तृतीयपंथीयांचे मानवीकरण व्हावे - दिशा पिंकी शेख

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 9 Months ago
दिशा पिंकी शेख
दिशा पिंकी शेख

 

"तृतीयपंथीयांचे दैवीकरण झाले. ते बंद झाले पाहिजे. त्यांचे मानवीकरण व्हावे. आमचा तृतीयपंथीय, किन्नर किंवा हिजडा असा उल्लेख केल्यापेक्षा साहित्यिकांनी समतेवर आधारित शब्द शोधून काढावा", असे आवाहन तृतीयपंथीय सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख यांनी केले. प्रगतिशील लेखक संघ आणि मराठी विभाग, देवगिरी महाविद्यालयात झालेल्या 'माझे लेखन माझी भूमिका' या सदरात शेख यांनी आपल्या समूहाचे दाहक वास्तव मांडले.

अध्यक्षस्थानी प्रा. दिलीप महालिंगे होते. प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शेख म्हणाल्या, "लिंगभेद नको. तृतीयपंथीयांवर सतत बलात्कार होतात. मात्र, त्याला वाचा कोण फोडणार? अनेकांच्या हत्या केल्या जातात. मात्र, कँडल मार्च निघत नाही; कारण तृतीयपंथीय कुणाची अस्मिता होत नाही. तृतीयपंथीयांनी राजे आणि राण्यांचे अंगरक्षक म्हणून मोलाची कामगिरी बजावली असा इतिहास आहे. आम्ही अस्पृश्य आहोत का? मानव हक्क अभियान आमच्यापर्यंत पोचले नाही याचा खेद वाटतो.