AI ठरेल भारत-अमेरिका भागीदारीचा नवा पाया; राजदूत विनय क्वात्रांचे प्रतिपादन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा
अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा

 

भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्याचा आगामी टप्पा प्रगत आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित असेल, असे अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये प्रामुख्याने जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकंडक्टर हे क्षेत्र दोन्ही देशांच्या प्राधान्यक्रमात असतील, असे त्यांनी सांगितले. 

नवी दिल्लीत आयोजित 'यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम'च्या (USISPF) लीडरशिप समिटमध्ये ते बोलत होते. जागतिक कंपन्यांसाठी उत्पादन आणि पुरवठा साखळीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी भारत हे सध्या जगातील सर्वात पसंतीचे ठिकाण बनले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

धोरणात्मक क्षेत्रांमधील गुंतवणूक आणि आर्थिक उद्दिष्टे
भारताने सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वच्छ ऊर्जा आणि संरक्षण उत्पादन यांसारख्या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढवली असून जागतिक मूल्य साखळीतील आपली भूमिका मजबूत केली आहे. भारताच्या आर्थिक वाटचालीचा आलेख मांडताना राजदूत क्वात्रा म्हणाले की, सध्या ४.३ ट्रिलियन डॉलर्सची असलेली भारतीय अर्थव्यवस्था या दशकाच्या अखेरीस ७ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल. 

एवढेच नव्हे तर, २०३० च्या दशकाच्या मध्यापर्यंत हा आकडा १४ ट्रिलियन डॉलर्सवर आणि स्वातंत्र्यशताब्दी वर्ष म्हणजेच २०४७ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था २५ ते ३० ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला आहे. जागतिक भू-राजकीय अनिश्चितता आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांच्या काळात भारत हा जागतिक आर्थिक वाढीचा एक अपरिहार्य आधारस्तंभ ठरला आहे.

आत्मनिर्भर भारत जागतिक कल्याणासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून देशात झालेल्या आर्थिक सुधारणांमुळेच भारताचा विकासदर सात टक्क्यांहून अधिक राहिला असून, या विकासाला देशांतर्गत मागणीमुळे मोठी गती मिळत आहे. सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेचा उल्लेख करताना क्वात्रा यांनी स्पष्ट केले की, हे धोरण केवळ देशांतर्गत मर्यादित किंवा संकुचित विचार करणारे नाही. 

उलट, याद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील अशा लवचिक पुरवठा साखळीची आणि उत्पादन व्यवस्थेची निर्मिती केली जात आहे. भारताची आर्थिक प्रगती आता जागतिक समृद्धीशी जोडली गेली असल्याने आंतरराष्ट्रीय भागीदारीचे महत्त्व पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढले आहे.