युक्रेनचे सुरक्षा सचिव रुस्तम उमरोव्ह भारत दौऱ्यावर; रशिया-युक्रेन युद्धावर अजित डोवाल आणि जयशंकर यांच्याशी चर्चा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासमवेत युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण परिषदेचे सचिव रुस्तम उमरोव्ह
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासमवेत युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण परिषदेचे सचिव रुस्तम उमरोव्ह

 

युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण परिषदेचे सचिव रुस्तम उमरोव्ह यांनी शुक्रवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी स्वतंत्र आणि अत्यंत महत्त्वाची चर्चा केली. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये शाश्वत शांतता प्रस्थापित करण्याच्या शक्यतांवर या बैठकीत भर देण्यात आला.

राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्की यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे उमरोव्ह सध्या भारत दौऱ्यावर आहेत. अजित डोवाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेत उमरोव्ह यांनी युद्धाच्या फ्रंटलाईनवरील (रणांगणावरील) सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली.

या बैठकीत भारतीय बाजूने आपली मूळ भूमिका पुन्हा स्पष्ट केली. युक्रेनमधील संघर्ष केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच शांततेने सोडवण्याची गरज असल्याचे भारताने ठामपणे सांगितले.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोशल मीडियावर या भेटीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "आम्ही द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली आणि युक्रेनमधील संघर्षावर विचारांची देवाणघेवाण केली."

उमरोव्ह यांनी नमूद केले की, त्यांनी परराष्ट्र मंत्र्यांसोबत "रणांगणावरील सद्यस्थिती, वाटाघाटींची प्रगती आणि युक्रेनसाठी न्याय्य, दीर्घकालीन आणि शाश्वत शांतता मिळवण्याच्या शक्यतांवर चर्चा केली." ऑगस्ट २०२४ मध्ये कीव्हमध्ये राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्की आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेनंतर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनातील करारांची अंमलबजावणी आणि द्विपक्षीय सहकार्याचा विकास यावरही दोन्ही बाजूंनी चर्चा केली.

"या खुल्या आणि सविस्तर संवादाबद्दल मी आभारी आहे. आम्ही द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी उत्सुक आहोत," असे उमरोव्ह यांनी X वर म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी उमरोव्ह आणि डोवाल यांच्यातील भेटीचे काही तपशील शेअर केले. जैस्वाल म्हणाले, "दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि सुरू असलेल्या रशिया-युक्रेन संघर्षावर चर्चा केली. संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या भारताच्या तत्त्वनिष्ठ भूमिकेचा आणि लक्ष्याचा डोवाल यांनी पुनरुच्चार केला."

उमरोव्ह यांनी सांगितले की, त्यांनी आणि डोवाल यांनी "द्विपक्षीय संबंधांचा विकास आणि सुरक्षा परिस्थितीच्या मूल्यमापनावर चर्चा केली." ते पुढे म्हणाले, "भारत सरकारने संवाद आणि मुत्सद्देगिरीवर आधारित शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या गरजेवर आपली सातत्यपूर्ण भूमिका पुन्हा मांडली आहे."

"शाश्वत शांतता सुनिश्चित करतील असे उपाय शोधण्याच्या गरजेबाबत निर्माण झालेल्या सामायिक समजाबद्दल मी कृतज्ञ आहे," असेही त्यांनी नमूद केले.