चेक क्लिअरन्ससाठी आता दिवसभर वाट पाहण्याची गरज नाही, RBI ने आणला नवा नियम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बँक ग्राहकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चेक क्लिअरन्सच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. ४ ऑक्टोबरपासून, एक लाखापेक्षा जास्त रकमेचे चेक त्याच दिवशी क्लिअर होणार आहेत. या नवीन नियमामुळे, चेक वटण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार असून, व्यवहार अधिक जलद गतीने पूर्ण होतील.

आरबीआयने 'चेक ट्रंकेशन सिस्टीम'मध्ये (CTS) हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यापूर्वी, चेक क्लिअर होण्यासाठी दुसऱ्या दिवशीची वाट पाहावी लागत असे. पण आता, नवीन प्रणालीनुसार, बँकांना एकाच दिवसात चेक क्लिअर करण्याची सुविधा मिळणार आहे.

काय आहे नवा नियम?

या नवीन नियमानुसार, बँकांना आता वर्षातील सर्व दिवस, २४ तास चेक क्लिअर करण्याची सुविधा उपलब्ध असेल. ज्या ग्राहकांनी एक लाखापेक्षा जास्त रकमेचा चेक जमा केला आहे, त्यांना आता पैसे मिळवण्यासाठी किंवा देण्यासाठी दुसऱ्या दिवशीची प्रतीक्षा करावी लागणार नाही.

यामुळे केवळ ग्राहकांची सोयच होणार नाही, तर देशातील पेमेंट प्रणाली अधिक कार्यक्षम आणि वेगवान होण्यासही मदत होणार आहे. व्यवसायांसाठी आणि मोठ्या रकमेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे, कारण यामुळे पैशांचा प्रवाह अधिक सुरळीत होईल.

आरबीआयच्या या निर्णयाचे बँकिंग क्षेत्रातून स्वागत होत असून, यामुळे ग्राहकांच्या सेवेचा दर्जा सुधारण्यास मोठी मदत होईल, असे मानले जात आहे.