नवी दिल्ली
देशात गेल्या चार दशकांपासून थैमान घालणारा सशस्त्र माओवादी हिंसाचार आता अखेरच्या घटका मोजत असून, हिंसाचाराचा हा काळा अध्याय आता संपत असल्याची महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना त्यांनी हा दावा केला. नक्षलग्रस्त प्रदेश आता विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहेत, असे ते म्हणाले.
मात्र, याच वेळी पंतप्रधान मोदींनी देशासमोर एका नव्या वैचारिक धोक्याचा पुनरुच्चार केला. जंगलातील सशस्त्र नक्षलवाद संपत आला असला, तरी 'दिमागी नक्षलवादी' (वैचारिक नक्षलवादी) आता तरुणांची दिशाभूल करण्यासाठी आणि समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी नवीन मार्ग शोधत असल्याचा गंभीर इशारा त्यांनी दिला. हे लोक पूर्वी धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या उच्च स्तरावर आपले बस्तान मांडून होते, असे सांगत अशा विचारसरणीच्या लोकांना ओळखणे आणि त्यांना वेळेसच रोखणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या भाषणात पंतप्रधान मोदींनी देशसेवेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या ३५०० हून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बलिदानाचे स्मरण केले. विकासाच्या प्रवासात अडथळा आणणाऱ्या आणि देशाची प्रगती रोखू पाहाणाऱ्या अशा वैचारिक प्रवृत्तींपासून तरुणांनी आणि समाजाने दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.