पुणे
महिला कुणाच्याही दास्यात नसून त्या स्वतःच्या मालक आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मनस्मृतीमधील महिलांच्या ओळखीसंदर्भातील नियमांवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. महिलांनी प्रत्येक टप्प्यावर पुरुष नातेवाईकांच्या अधीन राहावे, हा मनस्मृतीचा नियम अतिशय लाजीरवाणा असून असे शब्द उच्चारले जायला नको होते, असे ते म्हणाले.
पुण्यात आयोजित 'छत्रों की गंज' या युवा संवाद कार्यक्रमात बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील महिलांच्या अद्वितीय प्रवासावर आणि त्यांच्या स्वप्नांवर भाष्य केले. ते म्हणाले, "मी येथे मनस्मृतीचा उल्लेख करू इच्छितो, ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की बालपणी स्त्रीने वडिलांच्या, तरुण वयात पतीच्या आणि पतीच्या मृत्यूनंतर पुत्रांच्या अधीन राहावे. स्त्री कधीही स्वतंत्र असू नये. हे शब्द अत्यंत लाजीरवाणे आहेत." महिला ही देशाची सर्वात मोठी संपत्ती असून त्यांनी स्वतःसाठी उभे राहिले पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
तरुणांशी संवाद साधताना राहुल गांधी पुढे म्हणाले की, "तुम्ही स्वतःच्या व्यतिरिक्त कोणाच्याही मालकीच्या नाही. तुमचे वडील, भाऊ, पती किंवा मुलाशी नाते असू शकते, पण तुम्ही त्यांच्या मालकीच्या नाही, तर तुम्ही स्वतःच्या मालक आहात." आपण येथे कोणतेही राजकारण किंवा भाषण करण्यासाठी नाही, तर तरुणांच्या भावना ऐकण्यासाठी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिला निसर्गातच पुरुषांपेक्षा अधिक संवेदनशील, दयाळू आणि दूरदर्शी असतात, असे सांगत त्यांनी महिलांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर भर दिला. अनेकदा महिलांना केवळ मुलगी, पत्नी किंवा आई या मर्यादित ओळखींमध्येच अडकवले जाते, मात्र त्यांची ओळख केवळ या नात्यांपुरतीच सीमित राहू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.