आसाममध्ये 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम-२' शुभारंभ; गृहमंत्री अमित शाहांनी केली घोषणा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आसाममध्ये व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामच्या दुसऱ्या टप्प्याचा अधिकृत शुभारंभ
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आसाममध्ये व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामच्या दुसऱ्या टप्प्याचा अधिकृत शुभारंभ

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसाममध्ये व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामच्या दुसऱ्या टप्प्याचा अधिकृत शुभारंभ केला. बांगलादेश सीमेला लागून असलेल्या १४० गावांना आधुनिक शिक्षण आणि रोजगाराची केंद्रे बनवण्याची या उपक्रमाची योजना आहे.

"आज आपण अधिकृतपणे 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम-२' सुरू करत आहोत. याद्वारे आम्ही सीमावर्ती गावांमध्ये देशातील इतर कोणत्याही ठिकाणाप्रमाणे विकास आणि सुविधा पोहचवू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हे शक्य झाले आहे," असे ते म्हणाले. आसाममधील बराक व्हॅलीतील नतनपूर गावात शाह यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम उपक्रमामुळे सीमावर्ती गावांमध्ये देशातील इतर भागांप्रमाणेच प्रगती आणि वृद्धी कशी होईल, यावर शाह यांनी भाष्य केले. "नतनपूर हे गाव केवळ सीमेच्या जवळ असल्यामुळे नाही, तर शिक्षण, रोजगार निर्मिती, रस्ते, दूरसंचार आणि वीज अशा प्रत्येक बाबतीत प्रथम क्रमांकावर येणार असल्यामुळे ते भारतातील पहिल्या गावांपैकी एक ठरेल," असे शाह म्हणाले.

देशातील १७ राज्यांमधील ३३४ ब्लॉक्स आणि १,९५४ गावांच्या विकासासाठी केंद्र सरकार व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम-२ अंतर्गत ६,९०० कोटी रुपये खर्च करत असल्याचे शाह यांनी सांगितले. यामध्ये आसाममधील ९ जिल्हे, २६ ब्लॉक्स आणि १४० गावांचा समावेश आहे. या १४० गावांमधील सर्व सोयीसुविधा भारतातील इतर कोणत्याही गावाच्या बरोबरीने असतील, असेही त्यांनी नमूद केले.

"एक काळ असा होता जेव्हा सीमावर्ती गावांना शेवटचे गाव म्हटले जायचे आणि तिथे अनेक सुविधांचा अभाव होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सीमावर्ती गावे ही पहिली गावे असतील असा निर्णय घेतला. आता ही गावे रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी, दळणवळण, रोजगार, शिक्षण आणि इतर अनेक क्षेत्रांत प्रथम असतील. बांगलादेश सीमेलगतच्या आसाममधील १४० सीमावर्ती गावांचा व्हायब्रंट व्हिलेज अंतर्गत विकास केला जाईल," असे ते म्हणाले.