लखनौ
लखनौच्या अलीगंज भागातील एका तीन मजली व्यावसायिक इमारतीला सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि विविध राजकीय नेत्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करताना जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. संरक्षण मंत्री आणि लखनौचे खासदार राजनाथ सिंह यांनी या घटनेला 'अत्यंत वेदनादायी' असे संबोधले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीगड दौरा अर्धवट सोडून तातडीने लखनौकडे प्रस्थान केले असून, त्यांनी प्रशासन आणि स्थानिक नेत्यांना मदतकार्यात तत्परतेने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेला 'अत्यंत शोकांतिका' असे म्हणत मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट दिली असून, त्यांनी १५ मृतदेह बाहेर काढल्याची माहिती दिली. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अलीगंज परिसरातील उषा मेहता मार्गावर असलेल्या या तीन मजली इमारतीत ही भीषण आग लागली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या ॲनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये अनेक विद्यार्थी अडकले होते, तर त्याच इमारतीत एका पाळीव प्राण्यांच्या क्लिनिकचीही सोय होती. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीच्या भडक्यामुळे जीव वाचवण्यासाठी अनेक विद्यार्थी आणि उपस्थित नागरिकांनी इमारतीतून उड्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, दोषींवर कडक कारवाई आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सुद्धा या घटनेवर चिंता व्यक्त करत मदतकार्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत.