ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या परदेश दौऱ्यानंतर हैदराबादच्या मेट्रो खांबांवर त्यांचे फलक झळकले. बीजेपी खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळासह अल्जीरिया, सौदी अरेबिया, कुवेत आणि बहारीन येथील दौऱ्यातून परतल्यानंतर हे फलक लावण्यात आले.
ओवैसींच्या फलकांवर “दहशतवादाविरुद्ध एकटा योद्धा, पाकिस्तानविरुद्ध एक सत्य, अंतर्गत शत्रू उघड करणारा, भारतासाठी अभिमान” अशी आकर्षक घोषवाक्ये लिहिली आहेत. या शिष्टमंडळाने २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेल्या प्रत्युत्तराची आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती आंतरराष्ट्रीय नेत्यांना दिली, तसंच सीमापार दहशतवादाविरुद्धच्या लढ्यावर प्रकाश टाकला.
अल्जीरियातील दौऱ्यादरम्यान ओवैसींनी पाकिस्तानला “तकफिरिझमचं केंद्र” संबोधत टीका केली. अल्जीरियन माध्यमे, विचारवंत आणि भारतीय समुदायाला संबोधित करताना त्यांनी सांगितलं, “पाकिस्तानातील दहशतवादी गट आणि दाएश, अल-कायदा यांच्या विचारसरणीत काहीच फरक नाही. ते धार्मिक मंजुरी असल्याचं मानतात, जे पूर्णपणे चुकीचं आहे. इस्लाम कोणाच्याही हत्येला परवानगी देत नाही.”
ओवैसींनी पाकिस्तानला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे लिस्टवर पुन्हा टाकण्याची मागणी केली. “दहशतवाद दोन गोष्टींवर टिकतो—ऍन्य आणि पैसा. अल्जीरियाला ‘ब्लॅक डिकेड’चा अनुभव आहे. पाकिस्तानला ग्रे लिस्टवर आणलं तर भारतातील दहशतवाद कमी होईल, हत्या घटतील. २०१८ मध्ये अल्जीरियासह इतर देशांनी भारताला मदत केली होती,” असं ते म्हणाले.
FATF च्या ग्रे लिस्ट ची प्रभावीता सांगताना ओवैसींनी २६/११ चा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवीचं उदाहरण दिलं. “जगात कोणताही देश दहशतवाद्याला तुरुंगात मुलगा होऊ देत नाही. पण लखवीला हे शक्य झालं. पाकिस्तान ग्रे लिस्टवर गेला, तेव्हा त्याची चौकशी वेगाने झाली,” असं त्यांनी नमूद केलं.
“हा फक्त दक्षिण आशियाचा प्रश्न नाही. भारत ही चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. हा रक्तपात दक्षिण आशियात पसरू द्यायचा आहे का? नाही. जागतिक शांततेसाठी पाकिस्तानला नियंत्रित करणं आणि FATF च्या ग्रे लिस्टवर आणणं गरजेचं आहे,” असं ओवैसींनी ठामपणे सांगितलं.