कर्नूल (आंध्र प्रदेश)
आंध्र प्रदेशातील कर्नूलजवळ बेंगळुरूहून हैदराबादला जाणाऱ्या खासगी बसला आग लागून झालेल्या भीषण दुर्घटनेचे कारण अखेर समोर आले आहे. रस्त्यावर पडलेली एक मोटारसायकल चुकवण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातानंतर, बसमधील इलेक्ट्रॉनिक सामानामुळे ही आग लागल्याचे तपासात उघड झाले आहे. या आगीत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचालकाने रस्त्यावर पडलेली मोटारसायकल चुकवण्यासाठी अचानक ब्रेक दाबला. यामुळे बसमध्ये ठेवलेल्या १२ KV क्षमतेच्या १२ मोठ्या बॅटरी एकमेकांवर आदळल्या आणि त्यातून ठिणग्या उडाल्या. त्याच वेळी, जवळच बॉक्समध्ये ठेवलेले २३४ नवीन स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
ही आग इतकी भीषण होती की, अनेक प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. मृतांमध्ये सहा महिला आणि सहा पुरुषांचा समावेश होता. या दुर्घटनेतून नऊ प्रवासी सुदैवाने बचावले.
बसमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ज्वलनशील इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि बॅटरीची वाहतूक करणे हे नियमांचे उल्लंघन होते का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या दुर्घटनेने पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षेचा आणि ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.