भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्वाधिक काळ अखंड सेवा देणारे लोकनियुक्त पंतप्रधान बनण्याचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष अभिनंदन केले आहे.
नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा ४,३९८ दिवसांचा सलग कार्यकाळाचा विक्रम मोडीत काढला असून, आता ते देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ अखंड सेवा देणारे लोकनियुक्त पंतप्रधान ठरले आहेत.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधानांचे कौतुक केले आहे. हा ऐतिहासिक टप्पा केवळ कार्यालयातील वेळेचे मोजमाप नसून आपल्या राष्ट्रीय विकासाच्या प्रवासातील एका परिवर्तनीय युगाचे प्रतिबिंब आहे, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती पाहिली आहे, असेही उपराष्ट्रपतींनी नमूद केले.
२५ कोटी जनता गरिबीतून मुक्त
पंतप्रधान मोदींच्या कल्याणकारी योजनांचा उल्लेख करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, ज्याप्रमाणे अब्राहम लिंकन यांनी लाखो लोकांना गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त केले, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून २५ कोटींहून अधिक लोकांना अत्यंत गरिबीच्या पाशातून मुक्त केले आहे. यामुळे लाखो कुटुंबांमध्ये नवीन आशा, संधी आणि सन्मान निर्माण झाला आहे.
यासोबतच भारताच्या समृद्ध वारशाचा गौरव करून, विस्मरणात गेलेल्या वीरांचा सन्मान करून, सांस्कृतिक परंपरांचे जतन करून, वसाहतवादी मानसिकतेचा त्याग करून आणि संस्कृतीच्या ओळखीचा अभिमान बळकट करून त्यांनी जनतेमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे, जो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असेही उपराष्ट्रपती म्हणाले.
लोकशाहीचे सक्षमीकरण
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी पंतप्रधानांचा कार्यकाळ हा परिवर्तनात्मक शासन, लोकशाहीचे सक्षमीकरण, आर्थिक वृद्धी, सामाजिक सुधारणा आणि जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढवणारा काळ असल्याचे वर्णन केले आहे.
लोकसभा अध्यक्षांनी पंतप्रधानांचे या मैलाच्या दगडाबद्दल अभिनंदन केले आणि विश्वास व्यक्त केला की, त्यांचे नेतृत्व आगामी वर्षांतही भारताची प्रगती आणि देशवासीयांच्या आकांक्षांना असेच मार्गदर्शन करत राहील.