नवी दिल्ली
देशाच्या सुरक्षेपुढील समकालीन आव्हाने आणि धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसीय 'राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदे'ची (National Security Strategies Conference) सोमवारी नवी दिल्लीत सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोन दिवसीय उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित राहून सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत.
भौतिक (Physical) आणि आभासी (Virtual) अशा दोन्ही स्वरूपांत हायब्रिड पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत देशाच्या कानाकोपऱ्यातून सुरक्षा दल आणि राज्य पोलिसांचे ८५० हून अधिक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. नवव्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेमध्ये देशांतर्गत सुरक्षा, सीमा सुरक्षा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मंथन केले जात आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या परिषदेत विविध सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी समकालीन आव्हानांचा सामना करण्यासाठीच्या उपायांवर विचारविनमय करत आहेत. गुप्तचर यंत्रणांचे बळकट जाळे, सायबर सुरक्षा आणि सीमावर्ती भागांतील सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी बनवण्यासाठीच्या धोरणांवर या बैठकीत विशेष भर दिला जाणार असल्याचे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले आहे.