आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अजमल अन् अनफर फाउंडेशनतर्फे ३ कोटींहून अधिक रुपयांची मदत जाहीर!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
दक्षिण आसाममधील पूरग्रस्तांना मदत करणारे मुस्लिम नेते आणि संघटना
दक्षिण आसाममधील पूरग्रस्तांना मदत करणारे मुस्लिम नेते आणि संघटना

 

आवाज-द व्हॉईस, आसाम 

काळ बनून आलेल्या मान्सूनच्या पुरामुळे अप्पर आसाममधील तीन जिल्हे उद्ध्वस्त झाले आहेत. चराईदेव, शिवसागर आणि जोरहाट जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये घरांच्या छतावरून पाणी वाहताना दिसले. येथील नागरिकांसाठी ही नैसर्गिक आपत्ती पूर्णपणे अकल्पनीय होती. अनेक ठिकाणी पाणी ओसरले असले तरी पूरग्रस्तांसमोरील आव्हाने संपलेली नाहीत. 

पुराच्या पाण्यासोबत आलेल्या चिखल आणि गाळाने पूरग्रस्तांची घरे १ ते २ फुटांपर्यंत गाडली गेली आहेत. पूरग्रस्तांनी घरातील सर्व वस्तू, पशुधन आणि शेतातील पिके गमावली आहेत. पुराच्या संकटानंतर आता पूरग्रस्तांना मोठ्या आर्थिक संकटाची भीती सतावत आहे.

अप्पर आसाममध्ये पुरामुळे झालेली ही दुरवस्था पाहून विविध स्तरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. प्रभावशाली व्यावसायिक, विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत साहित्य पुरवले जात आहे. नुकतेच अजमल फऊंडेशनच्या पुढाकाराने मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी अप्पर आसाममधील पूरग्रस्तांसाठी २ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. अप्पर आसाममधील नागरिकांसह संपूर्ण सोशल मीडियावर मौलाना बदरुद्दीन अजमल यांच्या या महान कार्याबद्दल आभार व्यक्त केले जात आहेत.

त्यानंतर लगेचच अनफर फऊंडेशनने अप्पर आसाममधील पूरग्रस्तांसाठी १ कोटी रुपयांच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. मुश्ताक अनफर यांनी दुबईतूनच पूरग्रस्तांसाठी या मोठ्या मदतीची घोषणा केली. राज्य जमिअतचे अध्यक्ष मौलाना मुश्ताक अनफर यांनी या विशेष पूर मदतीची घोषणा केली आहे.

या मदतीची घोषणा करताना मुश्ताक अनफर म्हणाले, "अप्पर आसाममध्ये निर्माण झालेली परिस्थिती पाहून माझे मन अत्यंत दुःखी झाले आहे. आमचे एक पथक २० लाख ते २५ लाख रुपयांचे मदत साहित्य घेऊन येत्या एक-दोन दिवसांत अप्पर आसाममध्ये पोहोचेल. मात्र, पूर ओसरल्यानंतर अधिक भीषण परिस्थिती निर्माण होईल, हे लक्षात घेऊन आम्ही सुमारे १ कोटी रुपयांची मदत देणार आहोत. माझी प्रकृती उत्तम राहिल्यास येत्या १ महिन्याच्या आत मी स्वतः तेथे जाईन."

विशेष म्हणजे, अनफर फऊंडेशन आणि राज्य जमिअतच्या संयुक्त विद्यमाने या १ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप केले जाईल. दुबईत असतानाही आपल्या जन्मभूमीतील पूरग्रस्तांची दुरवस्था पाहून मुश्ताक अनफर भावूक झाले. पुराचा थेट फटका बसलेल्या भागांमध्ये अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधांचे वाटप केले जाईल. या संकटाच्या काळात अनफर फऊंडेशनने दाखवलेल्या तत्परतेचे स्थानिक नागरिकांनी मनःपूर्वक कौतुक केले आहे.

दुसरीकडे, इस्लामिक विद्वान मौलाना नुरुल अमीन कासिमी हे जन कल्याण डेव्हलपमेंट सोसायटीच्या पुढाकाराने पूरग्रस्तांसाठी कपडे आणि मदत साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचले आहेत. शिवसागर, संतोक आणि इतर भागांतील महिला व मुलांना त्यांनी स्वतः कपड्यांचे वाटप केले. चराईदेव जिल्ह्यातील संतोक येथील पूरग्रस्तांमध्ये कपडे आणि मदत साहित्य वाटप केल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, "हे लोक पूर्वी आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, परंतु आता ते पूर्णपणे असहाय्य झाले आहेत."
 

या महाप्रलयाच्या काळात शिवसागर येथील एका गुरुद्वाराने मानवतेचे अप्रतिम उदाहरण सादर केले आहे. मानवाची सेवा हाच सर्वोत्कृष्ट धर्म आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. शिवसागर जिल्ह्यातील २०० पूरग्रस्त कुटुंबांना 'शिवसागर गुरुद्वारा साहेब' या गुरुद्वाराने आपल्या छत्रछायेत आसरा दिला आहे. याशिवाय पूरग्रस्तांसाठी दररोज ३ वेळच्या भोजनाची मोफत सोय या गुरुद्वाराकडून केली जात आहे.

उल्लेखनीय म्हणजे, पुराचे पाणी ओसरल्यानंतरही अप्पर आसाममधील तीन जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये संकट टळलेले नाही. पुराच्या पाण्यासोबत आलेल्या चिखल आणि गाळामुळे पूरग्रस्तांच्या घरातील सर्व साहित्य खराब झाले आहे. घरांच्या आत गुडघाभर चिखल साचला आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आणि सर्वत्र पसरलेली दुर्गंधी यामुळे पूरग्रस्त नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. 

याशिवाय, पशुधन आणि शेतातील पिके पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे पूरग्रस्तांना दीर्घकाळ आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल, अशी भीती सुजाण नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter