्तार पार्ट्या, पाहुणचारातील स्पर्धा, अवाढव्य सजावट आणि ठराविक लोकांनाच दिलेली आमंत्रणे यामुळे रमजानचा साधेपणा आणि सर्वसमावेशकतेचा मूळ गाभा कुठेतरी हरवत चालला आहे. बाजारपेठा चैनीच्या वस्तूंनी भरून जातात आणि काही वर्तुळात मक्का-मदिनेच्या धार्मिक यात्रा या प्रतिष्ठेचे लक्षण बनत आहेत.

इस्लाम आनंद साजरा करण्यास किंवा समृद्धीला विरोध करत नाही; उलट ईश्वराच्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास प्रोत्साहन देतो. मात्र, कुराणातील 'वसतिया' म्हणजे मध्यममार्गाचे तत्त्व अतिरेकापासून सावध करते. रमजान हा नम्रता, समानता आणि सामाजिक एकजुटीचा महिना म्हणून सांगितला गेला आहे, उधळपट्टी किंवा भेदभावासाठी नाही. उपवासाने आपल्याला भुकेची जाणीव करून दिली पाहिजे, सूर्यास्तानंतरच्या चैनीमुळे त्याचा नैतिक उद्देशच मारला जाता कामा नये.
भारतातील मुस्लिमांसाठी रमजानला एक सामाजिक आणि नागरी महत्त्वही आहे. आध्यात्मिक प्रगतीचे रूपांतर नैतिक नागरिकत्वात झाले पाहिजे. हे व्यापारातील प्रामाणिकपणा, सार्वजनिक जीवनातील करुणा आणि धार्मिक व सामाजिक सीमा ओलांडून साधलेली एकता यातून व्यक्त व्हायला हवे. हा महिना दुरावा मिटवण्याची, उपेक्षित समाजाला आधार देण्याची आणि धार्मिक भक्तीसोबतच संविधानात्मक मूल्यांचा पुनरुच्चार करण्याची संधी देतो.
त्यामुळे मुख्य प्रश्न आत्मपरीक्षणाचा आहे. रमजानने आपल्याला बदलले आहे, की आपणच आपल्या सोयीनुसार रमजानला बदलले आहे? आपल्या इफ्तारच्या ताटावर गरिबांना, समाजाने नाकारलेल्यांना आणि विस्मृतीत गेलेल्यांना जागा आहे का? आपल्या मशिदींमध्ये खरंच समानता आहे का, जिथे नमाज पढताना जात, वर्ग आणि कुळाचे भेद मिटतात?
रमजान-उल-मुबारक हे आपले प्राधान्यक्रम नव्याने निश्चित करण्याचे ईश्वरी आमंत्रण आहे. अहंकार जाळून टाकणे, इच्छांवर ताबा मिळवणे आणि आपली नैतिक दिशा पुन्हा शोधणे, यासाठी हा महिना आहे. हा पवित्र महिना केवळ उत्सवाचा तमाशा न बनता चारित्र्य घडवणारी शाळा बनावा.
हा रमजान आपल्याला साधेपणा, न्याय, करुणा आणि उत्तरदायित्वाची मूळ भावना पुन्हा मिळवण्यासाठी प्रेरित करो. आपण केवळ विधींचे पालन करणारे नव्हे, तर नैतिक परिवर्तन घडवणारे अधिक चांगले माणूस, चांगले मुस्लिम आणि चांगले भारतीय बनूया.
रमजान मुबारक.
(लेखक 'ऑल इंडिया पसमांदा मुस्लिम महाज'चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत.)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -