जम्मू-काश्मीर : किश्तवाडच्या बर्फाच्छादित जंगलात सैन्यदलाची मोठी कारवाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 h ago
 Fresh Encounter in Kishtwar J&K; Army vs Jaish Terrorists
Fresh Encounter in Kishtwar J&K; Army vs Jaish Terrorists

 

किश्तवाड:

जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात रविवार, २५ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्री सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा भीषण चकमक सुरू झाली आहे. किश्तवाडमधील चात्रू बेल्टच्या डोंगराळ भागात गेल्या आठवडाभरातील ही तिसरी चकमक असून, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कर आणि पोलीस या भागात संयुक्त शोधमोहीम राबवत आहेत.

ही चकमक रविवारी रात्री साधारण १०.२० ते १०.५० च्या सुमारास जनसीर-कांडीवार (Janseer-Kandiwar) वनक्षेत्रात सुरू झाली. संयुक्त शोध पथकाने दहशतवाद्यांना गाठल्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. या मोहिमेची सुरुवात १८ जानेवारी रोजी 'ऑपरेशन त्राशी-१' (Operation Trashi-I) अंतर्गत झाली होती. सोनार गावातील पहिल्या गोळीबारात एका पॅराट्रुपरला वीरमरण आले, तर अन्य सात जवान जखमी झाले होते.

चात्रू बेल्टमध्ये सध्या प्रचंड हिमवृष्टी होत असून, २३ जानेवारी रोजी तिथे दोन फुटांहून अधिक बर्फ साचला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा पाठलाग सुरूच ठेवला आहे. दहशतवाद्यांनी दाट झाडी आणि डोंगराळ भूभागाचा फायदा घेत १८ जानेवारी आणि २२ जानेवारी रोजी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरक्षा दलांनी आता त्यांना पुन्हा एकदा घेरले असून, या भागात अनेक स्तरांचा (मल्टी-टियर) वेढा घातला आहे जेणेकरून ते पळून जाऊ शकणार नाहीत. या कारवाई दरम्यान दहशतवाद्यांचे एक मोठे तळही उद्ध्वस्त करण्यात आले असून, तिथून गॅस सिलेंडर, रेशन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा जप्त करण्यात आला आहे.