भारताने UN मध्ये पाकिस्तानला खडसावले, अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावरून काढले वाभाडे!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) भारताने पाकिस्तानला चांगलेच धारेवर धरले. पाकिस्तानमधील हिंदू, शीख आणि ख्रिश्चन अल्पसंख्याकांच्या दयनीय स्थितीवर बोट ठेवत, भारताने पाकिस्तानचा ढोंगीपणा जगासमोर उघड केला. दुसऱ्यांच्या देशातील मानवाधिकारावर बोलण्यापूर्वी पाकिस्तानने आधी स्वतःच्या घरात डोकावून पाहावे, अशा शब्दात भारताने सुनावले आहे.

जिनिव्हा येथे सुरू असलेल्या मानवाधिकार परिषदेच्या सत्रात, भारताने आपल्या 'राईट ऑफ रिप्लाय'चा (Right of Reply) वापर करत पाकिस्तानच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले. भारतीय प्रतिनिधीने सांगितले की, "पाकिस्तानमध्ये दरवर्षी हजारो अल्पसंख्याक मुलींचे अपहरण करून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर आणि विवाह लावले जातात. ईशनिंदा कायद्याचा (Blasphemy Law) वापर करून अल्पसंख्याकांना हेतुपुरस्सर लक्ष्य केले जाते आणि त्यांना तुरुंगात डांबले जाते."

भारताने पुढे म्हटले की, "ज्या देशात अल्पसंख्याकांची मंदिरे, गुरुद्वारा आणि चर्च दिवसाढवळ्या तोडली जातात, त्या देशाने दुसऱ्यांना मानवाधिकाराचे ज्ञान देऊ नये. पाकिस्तानने भारताविरुद्ध द्वेषपूर्ण प्रचार करण्यापेक्षा आपल्या देशातील अल्पसंख्याकांना सुरक्षा आणि न्याय देण्यावर लक्ष केंद्रित करावे."

पाकिस्तानने या सत्रात भारताविरोधात काही निराधार आरोप केले होते, ज्याला उत्तर देताना भारताने ही आक्रमक भूमिका घेतली. भारताच्या या सडेतोड उत्तरामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे.