मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल आज?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 20 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनी आज निकाल येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात मुंबईतील एनआयए विशेष न्यायालय आज निकाल सुनावू शकते. या प्रकरणातील मुख्य आरोपी भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर आहेत. साध्वी व्यतिरिक्त, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितसह ७ आरोपी आहेत, ज्यांच्यावर दहशतवादी कट रचणे, खून करणे, धार्मिक उन्माद पसरवणे असे आरोप आहेत.

या प्रकरणात, विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी सर्व आरोपींना ३१ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विशेष न्यायालयात हा निर्णय आल्याने, संकुलातील इतर न्यायालयांना त्या दिवशी इतर खटल्यांची सुनावणी पुढे ढकलण्यास किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करण्यास सांगितले आहे.

संपूर्ण प्रकरण काय?
सुमारे १७ वर्षांपूर्वी, २९ सप्टेंबर २००८ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय १०० हून अधिक लोक जखमी झाले. रमजानमध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना मोटारसायकलमध्ये स्फोट करण्यात आला. त्यामुळेच जखमींची संख्या जास्त होती.

हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, ३० सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी ३०७, ३०२, ३२६, ३२४, ४२७, १५३-अ, १२०ब, स्फोटके कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

मोटारसायकल माजी खासदाराच्या नावावर
सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता, नंतर संपूर्ण तपास एटीएसकडे सोपवण्यात आला. एलएमएल फ्रीडम (MH15P4572) क्रमांकाच्या बाईकमध्ये स्फोट झाल्याचे उघड झाले. या बाईकमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. तथापि, गाडीवर सापडलेला नंबर चुकीचा होता आणि त्याचा चेसिस नंबर आणि इंजिन नंबर देखील खोडून काढण्यात आला होता.

या प्रकरणाच्या तपासात, एफएसएल टीमला गाडीचा अचूक नंबर सापडला, ज्यामुळे ही गाडी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावावर असल्याचे उघड झाले. घटनेनंतर सुमारे एक महिन्यानंतर, साध्वी प्रज्ञा ठाकूरसह आणखी २ जणांना अटक करण्यात आली. संपूर्ण प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आली, तर साध्वी प्रज्ञा यांना या प्रकरणात मुख्य आरोपी बनवण्यात आले.

साक्षीदारांनी जबाब बदलले
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात, पोलिस, एटीएस आणि एनआयएने तपास केला आहे. संपूर्ण खटल्याच्या सुनावणीदरम्यान, ३०० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले, मुख्य खटल्यातील साक्षीदारांनी न्यायालयात जबाब बदलले. संपूर्ण खटल्याच्या सुनावणीला जवळजवळ १७ वर्षे झाली आहेत. आतापर्यंत या प्रकरणात ३५ साक्षीदारांनी जबाब बदलले. साक्षीदारांनी न्यायालयात अनेक वेळा सांगितले आहे की बंदुकीच्या धाकावर धमकी देऊन त्यांचे जबाब घेण्यात आले. वारंवार आणि जबाब बदलणाऱ्या साक्षीदारांवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. तथापि, आज १७ वर्षांनंतर न्यायालय या प्रकरणावर निकाल देऊ शकते.

मालेगाव प्रकरणात केव्हा काय घडलं?
२९ सप्टेंबर २००८: मालेगावमध्ये बॉम्बस्फोट, ६ जण ठार, १०० हून अधिक जखमी

ऑक्टोबर २००८: महाराष्ट्र एटीएसने तपास सुरू केला, साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह अनेक जणांना अटक

२००९: तपास एनआयएकडे सोपवला

२०११: एनआयएने पहिले आरोपपत्र दाखल केले.

२०१६: एनआयएने साध्वी प्रज्ञा आणि इतर ६ जणांविरुद्ध नवीन आरोपपत्र दाखल केले, पुराव्याअभावी मकोका रद्द केला

२०१७: सर्वोच्च न्यायालयाने कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर केला.

२०१७: न्यायालयाने साध्वी प्रज्ञा यांनाही जामीन मंजूर केला.

२०१८: मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने या प्रकरणात आरोप निश्चित केले.

२०१९: साध्वी प्रज्ञा लोकसभा निवडणूक जिंकल्या, भोपाळमधून खासदार झाल्या.

२०२३-२०२४: अनेक साक्षीदारांनी जबाब बदलले, एटीएसवर दबावाचा आरोप

३१ जुलै २०२५: न्यायमूर्ती ए.के. लाहोटी निकाल जाहीर करतील अशी अपेक्षा