नवी दिल्ली
२०२७ च्या आगामी क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघाची रणनीती आणि खेळाडूंच्या निवडीबाबत सुरू असलेल्या चर्चेवर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आपली भूमिका मांडली आहे. बीसीसीआय बोर्डरूममधील चर्चा या धोरणात्मक स्वरूपाच्या असतात आणि त्या सार्वजनिक करण्यासाठी नसतात, असे सैकिया यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या क्रिकेट वर्तुळात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या २०२७ च्या विश्वचषकातील सहभागाबाबत मोठी चर्चा सुरू आहे. यावर बोलताना सैकिया यांनी सांगितले की, संघ निवड किंवा खेळाडूंचे भवितव्य यांसारखे निर्णय हे निवड समिती, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संबंधित सर्व भागधारकांच्या समन्वयाने घेतले जातात. "याबाबतच्या बैठका आणि चर्चा ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी कोणत्याही विशेष सत्राची गरज नाही. हे विषय बोर्डरूमपुरते मर्यादित राहणेच हिताचे आहे," असे सैकिया यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
बांगलादेश दौऱ्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, बीसीसीआय खेळावर लक्ष केंद्रित करणारी संस्था आहे. बांगलादेशातील राजकीय परिस्थितीशी बीसीसीआयचा कोणताही संबंध नाही. "भारत सरकार द्विपक्षीय किंवा बहुराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याबाबत जी धोरणे आखते, आम्ही त्याचेच पालन करतो. फुटबॉल किंवा ॲथलेटिक्सप्रमाणेच क्रिकेटमध्येही सरकारचे नियम आम्हाला बंधनकारक आहेत," असे ते म्हणाले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या नवीन नेतृत्वाशी आणि तिथल्या राजकीय परिस्थितीशी बीसीसीआयला काहीही देणेघेणे नसून, नियोजित दौऱ्यांनुसारच बीसीसीआय आपले काम करत राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.