बकरी ईद २०२५ : महाराष्ट्रात रक्तदान सप्ताहातून मानवतेचा जागर

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 5 d ago
मुस्लिम सत्यशोधक मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
मुस्लिम सत्यशोधक मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

 

बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहा, हा मुस्लिम समाजाचा एक पवित्र सण आहे. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचे प्रतीक आहे. यंदा ७ जूनला जगभरात बकरी ईद मोठ्या उत्साहाने साजरी झाली. अशा पद्धतीचे धार्मिक सण अधिक लोकाभिमुख व्हावेत यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक मुस्लिम सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून समाजहिताचा एक अनमोल संदेश दिला आहे. 

रक्तदान हे जीवनदान मानले जाते. एक युनिट रक्त तीन जणांचे प्राण वाचवू शकते. रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा ही एक गंभीर समस्या आहे. अपघात, शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार किंवा प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज भासते. अशा वेळी रक्तदान हा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा कर्तव्याचा भाग आहे. बकरी ईदच्या पवित्र प्रसंगी मुस्लिम समाजाने रक्तदानासारखा उपक्रम हाती घेऊन कुर्बानीच्या भावनेला व्यापक अर्थ दिला आहे. कुर्बानी फक्त प्राण्यांचा बळी देण्यापुरती मर्यादित नसून, समाजासाठी स्वत:ला अर्पण करण्याची भावना असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवले. 

महाराष्ट्रातील मुस्लिम सामाजिक संस्थांनी या सणाला सामाजिक बांधिलकी जोडली आहे. या उपक्रमांतून केवळ मुस्लिम समाजच नव्हे, तर इतर धर्मीय लोक सुद्धा आपले योगदान देत आहेत.  बकरी ईदच्या निमित्ताने रक्तदानासारखे उपक्रम राबवून मुस्लिम समाजाने मानवतेची सेवा आणि सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ‘राज्यव्यापी रक्तदान सप्ताह’
धार्मिक सद्भाव, वैज्ञानिकता आणि मानवता वृद्धिंगत करण्यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने बकरी ईदनिमित्त राज्यस्तरीय रक्तदान अभियान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच मरणोत्तर अवयव आणि देहदान करण्याचा संकल्प व जनजागरण कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.

राज्यभरातील विविध शाखांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पुणे, कोल्हापूर, सातारा, रायगड, जळगाव, लातूर, नंदुरबार, सासवड अशा अनेक शहरांमध्ये हा उपक्रम पार पडला आहे. तर अनेक शहरांमध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संयुक्त विद्यमाने एकत्रितपणे शिबिरांचे आयोजन केले होते. या अभियानात केवळ मुस्लिमच नाही तर सर्वधर्मीय लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला.   

पुणे 
मुस्लिम सत्यशोधक मंडळाने आयोजित केलेल्या ‘राज्यस्तरीय रक्तदान सप्ताह’ उपक्रमाला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी (७ जून) पर्वती पायथा येथील राष्ट्र सेवा दल, बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सकाळी १०:३० ते दुपारी २:३० या वेळेत भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. धार्मिक सौहार्द, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतेच्या मूल्यांना जपत या शिबिरात रक्तदानासह मरणोत्तर अवयव आणि देहदान संकल्पाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.
 

मुस्लिम सत्यशोधक मंडळाने गेल्या १५ वर्षांपासून बकरी ईदच्या निमित्ताने रक्तदान शिबिरे आयोजित करून पारंपरिक पशू कुर्बानीला मानवतावादी पर्याय सुचवला आहे. यंदाही शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सर्वधर्मीयांचा समावेश होता. रक्तदानाच्या माध्यमातून जीवन वाचवण्याचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात मंडळ यशस्वी ठरले. स्थानिक रक्तपेढ्यांच्या सहकार्याने संकलित रक्त शासकीय आणि खासगी रुग्णालयांतील गरजू रुग्णांसाठी वापरले जाणार आहे. मरणोत्तर अवयव आणि देहदान संकल्प कार्यक्रमाने वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न केला, ज्याला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी शिबिराच्या यशस्वितेबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “बकरी ईदचा त्याग आणि बंधुत्वाचा संदेश रक्तदानासारख्या उपक्रमातून प्रत्यक्षात उतरतो. शासनाच्या नियमांचे पालन करत आणि धार्मिक तणाव टाळत हा सण समाजाभिमुख साजरा करणे गरजेचे आहे.” त्यांनी सर्वधर्मीय सहभागाबद्दल आनंद व्यक्त करत अशा उपक्रमांना भविष्यातही प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. रक्तदान आणि अवयव दानाच्या संकल्पाने पुण्यातील नागरिकांनी मानवतेचा आदर्श प्रस्थापित केला. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. 
 
सासवड
ईद-उल-अजहाच्या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील सासवड येथील आचार्य अत्रे भवनात रविवारी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या विद्यमाने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला मुस्लिम आणि मुस्लिमेतर नागरिकांसह समाजातील कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकार, नगरसेवक, आणि विविध संघटनांचा मोठा सहभाग लाभला. 

बकरी ईदच्या निमित्ताने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यामागचा हेतू सासवडच्या मुस्लिम समाजाने स्पष्ट केला. 'मुस्लिम समाज बकऱ्याच्या कुर्बानीबरोबरच या देशासाठी आपल्या रक्ताचीही कुर्बानी देऊ शकतो,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने या शिबिरातून धार्मिक सणांना सामाजिक आणि वैज्ञानिक स्वरूप देण्याचा संदेश दिला आहे. भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा मंडळाचा मानस असल्याचे प्रा. नसरीन अन्सारी यांनी सांगितले. तत्पूर्वी हाजी मुबारक शेख यांनी जुमाच्या आणि ईदगाहवरील ईदच्या नमाजवेळी बयान करून नागरिकांना रक्तदान शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन केले. 
 

शिबिरात सासवड नगरीचे माजी नगरसेवक हरून बागवान, ओबीसी संघटनेचे आरिफ आतार आणि पुरंदर काँग्रेस अल्पसंख्याकांचे अध्यक्ष मुबीन बागवान यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक अशोक धिवरे, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी, खजिनदार दिलावर शेख, जेष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार, केजीएन खिदमत फाऊंडेशनचे अध्यक्ष बाप्पु मुलाणी, खजिनदार शकील पानसरे, अबेदा शेख, प्रा. नसरीन अन्सारी, अल्ताप हुसेन, अमन हुसेन, श्रीरूपा, बेनझीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
सातारा 
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लिम सत्यशोधक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे आयोजित ‘रक्तदान सप्ताह’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. सातारा येथील माऊली ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. 

मोहसीन शेख आणि वंदना माने यांनी या शिबिराचे यशस्वी नियोजन केले होते. शिबिरात मोहसीन शेख, श्रेयंषू माने, प्रवीण माने, शामली माने, प्रशांत पोतदार, उदय चव्हाण, इंद्रजीत कदम, डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. प्रदीप झनकर, डॉ. दिपक माने, महादेव इंगळे, शाहरुख शिकलगार, सार्थक पाटील यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकारी अध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले, “बकरी ईदचा त्याग आणि बलिदानाचा संदेश रक्तदानासारख्या मानवतावादी कृतीतून प्रत्यक्षात उतरतो. गेली ११ वर्षे आम्ही हा उपक्रम राबवतोय आणि यंदाही साताऱ्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.” 
 
मुस्लिम सत्यशोधक समाजाचे प्रतिनिधी म्हणाले, “धार्मिक सणांना सामाजिक आणि मानवतावादी स्वरूप देणे हेच खरे सत्यशोधन आहे. रक्तदानातून आम्ही समाजाला जोडण्याचा आणि गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करतो.”

माऊली ब्लड बँकेने या उपक्रमासाठी सातत्याने सहकार्य केले आहे. रक्त संकलनामुळे शासकीय आणि खासगी रुग्णालयांतील गरजू रुग्णांना आधार मिळणार आहे. या शिबिराला हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्मीयांनी दिलेला प्रतिसाद हा सामाजिक ऐक्याचा उत्तम नमुना ठरला. 

नंदुरबार 
पवित्र सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या नंदुरबार शाखेने आयोजित केलेल्या ‘रक्तदान सप्ताह’ उपक्रमाला शनिवारी (७ जून) जिल्हा रुग्णालयात उत्साहपूर्ण सुरुवात झाली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. गेल्या तीन वर्षांपासून नंदुरबारात राबवला जाणारा हा उपक्रम यंदाही मानवता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश घेऊन आला.
 

बकरी ईद हा त्याग आणि कुर्बानीचा संदेश देणारा सण आहे. या सणाच्या मूळ भावनेला अनुसरून, पारंपरिक पशू कुर्बानीला पर्याय म्हणून रक्तदानाचा पर्यावरणपूरक आणि विधायक मार्ग स्वीकारण्याचे आवाहन समितीने केले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष वसंत वळवी  यांनी म्हटले की, “रक्तदान म्हणजे खऱ्या अर्थाने कुर्बानी आहे. यामुळे अनेकांचे प्राण वाचवता येतात आणि समाजात मानवतेचा संदेश पोहोचतो."

जिल्हा रुग्णालयात आयोजित या शिबिरात विभागप्रमुख डॉ. रमा वाडेकर, जयेश सोनवणे आणि कर्मचाऱ्यांनी रक्त संकलनाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. वसंत वळवी, सूर्यकांत आगळे, फिरोज खान, प्रवीणकुमार धांदरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून उपक्रमाला बळ दिले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे प्रधान सचिव बलदेव वसईकर, प्रवीण धनदरे, संदीपकुमार आखाडे, राजू चौधरी, पराग जगदेव, राजेंद्र पिंपळे, मंगेश वाघमारे, सुधीर पानपाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

पनवेल 
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेल शाखा आणि विविध सामाजिक संस्थांनी दारुल अमन ट्रस्टच्या पुढाकाराने नवीन पनवेल येथील दारुल अमन मस्जिदीच्या आवारात भव्य रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. रोटरी ब्लड बँक, क्रिटीकेअर लाईफलाइन हॉस्पिटल पनवेल आणि शंकरा आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने संपन्न झालेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदा २३ जणांनी रक्तदान केले, तर १०० हून अधिक जणांनी आरोग्य आणि नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
 

गेल्या सात वर्षांपासून पनवेलमधील सामाजिक संस्था बकरी ईदच्या निमित्ताने रक्तदान शिबिरे आयोजित करत आहेत. यंदा प्रथमच नेत्र तपासणी शिबिराचा समावेश करून उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्यात आले. यावेळी बोलताना दारुल अमन ट्रस्टचे ए. एम. इनामदार म्हटले की, “एक थेंब रक्त कुणाचे तरी आयुष्य वाचवू शकते. धर्म, जाती आणि वर्गापलीकडे जाऊन मानवतेसाठी रक्तदान करणे हा खरा त्याग आहे." 

या शिबिरात महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरम पनवेल, ए. एफ. टी. ट्रस्ट पनवेल, मक्तब ए नुरुल उलूम, आई समाजकल्याण संस्था वावंजे, संविधान प्रचारक, सर्वोदय, ग्रामस्वराज्य समिती महाराष्ट्र आणि कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन यांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी ए. एम. इनामदार, अल्लाउद्दीन शेख, असिफ कुरेशी, आरती नाईक, बगाडे काका, प्रवीण जठार, बाबासाहेब चिमणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अमरावती 
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहर शाखा अमरावती, विजया फाउंडेशन आणि क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ८ जून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हनुमान नगर, खोलापुरी गेटजवळील अंगणवाडी येथे रक्तदान शिबिराचे यशस्वीरित्या संपन्न झाले. पारंपरिक पशू कुर्बानीला पर्याय म्हणून रक्तदानाच्या माध्यमातून मानवता आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश देणाऱ्या या शिबिरात १३ जणांनी रक्तदान केले.
 
  
शिबिराची सुरुवात प्रथम रक्तदात्याच्या हस्ते वृक्षारोपणाने झाली. त्यातून पर्यावरण संरक्षणाचा संदेशही देण्यात आला. मेळघाट ब्लड बँकेच्या संपूर्ण टीमने रक्त संकलनासाठी मोलाचे सहकार्य केले. या शिबिराला शहरातील आणि परिसरातील नागरिक, संघटनांचे कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधवांनी भेट देत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विजया करोले, हर्षा सगणे, दिलीप लाडे, मो. अफसर शेख हसन, प्रफुल्ल ठाकरे, दिगंबर मेश्राम, प्रफुल्ल कुकडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी विजया करोले प्रतिक्रिया देत म्हणाल्या, “बकरी ईदचा त्याग आणि कुर्बानीचा संदेश रक्तदानासारख्या मानवतावादी कृतीतून प्रत्यक्षात उतरतो. हा उपक्रम समाजाला जोडण्याचा आणि पर्यावरण जपण्याचा एक प्रयत्न आहे,” यावेळी हर्षा सगणे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर विजया करोले यांनी आभार मानले.

कोल्हापूर
बकरी ईदच्या पवित्र सणाच्या निमित्ताने कोल्हापुरातील जवाहर नगर येथील सिरत मोहल्ल्यातील मुस्लिम तरुणांनी एकत्र येत भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाने प्रथमच मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण घालून दिले. सिरत मोहल्ल्यातील विविध तरुण मंडळांनी एकत्र येऊन या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या शिबिरात ८७ युनिट रक्त संकलन झाले. हे रक्त शासकीय रुग्णालयांमधील रक्ताच्या कमतरतेमुळे गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी वापरले जाणार आहे.

या शिबिराचे संयोजन अलम मुजावर, सलीम शेख, अखिल मुजावर, मौलाना मोबीन भगवान, तोफिक मुजावर, हाजी मौसम भाई, मोईनुद्दीन शेख, एजाज मुजावर, शोएब मोमीन, झाकीर शिरोळे, सुफीयान बारस्कर, बागवान जुनेद आणि उबेद यांनी केले. बकरी ईदचा सण हा त्याग आणि परोपकाराचा संदेश देतो. या भावनेला साजेसे रक्तदान शिबिर आयोजित करून तरुणांनी समाजात प्रेम आणि एकतेचा संदेश पसरवला. 

या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत झाले आहे. समाजसुधारक सुरेश शिपुरकर (बाबा) आणि विनय पाटगावकर यांनी या शिबिराचे कौतुक केले. त्यांनी असे उपक्रम मुस्लिम समाजात वारंवार राबवले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. “रक्तदानासारखे उपक्रम समाजात एकता आणि मानवता वाढवतात. सिरत मोहल्ल्यातील तरुणांनी घालून दिलेला हा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी आहे,” असे शिपुरकर म्हणाले. पाटगावकर यांनीही सर्व तरुणांचे अभिनंदन करत अशा उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
 
गोंदवले
गोंदवले येथे ९ जूनला ग्रामपंचायत गोंदवले यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिरात २५ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. गोंदवले गावचे सरपंच जयप्रकाश कट्टे, उपसरपंच संजय माने यांच्या प्रमुख उपस्थितीत दहिवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी शिबिराचे उद्घाटन केले.

गोंदवले मुस्लिम समाजाच्यावतीने गेल्या दहा वर्षांपासून बकरी ईदच्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. “प्रत्येकाला आपला जीव सर्वात प्रिय असतो. म्हणूनच रक्तदान करून गरजूंना जीवनदान देण्याचा हा उपक्रम आम्ही सुरू केला,” असे गोंदवलेच्या मुस्लिम समाजाने सांगितले. 
 

आयुष ब्लड बँक, वडूज यांच्या संचालक रायबोले आणि त्यांच्या टीमने गेल्या दहा वर्षांपासून या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. शिबिरात संकलित रक्त शासकीय आणि खासगी रुग्णालयांतील गरजू रुग्णांसाठी वापरले जाणार आहे.

उद्घाटनप्रसंगी सपोनि दत्तात्रय दराडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. “रक्तदानासारख्या कार्यातून मुस्लिम समाजाने सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा आदर्श घालून दिला आहे,” असे ते म्हणाले. 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter