नवी दिल्ली
पश्चिम आशियातील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे भारताने स्वागत केले आहे. नवी दिल्लीत आयोजित 'ब्रिक्स' राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या कराराचे महत्त्व अधोरेखित केले. यामुळे जागतिक ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित होण्यास आणि पुरवठा साखळीतील अडथळे दूर होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
अजित डोवाल यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचे जागतिक व्यापारातील महत्त्व स्पष्ट केले. ही सामुद्रधुनी पुन्हा खुली होणे ही जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची घटना आहे. यामुळे खते आणि रसायनांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीला चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी, रशियाचे एनएसए सर्गेई शोइगु आणि इराणच्या सर्वोच्च सुरक्षा परिषदेचे उपसचिव गदीर निजामीपूर यांच्यासह ब्रिक्स सदस्य देशांचे प्रमुख उपस्थित होते.
ब्रिक्स एनएसए बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना अजित डोवाल यांनी सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. भू-राजकीय अनिश्चितता, आर्थिक ताणतणाव आणि नवनवीन तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी सुरक्षा आव्हाने ही देशांच्या सीमा ओलांडून मोठी झाली आहेत, असे ते म्हणाले. दहशतवादविरोधी सहकार्य आणि सायबर सुरक्षा या विषयांवर ब्रिक्स सदस्य देशांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.
यावेळी इराणच्या प्रतिनिधींनी बैठकीत आपल्या देशावर झालेल्या हल्ल्यांविषयी भाष्य केले, तर सर्व सदस्य देशांनी दहशतवादाचा सर्व प्रकारांत निषेध केला. ब्रिक्स हा देश केवळ आर्थिक सहकार्यासाठी नसून शांतता, प्रगती आणि विकासावर विश्वास ठेवणारी एक विशेष युती असल्याचे डोवाल यांनी नमूद केले. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीतून जागतिक प्रशासनातील सुधारणा आणि बहुपक्षीयतेच्या बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे.