दिन आणि दुनिया : 'उम्मत ही केवळ धार्मिक नव्हे तर एक सामाजिक संकल्पना'
Story by आवाज़ मराठी | Published by Bhakti Chalak • 6 h ago
डावीकडून इतिहासकार साकिब सलीम आणि इस्लामी अभ्यासक अब्दुल मजीद अझहरी
इराण, अमेरिका, इस्रायल आणि आखाती देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. जर सर्व मुस्लिम एकाच 'उम्मत'चा भाग असतील, तर मग या देशांमध्ये मतभेद आणि संघर्ष का निर्माण होतात? हा प्रश्न राजकारण, विचारधारा आणि धर्माशी जोडलेला आहे.
सामान्यतः उम्मत म्हणजे कधीही न तुटणारी एकता आहे असा समज असतो, परंतु प्रत्यक्ष जगातील वास्तव वेगळे आहे. 'आवाज-द व्हॉईस'च्या 'दीन और दुनिया' या विशेष पॉडकास्टमध्ये साकिब सलीम यांच्याशी संवाद साधताना प्रख्यात इस्लामी अभ्यासक अब्दुल मजीद अझहरी यांनी या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली.
अब्दुल मजीद अझहरी यांच्या मते, उम्मत ही एक व्यापक आणि लवचिक चौकट आहे. ही केवळ धार्मिक ओळख नसून ती एक सामाजिक आणि सामूहिक वास्तविकता आहे. कुराणमध्ये 'उम्मत' हा शब्द अनेक वेळा आला असून प्रत्येक वेळी संदर्भानुसार त्याचा अर्थ बदलतो. कधी तो धार्मिक गटासाठी वापरला जातो, तर कधी सामाजिक किंवा राजकीय घटकासाठी.
मदिना येथील सुरुवातीच्या इस्लामी राज्याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, तिथे मुस्लिम, ज्यू आणि ख्रिश्चन एकाच राजकीय व्यवस्थेचे अविभाज्य भाग म्हणून एकत्र राहत होते. यावरून हे स्पष्ट होते की उम्मतची संकल्पना केवळ धार्मिक एकतेपुरती मर्यादित नसून ती एक प्रत्यक्ष सामाजिक रचना आहे. 'उम्मत-ए-मुस्लिमा' या शब्दाचा अर्थ श्रद्धेवर विश्वास ठेवणारे सर्व मुस्लिम असा होतो. हा बंध प्रामुख्याने आध्यात्मिक स्वरूपाचा असून तो लोकांची मने जोडण्याचे आणि बंधुत्वाची भावना जोपासण्याचे काम करतो.
मात्र, या आध्यात्मिक बंधनाचा अर्थ राजकीय एकीकरण असा होत नाही, असे अझहरी यांनी स्पष्ट केले. जगातील विविध देशांमध्ये राहणारे मुस्लिम आपापल्या देशातील व्यवस्था, संविधान आणि राजकीय चौकटीला बांधील असतात. त्यामुळे उम्मत-ए-मुस्लिमाकडे जागतिक राजकीय व्यवस्था म्हणून पाहणे चुकीचे ठरेल; त्याऐवजी तो एक नैतिक आणि आध्यात्मिक समाज आहे असे समजणे अधिक योग्य आहे.
अझहरी यांच्या मते, कलमा हे एक वैचारिक आणि आध्यात्मिक बंधन असून त्याला भौगोलिक मर्यादा नाहीत. एखादी व्यक्ती भारत, इराण किंवा इतर कोणत्याही देशात राहत असली तरी त्यांची श्रद्धा एकाच पायावर उभी असते. या पायामुळे मुस्लिमांमध्ये एक आंतरिक नाते निर्माण होते. मात्र, मानवाचे नाते भौतिक वास्तवाशीही असते. ते एका विशिष्ट देशाचे, समाजाचे आणि संस्कृतीचे भाग असतात. त्यामुळे केवळ कलमाच्या आधारावर राजकीय व्यवस्था उभी करणे प्रत्यक्ष जगात शक्य नाही.
या चर्चेतून हे स्पष्ट झाले की, भौगोलिक सीमा इस्लामच्या विरोधात नसून त्या मानवी समाजाची नैसर्गिक गरज आहेत. मदिना येथील व्यवस्थेपासून ते खिलाफतीच्या विविध कालखंडांपर्यंत भौगोलिक सीमा नेहमीच अस्तित्वात होत्या. सुव्यवस्था राखण्यासाठी, सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि सामूहिक जीवनाच्या स्थिरतेसाठी या सीमा अपरिहार्य आहेत. अझहरी यांच्या मते, खरा प्रश्न सीमांचा नसून त्यामधील व्यवस्थेचा आहे. जर व्यवस्था न्यायावर आधारित असेल तर या सीमा विधायक भूमिका बजावतात; मात्र जिथे अन्याय होतो, तिथे याच सीमा संघर्षाचे कारण बनतात.
इस्लामचा खरा आत्मा न्याय हाच आहे. कुराणच्या शिकवणुकीनुसार, सर्वोत्तम उम्मत तीच आहे जी चांगल्या गोष्टींचा प्रसार करते आणि वाईट गोष्टींना रोखते. याचा अर्थ असा की, उम्मतची संकल्पना कोणत्याही प्रकारच्या अन्यायाचे किंवा अत्याचाराचे समर्थन करत नाही. अगदी एखादा मुस्लिम अन्याय करत असेल, तरी त्याला पाठिंबा देणे योग्य नाही; उलट एका चांगल्या मुस्लिमाने त्याला रोखले पाहिजे आणि त्याची चूक सुधारली पाहिजे. हीच विचारधारा उम्मत या संकल्पनेला उच्च नैतिक स्थानावर नेते.
या संवादातून उपखंडातील, विशेषतः भारतातील मुस्लिमांच्या स्वभावावरही प्रकाश टाकण्यात आला. अझहरी यांच्या मते, या भागातील लोकांचे चारित्र्य भावनिक आणि मानवतावादी आहे. ते केवळ धर्माच्या आधारावर नव्हे, तर मानवतेच्या आधारावर प्रतिसाद देतात. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अन्याय झाला की येथील लोक त्याविरुद्ध आवाज उठवतात, मग पीडित व्यक्ती कोणत्याही धर्माची किंवा जातीची असो.
उम्मतमध्ये सुन्नी, शिया, बरेलवी, सल्फी आणि इतर अनेक पंथ असून त्यांच्यात वैचारिक मतभेद असणे ही एक वास्तविकता आहे. मात्र, इतके मतभेद असूनही एक मूलभूत सामायिक श्रद्धा त्यांना एकत्र बांधून ठेवते. अझहरी यांच्या मते, हे मतभेद उम्मतच्या संकल्पनेला धक्का लावत नाहीत; उलट ते विविध दृष्टिकोन असलेल्या लोकांसाठी एक मोठी व्याप्ती निर्माण करतात.
'सारे जहाँ से अच्छा' लिहिणारे कवी इक्बाल यांच्या संदर्भात बोलताना अझहरी म्हणाले की, त्यांनी भौगोलिक सीमांचा पूर्णपणे निषेध केला नव्हता; तर श्रद्धा आणि आध्यात्मिकता कोणत्याही एका क्षेत्रापुरती मर्यादित नसते, हे स्पष्ट केले होते. अझहरी यांच्या मते, 'मानवता' हेच सर्वोच्च मूल्य असून ते सर्व भेदांच्या पलीकडे आहे. धर्म, राष्ट्र आणि राज्याचे स्वतःचे महत्त्व असले तरी, जेव्हा विषय न्याय विरुद्ध अन्यायाचा असतो, तेव्हा मानवतेला प्राधान्य दिले पाहिजे. हेच ते तत्व आहे जे विविध धर्म आणि संस्कृतीच्या लोकांना एकमेकांच्या जवळ आणते.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -