आसाममध्ये ड्रग्जविरोधी लढ्यात दुर्मिळ धार्मिक आणि राजकीय एकजूट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 14 h ago
आसाममधील साऊथ सालमारा-मानकाचर पोलीस ५.९२ कोटी रुपये किमतीचे जप्त केलेले अमली पदार्थ नष्ट करत आहेत.
आसाममधील साऊथ सालमारा-मानकाचर पोलीस ५.९२ कोटी रुपये किमतीचे जप्त केलेले अमली पदार्थ नष्ट करत आहेत.

 

दौलत रहमान

आसाममधील राजकीय चर्चा अनेकदा वैचारिक, वांशिक आणि धार्मिक धर्तीवर अत्यंत टोकाच्या पद्धतीने विभागलेली असते. पण अशा वेळी राज्यापुढील एका अत्यंत गंभीर सामाजिक आव्हानावर म्हणजेच 'ड्रग्जच्या (अमली पदार्थांच्या) वाढत्या धोक्यावर' सर्व राजकीय नेत्यांमध्ये एक अनपेक्षित एकमत निर्माण झाले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि 'एआययूडीएफ' (AIUDF) चे प्रमुख तथा प्रभावशाली मुस्लिम नेते बद्रुद्दीन अजमल यांच्या विचारांमध्ये या मुद्यावर एकवाक्यता दिसून आली. यातून एक मोठा संदेश समोर आला आहे की, अमली पदार्थांविरुद्धचा लढा राजकारण, जात, पंथ आणि धर्म या सर्वांच्या पलीकडे गेला पाहिजे.

ड्रग्ज तस्कर हे 'खुनी' आहेत
या विषयावरील चर्चेला तेव्हा वेग आला जेव्हा अजमल यांनी आसाम विधानसभेत आणि नंतर माध्यमांसमोर अत्यंत कठोर आवाहन केले. त्यांनी ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांना "समाज संपवणारे खुनी" म्हटले. मोठ्या ड्रग्ज तस्करांविरुद्ध पोलिसांच्या 'एन्काऊंटर'सारख्या कडक कारवाईचे समर्थन करताना अजमल यांनी असा युक्तिवाद केला की, केवळ कायदेशीर तरतुदींच्या जोरावर हे अमली पदार्थांचे वाढते नेटवर्क उद्ध्वस्त करणे शक्य नाही.

त्यांच्या या विधानावर समाजातील एका विशिष्ट घटकातून बरीच टीका झाली. तृणमूल काँग्रेसचे (TMC) आमदार शेर्मन अली अहमद यांनी तर अजमल यांच्या वक्तव्याला 'न्यायबाह्य हत्यांचे समर्थन' म्हटले आणि प्रत्येक आरोपीवर कायद्याच्या चौकटीतच कडक कारवाई झाली पाहिजे, असा आग्रह धरला. या मतभेदांवरून राजकीय आणि नागरी समाज वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

शिक्षणातील योगदान आणि चिंतेचे कारण
गेल्या अनेक वर्षांपासून बद्रुद्दीन अजमल हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना, विशेषतः आसाममधील मुस्लिम समाजाला, दर्जेदार शिक्षणाची दारे खुली करून देण्यासाठी ओळखले जातात. 'अजमल फाऊंडेशन' आणि त्याच्या शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कोचिंग आणि शैक्षणिक मदतीचा फायदा झाला आहे.

त्यांच्या सर्वात उल्लेखनीय उपक्रमांपैकी एक म्हणजे 'सुपर ४०' (Super 40) कार्यक्रम होय. यातून अनेक गुणवान पण गरीब विद्यार्थ्यांना नामांकित वैद्यकीय आणि अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे, ज्यामुळे अनेकांना डॉक्टर आणि इंजिनिअर बनण्याचे स्वप्न पूर्ण करता आले. ज्ञान हेच सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाचे सर्वात प्रभावी साधन आहे, या विश्वासाने शिक्षणाला अजमल यांच्या कार्यात नेहमीच मध्यवर्ती स्थान राहिले आहे.

याच पार्श्वभूमीवर, त्यांनी ड्रग्जच्या विळख्याविरुद्ध घेतलेली कडक भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. ज्या नेत्याने अनेक दशके तरुणांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे, तो स्वाभाविकपणे अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याबद्दल चिंतित असणारच; कारण ज्या पिढीला घडवण्यासाठी अजमल फाऊंडेशनसारख्या संस्थांनी एवढे मोठे काम केले, तीच पिढी या ड्रग्जच्या विळख्यात नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन आणि कारवाईची मोहीम
विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अजमल यांच्या अमली पदार्थांविरोधातील भूमिकेचे स्वागत केले. त्यांनी सर्व पक्षीय आमदारांना या समस्येचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. अमली पदार्थ हा कधीही राजकीय ध्रुवीकरण किंवा जातीय चर्चेचा विषय होऊ नये, याचा सरमा यांनी पुनरुच्चार केला.

एखाद्या विशिष्ट धार्मिक समुदायातील ड्रग्ज तस्करांवर पोलिसांची कारवाई होते, तेव्हा अनेकदा त्याला जातीय रंग दिला जातो, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या मते, राज्याचा अमली पदार्थांविरुद्धचा लढा हा नेहमीच गुन्हेगारीविरुद्धचा लढा राहिला पाहिजे, तो कोणत्याही धर्म किंवा समुदायाविरुद्धचा लढा नाही.

२०२१ मध्ये आसाममधील भाजप सरकारने सुरू केलेल्या आक्रमक अमली पदार्थविरोधी मोहिमेनंतर, पोलिसांनी देशातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक कारवाई केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत ड्रग्जविरोधी हजारो कारवाया करण्यात आल्या असून त्यात २० हजारांहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या काळात हेरॉईन, मेथाम्फेटामाइन (याबा गोळ्या), गांजा, अफू आणि इतर प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त करून ते न्यायालयीन देखरेखीखाली नष्ट करण्यात आले आहेत. या जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक हजार कोटी रुपयांची किंमत आहे. या कारवाईमुळे आसामच्या सीमेवरून चालणारे आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय तस्करी नेटवर्क लक्ष्यावर आले आहेत.

केवळ माल जप्त करणे हा या मोहिमेचा उद्देश नसून, आसामच्या भौगोलिक आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील मोक्याच्या स्थानाचा फायदा घेणाऱ्या संघटित तस्करीच्या सिंडिकेटला कायमचे उद्ध्वस्त करणे हाच मुख्य उद्देश आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुस्लिम समाजाला अजमल यांचा संदेश
पोलिसांच्या कारवाईवर केलेल्या वक्तव्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे होते ते अजमल यांनी मुस्लिम धार्मिक नेत्यांना केलेले आवाहन. एआययूडीएफ प्रमुखांनी आसाममधील सर्व इमाम, इस्लामी अभ्यासक आणि मशीद समित्यांना अमली पदार्थांविरुद्ध सक्रिय मोहीम राबवण्याची विनंती केली. तसेच व्यसनामुळे होणाऱ्या भीषण परिणामांबद्दल तरुणांना जागरूक करण्यास सांगितले.

मुस्लिम बहुल भागातही गुन्हेगारी घटकांवर कारवाई केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कौतुक केले आणि सांगितले की, गुन्हेगारीचे समर्थन कधीही जातीय आधारावर केले जाऊ नये. आसामच्या मुस्लिमांच्या मोठ्या वर्गावर अजमल यांचा चांगला प्रभाव असल्याने त्यांच्या या आवाहनाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. जर मशिदींमधून शुक्रवारी (जुम्मा) होणाऱ्या प्रवचनांमध्ये नियमितपणे ड्रग्जच्या समस्येवर बोलले गेले, तर या मोहिमेमुळे असुरक्षित भागात मोठी लोकजागृती होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

इस्लाममध्ये नशा करण्यास स्पष्ट मनाई
इस्लाममध्ये नशा करण्याच्या पदार्थांवर स्पष्ट बंदी आहे, त्यात कोणतीही संदिग्धता नाही. कुराण स्पष्टपणे मादक पदार्थांना प्रतिबंधित करते. त्यातून मिळणाऱ्या कोणत्याही कथित फायद्यांपेक्षा ते अधिक हानिकारक असल्याचे वर्णन कुराणमध्ये केले आहे. प्रेषित मुहम्मद यांच्या अनेक शिकवणींमध्येही असे जाहीर करण्यात आले आहे की, प्रत्येक मादक पदार्थ हा निषिद्ध (हराम) आहे आणि निर्णय क्षमता बिघडवणाऱ्या किंवा समाजाचे नुकसान करणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून दूर राहण्याचा इशारा त्यात दिला आहे.

इस्लामी अभ्यासक असे निदर्शनास आणून देतात की, व्यसनामुळे केवळ वैयक्तिक आरोग्याचाच नाश होत नाही, तर कुटुंबे, उपजीविकेची साधने आणि सामाजिक सलोखाही पूर्णपणे नष्ट होतो. त्यामुळे अमली पदार्थांशी लढा देणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून ती एक धार्मिक जबाबदारीदेखील आहे, असे अनेक धार्मिक नेत्यांचे मत आहे.

याच कारणामुळे तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, मशिदी या प्रतिबंधात्मक जागृतीसाठी अत्यंत शक्तिशाली केंद्रे बनू शकतात; जिथून तरुणांचे समुपदेशन करणे, कुटुंबांना मार्गदर्शन करणे आणि व्यसनाधीनांना समाजातून वाळीत टाकण्याऐवजी त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रोत्साहन देणे शक्य होईल.

समाजाचा मोठा पुढाकार
आसाममधील अनेक मुस्लिम बहुल भागात या ड्रग्जविरोधी चळवळीने आता एक भक्कम सामाजिक स्वरूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. अलीकडच्या वर्षांत, अनेक गावे आणि मशीद समित्यांनी अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या लोकांविरुद्ध अभूतपूर्व आणि कडक निर्णय घेतले आहेत.

काही घटनांमध्ये स्थानिक समुदायाने ड्रग्जची तस्करी करणाऱ्या सवयीच्या गुन्हेगारांसाठी 'जनाजा' (अंत्यसंस्काराची प्रार्थना) करण्यास किंवा त्यांना गावच्या स्मशानभूमीत पुरण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे; जोपर्यंत त्यांच्यात पश्चात्तापाची किंवा समाजाच्या मान्यतेची भावना दिसत नाही. अशा निर्णयांवर इस्लामी अभ्यासकांनी जरी चर्चा केली असली, तरी हा कोणताही धार्मिक फतवा नसून अमली पदार्थांविरुद्ध दिलेला एक अत्यंत शक्तिशाली सामाजिक संदेश होता.

होजाई आणि मध्य आसामच्या काही भागांतील मशीद समित्यांच्या अशाच प्रकारच्या निर्णयांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि ड्रग्जच्या समस्येला आळा घालण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्यावर मोठी चर्चा सुरू झाली. २०२५ मध्ये, आसामच्या दक्षिण कामरूप जिल्ह्यातील गोरोईमारी अंतर्गत येणाऱ्या जारपारा येथील सहा गावांतील गावकऱ्यांनी असा ठराव केला होता की, जे लोक प्रतिबंधित ड्रग्जच्या सेवनामुळे मरण पावतील, त्यांच्यासाठी जनाजा (इस्लामिक अंत्यसंस्कार प्रार्थना) केला जाणार नाही किंवा त्यांना दफन केले जाणार नाही. तसेच अशा व्यसनी लोकांच्या कुटुंबांना समाजाकडून सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागेल.

यामागे कुटुंबांना कलंकित करण्याचा कोणताही हेतू नव्हता, तर समाजाला एक कडक संदेश देण्याचा होता की, तरुणांचे आयुष्य नष्ट करून नफा कमावणाऱ्यांना समाज कधीही सहन करणार नाही, असे समुदाय नेत्यांचे म्हणणे आहे.

राजकारणाच्या पलीकडे जाणारा लढा
अमली पदार्थांचे व्यसन हे आसामसमोरील सर्वात मोठ्या सामाजिक आव्हानांपैकी एक म्हणून पुढे आले आहे. यामुळे कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वच समुदायांतील कुटुंबांना फटका बसत आहे. या व्यसनाच्या बळींमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी समुदाय आणि प्रत्येक सामाजिक पार्श्वभूमीतील लोकांचा समावेश आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, राज्याचे राजकीय नेतृत्व आणि प्रभावशाली मुस्लिम नेत्यांमध्ये दिसलेली ही दुर्मिळ एकवाक्यता एक अत्यंत महत्त्वाचा संदेश देते: केवळ पोलिसांच्या कारवाईने अमली पदार्थांचा पराभव करता येणार नाही. शाश्वत यशासाठी सरकारी यंत्रणा, शैक्षणिक संस्था, धार्मिक नेते, नागरी संस्था आणि स्थानिक समुदाय यांच्यात मोठ्या सहकार्याची गरज आहे.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी वारंवार स्पष्ट केल्याप्रमाणे, अमली पदार्थांविरुद्धच्या मोहिमेकडे कधीही राजकारण किंवा धर्माच्या चष्म्यातून पाहिले जाऊ नये. या संघटित लढ्याला अजमल यांनी दिलेला पाठिंबा—आणि लोकजागृतीसाठी इमाम व इस्लामी विद्वानांना त्यांनी केलेले आवाहन—या प्रयत्नांमध्ये एक नवीन आणि महत्त्वपूर्ण आयाम जोडतो.

ज्या राज्यात अनेकदा राजकीय स्पर्धा मोठ्या प्रमाणावर असते, तिथे निर्माण झालेले हे एकमत असे सुचवते की, जेव्हा आसामच्या तरुणांना व्यसनातून वाचवण्याची वेळ येते, तेव्हा ओळखीपेक्षा माणुसकी आणि राजकीय मतभेदांपेक्षा सामूहिक जबाबदारीलाच नेहमी विजय मिळायला हवा.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News