परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मुख्यालयात एका विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत. हजारो वर्षांपासून गणिताच्या क्षेत्रात भारताने दिलेल्या ऐतिहासिक आणि समृद्ध योगदानावर या प्रदर्शनात प्रकाश टाकला जाईल.
'शून्यापासून अनंतापर्यंत - गणितात भारतीय संस्कृतीचे योगदान' ('From Shunya to Ananta (Zero to Infinity) - The Indian Civilisation’s Contribution to Mathematics') असे या प्रदर्शनाचे नाव आहे. गणिताचा विचार करणे, त्याचा प्रत्यक्ष वापर करणे आणि त्याचा विकास करणे या भारताच्या दोन हजार वर्षांच्या समृद्ध वारशावर यात भर देण्यात आला आहे.
जयशंकर २ ते १० मे दरम्यान जमैका, सुरीनाम आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांच्या अधिकृत दौऱ्यावर होते. त्यानंतर सोमवारी ते न्यूयॉर्कला भेट देणार आहेत. या छोट्या दौऱ्यात ते संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनने (Permanent Mission of India) आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन करतील.
मुख्यालयात आयोजित केलेल्या या प्रदर्शनामुळे संयुक्त राष्ट्रांचे राजदूत, मुत्सद्दी, पर्यटक आणि इतर कर्मचाऱ्यांना भारताचा गणितीय वारसा जवळून पाहता येईल. भारताचे हे योगदान म्हणजे 'मानवतेचा सामायिक वारसा' असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या विशेष प्रदर्शनात आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त आणि भास्कराचार्य यांच्यापासून ते थेट केरळमधील खगोलशास्त्र आणि गणिताच्या परंपरेपर्यंतच्या दिग्गज भारतीय विद्वानांच्या कार्याची दखल घेतली जाईल.
गणिताची व्याप्ती जगभरात पसरलेली आहे. पण या विषयाची निर्मिती आणि पायाभरणी करण्यात भारताचे योगदान अतिशय 'वैशिष्ट्यपूर्ण आणि पायाभूत' राहिले आहे. हीच बाब या प्रदर्शनाच्या माध्यमातून जगासमोर मांडली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.