'इस्लाम' या संज्ञेचा शतकानुशतकांचा बदलता प्रवास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
 'वेनिंग क्रेसेंट: द राइज अँड फॉल ऑफ ग्लोबल इस्लाम' या पुस्तकावर आधारित नवी दिल्लीतील एका व्याख्यानात बोलताना ऑक्सफर्डचे विद्वान फैसल देवजी
'वेनिंग क्रेसेंट: द राइज अँड फॉल ऑफ ग्लोबल इस्लाम' या पुस्तकावर आधारित नवी दिल्लीतील एका व्याख्यानात बोलताना ऑक्सफर्डचे विद्वान फैसल देवजी

 

आवाज द वॉयस ब्युरो, दिल्ली

इस्लाम या संकल्पनेची मांडणी ऐतिहासिक संदर्भांनुसार बदलत गेली आहे. इस्लामला संस्कृती, विचारधारा किंवा केवळ एक ओळख अशा विविध प्रकारे समजून घेता येते. ऑक्सफर्डचे विद्वान फैसल देवजी यांनी त्यांच्या 'वेनिंग क्रेसेंट: द राइज अँड फॉल ऑफ ग्लोबल इस्लाम' या नवीन पुस्तकावर आधारित नवी दिल्लीतील एका व्याख्यानात हा विचार मांडला.

पुस्तकाबद्दल बोलताना देवजी यांनी स्पष्ट केले की, आज आपण इस्लामला धर्मशास्त्र, कायदे आणि तत्त्वज्ञान यांनी व्यापलेला एक व्यापक धर्म म्हणून पाहतो. मात्र, इतिहासाकडे पाहिल्यास या शब्दाचे अर्थ काळानुसार वेगळे असल्याचे दिसते.

शतकानुशतके बदलत गेलेला हा प्रवास १९ व्या शतकात एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला. यावेळी इस्लाम एक 'जागतिक विषय' म्हणून उदयास आला. या काळात पारंपारिक राजसत्ता, धर्मगुरू किंवा सूफी संतांच्या प्रभावाशिवाय इस्लामने एक स्वतंत्र अधिकारक्षेत्र प्राप्त केले. हा बदल वसाहती शासन आणि पारंपारिक सत्ताकेंद्रांच्या ऱ्हासाच्या काळात झाला, ज्याचा इस्लामवर खोलवर परिणाम झाला.

बदलता दृष्टिकोन: संस्कृती, विचारधारा आणि ओळख

फैसल देवजी यांनी त्यांच्या कामात इस्लामकडे पाहण्याचे विविध पैलू मांडले आहेत. यामध्ये प्रेषित मोहम्मद (स.) यांच्या अवमानाशी संबंधित वाद (ईशनिंदा), धर्मांतर्गत सार्वभौमत्वाचे प्रश्न आणि २१ व्या शतकातील अल-कायदापासून इसिसपर्यंतच्या दहशतवादी चळवळींचा बदलता कल यांचा समावेश आहे.

व्याख्यानादरम्यान देवजी यांनी इस्लाम समजून घेण्याचे तीन प्रमुख टप्पे सांगितले:

१. संस्कृती (Civilization): वसाहती कालखंडात इस्लामची मांडणी प्रामुख्याने एक संस्कृती म्हणून केली गेली.

२. विचारधारा (Ideology): शीतयुद्धाच्या काळात इस्लामला एक विचारधारा म्हणून समजून घेण्यात आले.

३. ओळख (Identity): शीतयुद्धोत्तर काळात किंवा जागतिकीकरणाच्या युगात इस्लाम प्रामुख्याने एका 'ओळखी'च्या रूपात समोर आला.

देवजी यांच्या मते, मुस्लिमांची ही आंदोलने जगाच्या ऐतिहासिक समजुतीवर आधारित आहेत. १९ व्या शतकाच्या मध्यापासून मुस्लिम विचारवंतांनी स्वतः इस्लामला इतिहासाचा एक स्वतंत्र विषय म्हणून हाताळायला सुरुवात केली, ही बाब अत्यंत रंजक आहे.

आंदोलनाचा प्रत्येक टप्पा हा मुस्लिमांच्या वैयक्तिक गुणांपेक्षा जागतिक घडामोडींशी—म्हणजेच साम्राज्यवाद, शीतयुद्ध आणि शीतयुद्धोत्तर काळाशी जोडलेला होता. देवजी यांनी स्पष्ट केले की, त्यांचे पुस्तक केवळ सूफी संत किंवा पारंपारिक धर्मगुरूंवर लक्ष केंद्रित करत नाही.

एक 'जागतिक विषय' म्हणून इस्लामची कोणतीही एक संस्थात्मक चौकट नव्हती. त्याऐवजी तो एक अशा कथानकासारखा (Narrative) काम करत होता, ज्यावर विविध गट आपला दावा सांगू शकत होते. त्याचे जागतिक स्वरूप त्याला ठराविक धार्मिक किंवा राजकीय चौकटीत अडकून पडण्यापासून रोखत होते—जागतिकीकरणाच्या विश्लेषणातील हाच सर्वात मोठा पेच असल्याचे देवजी यांनी मांडले.

भारतातील संदर्भ आणि आंदोलनांची मुळे

भारताचा संदर्भ देताना देवजी यांनी १९ व्या शतकातील प्रेषितांच्या अवमानावरून झालेल्या आंदोलनांचे विश्लेषण केले. ते म्हणतात की, अशा प्रकारच्या निषेधाची पहिली पाळेमुळे भारतातच आढळतात. १८५० आणि १८७४ मध्ये मुंबईत झालेल्या दंगली ही याची सुरुवातीची उदाहरणे आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हे हिंदू-मुस्लिम संघर्ष नसून पारशी-मुस्लिम संघर्ष होते आणि त्यामागे कोणताही ठोस धर्मशास्त्रीय आधार नव्हता.

त्याऐवजी ही आंदोलने सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्येच्या घटकांमुळे आकाराला आली होती. काही प्रकाशनांनी प्रेषितांचे चुकीचे सादरीकरण केल्यामुळे आपल्या सामूहिक 'मालकी हक्का'ला धक्का बसला आहे, असा युक्तिवाद मुस्लिमांनी केला होता. देवजी सुचवतात की, याच सुरुवातीच्या आंदोलनांनी पुढे १९८९ च्या सलमान रश्दी यांच्या 'सॅटॅनिक व्हर्सेस' सारख्या जागतिक निषेध मोहिमांची पायाभरणी केली.

कायद्याची भाषा आणि भावनांचे राजकारण

वसाहती काळातील कायद्यांनी मुस्लिम निषेधाची भाषा कशी घडवली, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. 'भारतीय दंड संहितेने' (IPC) ईशनिंदेच्या पारंपारिक संकल्पनेची जागा 'धार्मिक भावना दुखावणे' या कायदेशीर संकल्पनेने घेतली. यामुळे हा वाद धर्मशास्त्राकडून 'मानहानी' किंवा बदनामीकडे झुकला.

त्यांनी नमूद केल्याप्रमाणे, यातील मूळ तत्व केवळ इस्लामचे रक्षण करणे नसून सर्व धर्मांच्या भावनांचे रक्षण करणे हे बनले. यामुळे अशा वादांमध्ये धर्मशास्त्रीय युक्तिवादाची मोठी अनुपस्थिती दिसून आली, जे वरवर पाहता पूर्णपणे धार्मिक वाटत होते.

या धर्मनिरपेक्ष कायदेशीर चौकटीत मुस्लिमांनी आपल्या तक्रारी 'दुखावलेल्या भावना', 'कॉपीराइट' किंवा प्रेषितांशी असलेली 'ओळख' या स्वरूपात मांडल्या. अभिव्यक्तीची हीच पद्धत आजही आंदोलनांमध्ये पाहायला मिळते.

शेवटी, देवजी यांनी एका विरोधाभासाकडे लक्ष वेधले. प्रेषितांच्या अवमानावरून होणारी आंदोलने जरी तर्कसंगत कायदेशीर चौकटीत मांडली जात असली, तरी काहीवेळा त्याचे रूपांतर हिंसेत का होते? त्यांनी सुचवले की, जिथे युक्तिवादांमध्ये धर्मशास्त्रीय तर्काचा अभाव असतो, तिथे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भावनिक आणि सामाजिक उद्रेक हिंसेचे रूप घेतात.

देवजी यांनी समारोप करताना सांगितले की, या आंदोलनांमधील ईशनिंदेचे अनेक संदर्भ हे इस्लामिक धर्मशास्त्रापेक्षा ख्रिश्चन कायदेशीर परंपरेतून उसवारीने घेतलेले आहेत. ही उसवारी आधुनिक मुस्लिम आंदोलनांमधील कायदा, भावना आणि ओळख यांच्यातील गुंतागुंतीचे नाते स्पष्ट करते.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter