ग़ौस सिवानी
'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा' या अजरामर गीताचे नाव निघताच महाकवी अल्लामा इक्बाल यांचे नाव आपसूक ओठांवर येते. पण या एका प्रसिद्ध कवितेपुरतीच इक्बाल यांची ओळख मर्यादित नाही. कवी असण्यासोबतच ते एक उत्तुंग विचारवंत होते. त्यांची वैचारिक क्षितिजे विविध धर्म, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाच्या परंपरांमध्ये पसरलेली होती. स्वतःच्या धार्मिक चौकटीत राहूनही त्यांनी इतर परंपरांतील उत्तुंग विचारांचा सदैव आदर केला.
इक्बाल यांना 'शायर-ए-इस्लाम' म्हटले जात असले तरी त्यांचे विचारांचे जग खूप मोठे होते. त्यांनी हिंदू, बौद्ध, शीख, इराणी तसेच इस्लामिक तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. प्रभू श्रीराम, गुरु नानक देव आणि स्वामी रामतीर्थ यांच्यावर त्यांनी सुंदर कविता लिहिल्या. आपल्या 'जावेद नामा' या प्रसिद्ध काव्यात त्यांनी भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त आणि झोरोस्टर यांचा अतिशय आदराने उल्लेख केला आहे.
आद्य शंकराचार्य अन् अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रभाव
भारतातील ज्या विचारवंतांनी इक्बाल यांना भुरळ घातली, त्यात आद्य शंकराचार्य यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अद्वैत वेदांताच्या सिद्धांताला सुटसुटीत आणि तर्कशुद्ध रूप देणारे शंकराचार्य हे भारतीय तत्त्वज्ञानातील महान शिखर मानले जातात.
इक्बाल यांनी शंकराचार्यांच्या अद्वैत सिद्धांताची तार्किक ताकद पूर्णपणे ओळखली होती. शंकराचार्यांच्या मते अंतिम सत्य हे 'ब्रह्म' आहे आणि हे दिसणारे जग म्हणजे एक क्षणभंगुर भास आहे. याउलट, इक्बाल यांच्या तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू 'खुद़ी' म्हणजेच आत्मभान हा होता. मानवाचे स्वतःचे एक स्वतंत्र, गतिमान आणि सर्जनशील अस्तित्व असते आणि ते नष्ट न होता अधिक मजबूत झाले पाहिजे, असा इक्बाल यांचा ठाम विश्वास होता.
शंकराचार्यांच्या अफाट बुद्धिमत्तेचा आदर करतानाही, आत्म्याचे अस्तित्व विलीन करण्याच्या विचाराशी इक्बाल सहमत होऊ शकले नाहीत.
.jpg)
अद्वैत, सुफीवाद अन् गीतेचा अन्वयार्थ
आपल्या 'असरार-ए-खुद़ी' या प्रसिद्ध पुस्तकाच्या प्रस्तावनेत इक्बाल यांनी आद्य शंकराचार्य, श्रीकृष्ण आणि रामानुजाचार्य यांच्या विचारांवर मोकळेपणाने भाष्य केले आहे.
तर्कशुद्ध मांडणी करणाऱ्या शंकराचार्यांबद्दल बोलताना ते लिहितात, "ज्या 'असरार-ए-खुद़ी'चा (आत्म्याचे रहस्य) उलगडा श्री कृष्ण, श्री राम आणि रामानुजाचार्य करू इच्छित होते, त्यावर श्री शंकराचार्यांच्या तार्किक मोहिनीने एक पडदा टाकला. परिणामी, श्री कृष्णाचा समाज त्या नवचैतन्याच्या फळांपासून वंचित राहिला."
इसी प्रस्तावनेत त्यांनी शंकराचार्य आणि सुफी संत इब्न अरबी यांच्यातील साम्यही स्पष्ट केले. ते लिहितात, "ज्या दृष्टिकोनातून श्री शंकराचार्यांनी गीतेचा अन्वयार्थ लावला, त्याच दृष्टिकोनातून शेख मुह्यिद्दीन इब्न अरबी अंदालुसी यांनी पवित्र कुराणचा अन्वयार्थ लावला, ज्या व्याख्येने मुस्लिमांच्या मनावर आणि विचारांवर खोल प्रभाव पाडला."
काळाच्या ओघात इक्बाल यांच्या या विचारांमध्ये अधिक परिपक्वता येत गेली. प्रसिद्ध अभ्यासक मैकश अकबराबादी यांनी आपल्या 'नक्द-ए-इक्बाल' पुस्तकात लिहिले आहे की, सुरुवातीला इक्बाल यांना शंकराचार्य आणि इब्न अरबी यांचे विचार एकाच दिशेने जाणारे वाटत होते. पण पुढे शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान 'नफ़ी-ए-खुद़ी'कडे (आत्म्याचा त्याग) नेते, तर इब्न अरबी या जगाला मिथ्या न मानता 'मझहर-ए-हक़' (ईश्वराचे रूप) मानतात, हा फरक त्यांनी स्पष्टपणे ओळखला.
काश्मीरचे तत्त्वज्ञान अन् विचारांची देवाणघेवाण
आद्य शंकराचार्य हे आठव्या शतकातील महान अध्यात्मिक गुरु मानले जातात. त्यांनी संपूर्ण भारतात प्रवास करून ज्ञानचर्चा केल्या आणि अध्यात्मिक पीठांची स्थापना केली. काश्मीर हा त्यांच्या परंपरेशी जोडलेला एक महत्त्वाचा प्रदेश होता. त्या काळात काश्मीर हे संस्कृत भाषा, तत्त्वज्ञान आणि अध्यात्मिक शोधाचे मोठे केंद्र होते.
काश्मीरच्या भूमीत आधीपासूनच काश्मिरी शैव तत्त्वज्ञानाची समृद्ध परंपरा होती. अद्वैत वेदांत आणि काश्मिरी शैव परंपरा या दोन्ही अद्वैतावर भर देतात, तरीही त्यांच्या अंतिम सत्याच्या कल्पनेत फरक आहे. शंकराचार्य ब्रह्माला आकारहीन आणि गुणरहित मानतात, तर काश्मिरी शैव परंपरेत शिवाला सर्वोच्च चेतना मानले जाते.
या पार्श्वभूमीवर इक्बाल यांनी शंकराचार्यांच्या विचारांकडे पाहिले. इक्बाल यांच्या 'खुद़ी' सिद्धांतात मानवी इच्छाशक्ती आणि कृतीला महत्त्व आहे, तर शंकराचार्यांचे अद्वैत आत्मा आणि ब्रह्माच्या एकत्वावर भर देते.

मतभेदांमागील परस्पर आदर
अल्लामा इक्बाल आणि आद्य शंकराचार्य वेगवेगळ्या धार्मिक आणि वैचारिक परंपरेतील होते. तरीही अंतिम सत्याचा शोध आणि मानवी आत्म्याचा विकास ही दोघांच्याही चिंतनाची मुख्य ध्येये होती. वैचारिक मतभेद असूनही दुसऱ्या परंपरेतील महानतेचा आदर कसा करावा, हे इक्बाल यांच्या लेखनातून स्पष्टपणे दिसून येते.
इक्बाल यांनी शंकराचार्यांच्या विचारांचा केलेला सखोल अभ्यास हा केवळ तत्त्वज्ञानाच्या इतिहासातील एक संदर्भ नाही. वेगवेगळ्या परंपरांमधील संवाद कसा असावा, याचे ते एक उत्तम उदाहरण आहे. सत्याचा शोध घेताना वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्यातून एकमेकांबद्दलचा आदर कमी होत नाही, हाच संदेश या दोन्ही महापुरुषांच्या वैचारिक भेटीतून आपल्याला मिळतो.