सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड
कोलकाता
सरन्यायाधिश डी वाय चंद्रचूड यांनी न्यायाधिशांना महत्वाचा सल्ला दिला आहे. न्यायाधिशांनी स्वतःला देव आणि कोर्टांना मंदिरं समजू नये, असं त्यांनी म्हटलं आहे. आपण लोकांची सेवा करत आहोत हे कायम लक्षात ठेवा, त्यामुळं जर तुम्ही चुकीची प्रॅक्टिस करत असाल तर ते न्याय व्यवस्थेतासाठी योग्य नाही, असंही चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.
कोलकाताच्या नॅशनल ज्युडिशिअल अॅकेडमीच्या रिजनल कॉन्फरन्सला संबोधित करताना चंद्रचूड म्हणाले, आम्हाला नेहमीच कोर्टात लॉर्डशिप किंवा लेडीशिपच्या रुपात संबोधित केलं जातं. जेव्हा लोक म्हणतात की न्यायालय न्याय मंदिर आहे, तेव्हा ते खूपच धोकादायक बनतं. कारण आम्ही स्वतःला त्या मंदिरातील देवाच्या रुपात बघायला लागतो. जेव्हा कोर्टाचा उल्लेख कोणी न्याय मंदिर असा करतो तेव्हा मला संकोच वाटतो, असंही चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले, 'उलट मी न्यायाधिशांची भूमिका ही लोकसवेकाची भूमिकेशी परिभाषित करु इच्छितो. कारण जेव्हा लोकांची सेवा करणाऱ्याच्या रुपात तुम्ही स्वतःला पाहता तेव्हा तुमच्यात करुणा, सहानुभूती, न्यायाची धारणा निर्माण होते. त्याचबरोबर तुम्ही इतरांबाबत जजमेंटल होत नाही. यामुळं एखाद्याला शिक्षा सुनावतानाही न्यायाधिश करुणेच्या भावनेनं विचार करतात. कारण शेवटी एका मनुष्याला शिक्षा सुनावली जाणार असते.'
'संविधानिक नैतिकतेची ही कन्सेप्ट केवळ सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टांच्या न्यायाधीशांसाठी नाही तर जिल्हा कोर्टांसाठी देखील महत्वाची आहे. कारण सामान्य नागरिकांची भागिदारी सर्वात आधी आणि सर्वात महत्वपूर्ण रुपात जल्हा कोर्टांपासून सुरु होते.' असे म्हणत चंद्रचूड यांनी कोर्टातील तंत्रज्ञानाच्या वापरावर देखील भर दिला. कोर्टातील अडचणींवरही त्यांनी यावेळी भाष्य केलं.
चंद्रचूड शेवटी म्हणाले, 'सर्वसामान्य लोकांपर्यंत निर्णय पोहोचणं आणि ते समजून घेण्यात भाषा ही एक मुख्य अडचण आहे. तंत्रज्ञान यावर आपल्याला काही पर्याय देऊ शकतं. बहुतेक आदेश हे इंग्रजीत लिहिले जातात. पण आता आम्ही तंत्रज्ञानाच्या मदतीनं या आदेशांचा अनुवाद करण्यास सक्षम बनलो आहोत. आम्ही सध्या ५१,००० निकालांचे इतर भाषांमध्ये अनुवाद करत आहोत.'