समान नागरी कायदा (UCC) तयार करताना प्रत्येकाला विश्वासात घेतले पाहिजे आणि त्यातून कोणतेही मतभेद निर्माण होऊ नयेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी केले. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित एका कार्यक्रमातील संवाद सत्रादरम्यान ते बोलत होते.
भारत आणि अमेरिका यांच्यात अलीकडेच झालेल्या व्यापार करारावर भाष्य करताना भागवत म्हणाले की, व्यवहारांमध्ये नेहमीच देण-घेण असते. "हा करार दोन्ही बाजूंचा फायदा करून देणारा असावा. यामध्ये आपले नुकसान होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल." हिंदुत्ववादी विचारवंत वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, सावरकरांना हा पुरस्कार दिल्यास या सन्मानाची प्रतिष्ठा अधिक वाढेल.
संघाच्या 'अच्छे दिन'बद्दल बोलताना भागवत यांनी स्पष्ट केले की, स्वयंसेवकांचे कठोर परिश्रम आणि वैचारिक धोरणांप्रती असलेल्या कटिबद्धतेमुळेच संघाला हे दिवस पाहायला मिळत आहेत.