भारताने पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्याला केले हद्दपार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालय.
पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालय.

 

भारताने बुधवारी पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयातील दुसऱ्या कर्मचाऱ्याला हद्दपार केले आहे.  या कर्मचाऱ्याला २४ तासांत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले असून  परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) याबाबत एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे, “भारत सरकारने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयात कार्यरत एका कर्मचाऱ्याला ‘पर्सोन नॉन ग्राटा’ (अस्वीकार्य व्यक्ती) घोषित केले आहे. त्याने त्याच्या अधिकृत दर्जाशी न जुळणारी कृती केली आहे.”

हा कर्मचारी कोणत्या गैरकृत्यांत सामील होता याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट माहिती दिली नाही. मात्र, पंजाब पोलिसांच्या तपासात हेरगिरीशी संबंधित प्रकरणात या कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे समजते. यापूर्वी १३ मे ला एका पाकिस्तानी कर्मचाऱ्याला हेरगिरीच्या आरोपाखाली हद्दपार करण्यात आले होते. आठवड्याभरात ही दुसरी कारवाई आहे.

भारताने पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयाचे प्रभारी (चार्ज डी’ अफेअर) साद अहमद वर्राईच यांना डिमार्श (औपचारिक तक्रार) जारी करून पाकिस्तानी राजनयिक आणि कर्मचारी यांनी त्यांच्या विशेषाधिकारांचा गैरवापर करू नये, अशी सक्त ताकीद दिली आहे. 

पंजाबमधील हेरगिरी प्रकरण
११ मे ला पंजाब पोलिसांनी मालेरकोटला येथे दोन व्यक्तींना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती. या दोघांनी भारतीय लष्कराच्या हालचालींबाबत संवेदनशील माहिती पाकिस्तानस्थित हँडलरला पुरवल्याचा आरोप आहे. पंजाब पोलिसांचे महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की, या दोघांनी ऑनलाइन व्यवहारांद्वारे पैसे घेऊन माहिती पुरवली. तपासातून या प्रकरणाशी संबंधित अन्य स्थानिक व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या अटकेनंतरच दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्याचा संबंध उघड झाला आहे. 

ही कारवाई भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. २२ एप्रिल ला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. हा हल्ला २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला होता. याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी गटाने घेतली. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ६-७  मे ला ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्यापलेल्या काश्मीरमधील (PoK) नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

या कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये सैन्य चकमकी झाल्या. ७ ते १० मे दरम्यान पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल हल्ले केले. या हल्ल्यांना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. १० मे रोजी दोन्ही देशांनी लष्करी संचालक (DGMO) स्तरावरील चर्चेनंतर युद्धबंदी करार स्वीकारला. मात्र, काही तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचा भंग केला. 

भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला ‘पर्सोना नॉन ग्राटा’ घोषित करून २४ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, “भारतीय कर्मचारी त्याच्या विशेषाधिकाराशी न जुळणाऱ्या कृतीत सामील होता.” या दोन्ही कारवाया परस्परांविरुद्धच्या तक्रारींचा भाग आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलली. २३ एप्रिल रोजी पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयातील २५ कर्मचारी, विशेषतः लष्करी सल्लागार, यांना हद्दपार केले आणि कार्यालयाची कर्मचारी संख्या ५५ वरून ३० पर्यंत कमी केली. याचप्रमाणे, भारतानेही इस्लामाबादमधील आपल्या उच्चायुक्त कार्यालयातील २५ कर्मचारी मागे घेतले. भारताने ६० वर्षांहून अधिक काळ जपलेला इंडस वॉटर करार रद्द केला आणि अटारी-वाघा सीमेवरचा एकात्मिक तपासणी चौकी बंद केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे ला राष्ट्राला संबोधित करताना ‘ऑपरेशन सिंदूर’ला मोठे यश मिळाल्याचं सांगितले. त्यांनी म्हटले की, “आता दहशतवादी हल्ल्यांना युद्धाचा दर्जा दिला जाईल आणि त्याला भारताकडून कठोर प्रत्युत्तर मिळेल.” 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter