पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. या हल्ल्याच्या पहिल्या स्मृतिदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत ठाम संदेश दिला आहे. भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादासमोर कधीही गुडघे टेकणार नाही आणि दहशतवाद्यांचे भयंकर मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, असा स्पष्ट इशारा त्यांनी बुधवारी दिला.
पाकिस्तानस्थित 'लष्कर-ए-तैयबा' या दहशतवादी संघटनेने गेल्या वर्षी याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे भ्याड हल्ला केला होता. या प्राणघातक हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. यात प्रामुख्याने देशभरातून आलेल्या पर्यटकांचा समावेश होता.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट करत या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. "गेल्या वर्षी याच दिवशी पहलगाममधील भयंकर दहशतवादी हल्ल्यात निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावले. आज त्यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो. देश त्यांना कधीही विसरणार नाही," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या कठीण प्रसंगात आपण मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत, अशी भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
"एक देश म्हणून आपण सर्वजण या दुःखात आणि आपल्या संकल्पात एकजुटीने उभे आहोत. भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांचे हे भयंकर मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Remembering the innocent lives lost in the gruesome Pahalgam terror attack on this day last year. They will never be forgotten. My thoughts are also with the bereaved families as they cope with this loss.
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2026
As a nation, we stand united in grief and resolve. India will never bow to…
पहलगामच्या या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' ही धडक लष्करी मोहीम हाती घेतली. या धडक कारवाईत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ आणि लष्करी पायाभूत सुविधा संपूर्णपणे उद्ध्वस्त केल्या होत्या.