पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात पार पडलेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर भारत आणि इटलीने आपल्या राजनैतिक संबंधांना विशेष धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात मंगळवारी रात्री उशिरा पंतप्रधान मोदींचे रोममध्ये आगमन झाले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना औपचारिक लष्करी सन्मान देण्यात आला. दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक आणि नवीन तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यावर सविस्तर चर्चा केली.
व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात होणार मोठी वाढ
द्विपक्षीय चर्चेपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी इटलीचे अध्यक्ष सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेऊन भारत-इटली मैत्रीच्या विविध पैलूंवर चर्चा केली. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), महत्त्वपूर्ण खनिजे, अंतराळ संशोधन आणि अणुऊर्जा यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमधील सहकार्याचा समावेश आहे. दोन्ही देशांनी 'संयुक्त धोरणात्मक कृती योजना २०२५-२०२९' चा आढावा घेतला, जो आगामी काळातील सहकार्याचा व्यापक रोडमॅप आहे. या दौऱ्यात 'भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर' (IMEC) मजबूत करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
युरोपीय संघात भारत-इटली आर्थिक भागीदारी मजबूत
भारत आणि इटली यांच्यातील आर्थिक संबंध गेल्या काही वर्षांत वेगाने वाढले असून २०२५ मध्ये द्विपक्षीय व्यापार १४.२५ अब्ज युरोवर पोहोचला आहे. यामध्ये भारताची निर्यात ८.५५ अब्ज युरो तर इटलीची निर्यात ५.७० अब्ज युरो राहिली आहे, जी २०२४ च्या तुलनेत ९.४२ टक्क्यांनी अधिक आहे. दोन्ही देशांनी २०२९ पर्यंत वार्षिक द्विपक्षीय व्यापार २० अब्ज युरोवर नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.
इटली हा युरोपीय संघातील भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. विशेष म्हणजे, इटलीमध्ये सध्या १,८६,८३३ हून अधिक भारतीय नागरिक वास्तव्यास असून हा युरोपीय संघातील सर्वात मोठा भारतीय डायस्पोरा आहे, तर ५,१०० हून अधिक भारतीय विद्यार्थी इटलीच्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत.