केरळमध्ये 'लैलातुल-कद्र'निमित्त १ लाख भाविकांचा महासागर; मअदिन अकादमीतून दिला जागतिक शांततेचा मंत्र!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
केरळमधील मल्लपुरम येथे ‘मअदिन अकादमी’च्या वतीने आयोजित ‘लैलातुल-कद्र’च्या निमित्ताने जमलेला जनसागर
केरळमधील मल्लपुरम येथे ‘मअदिन अकादमी’च्या वतीने आयोजित ‘लैलातुल-कद्र’च्या निमित्ताने जमलेला जनसागर

 

केरळमधील मल्लपुरम येथे ‘मअदिन अकादमी’च्या वतीने आयोजित ‘लैलातुल-कद्र’च्या निमित्ताने देशभरातून सुमारे १ लाख भाविक एकत्र आले होते. प्रार्थना आणि अध्यात्माचा हा एक अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. संपूर्ण जगासाठी शांतता आणि बंधुभावाची प्रार्थना करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

हा सोहळा दुपारच्या नमाजपासून सुरू होऊन उशिरा रात्रीपर्यंत चालला. ‘अस्मा-उल-बदरिन’ मजलिस आणि तौबा-इस्तगफारच्या सत्रांमध्ये सर्वत्र ‘आमीन’चा आवाज घुमत होता. ५,५५५ स्वयंसेवकांनी इफ्तार आणि सहरीचे उत्तम नियोजन केले होते. या नियोजनामुळे भाविकांना कोणताही अडथळा न येता संपूर्ण कार्यक्रमाचा अनुभव घेता आला.

मअदिन अकादमीचे संरक्षक सय्यद खलील इब्राहिम बुखारी यांनी आपल्या भाषणात जागतिक संकट आणि नैतिक अध:पतनावर चिंता व्यक्त केली. तांत्रिक आणि आर्थिक प्रगती होऊनही आध्यात्मिक आणि नैतिक पोकळीमुळे जगात हिंसाचार, दंगल आणि हुकूमशाही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. रमझानचा संदेश आत्मसात करून जागतिक न्याय आणि नैतिक जाणीव वाढवण्याचे आवाहन बुखारी यांनी लोकांना केले.

भारताचे ग्रँड मुफ्ती शेख अबूबकर अहमद यांनीही यावेळी आपले विचार मांडले. त्यांनी आखाती देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेची खात्री करण्याची आणि समाजातील व्यसनाधीनतेविरुद्ध जागरूकता वाढवण्याची विनंती केली. गरीब आणि निराधार लोकांसोबत आनंद साजरा करणे, मुले आणि महिलांच्या सुरक्षेसाठी राजनैतिक प्रयत्न वेगवान करणे तसेच सामाजिक वाईट प्रथांविरुद्ध सामूहिक संकल्प घेण्यावर त्यांनी भर दिला.

अनेक प्रतिष्ठित विद्वानांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अधिक प्रभावशाली झाला. समस्ता केरळ जमियतुल उलमाचे सचिव अल्लामा अब्दुल कादर, प्राध्यापक ए.के. अब्दुल हमीद आणि इतर विद्वानांनीही आपली मते मांडली. ई. सुलेमान मुसलियार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले, तर दुआचे नेतृत्व सय्यद अली बाफकी तंगल आणि सय्यद खलील बुखारी यांनी केले.

मअदिन अकादमीचा हा उपक्रम केवळ धार्मिक प्रार्थनेपुरता मर्यादित नव्हता, तर तो मानवता, बंधुभाव आणि जागतिक शांततेचा संदेश पसरवणारे एक मोठे व्यासपीठ बनला. ‘लैलातुल-कद्र’ची ही रात्र स्वतःच्या चुकांची माफी मागण्यासोबतच पूर्ण समाज आणि जगाच्या कल्याणासाठी एक प्रेरणादायी संधी ठरली.