'जब वी मेट'ला अनेक निर्मात्यांनी दिला होता नकार; दिग्दर्शक इम्तियाज अलीने सांगितला चित्रपटाचा रंजक किस्सा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
दिग्दर्शक इम्तियाज अली
दिग्दर्शक इम्तियाज अली

 

बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली याचा २००७ मध्ये आलेला 'जब वी मेट' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. करीना कपूर आणि शाहीद कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. मात्र, हाच चित्रपट इम्तियाज अलीच्या आयुष्यातील सर्वाधिक नाकारली गेलेली स्क्रिप्ट होती, असा मोठा खुलासा खुद्द दिग्दर्शकाने केला आहे. हा चित्रपट आपण केवळ स्वतःच्या मनोरंजनासाठी लिहिला होता आणि तो कधी पडद्यावर येईल असे वाटलेही नव्हते, असे इम्तियाजने स्पष्ट केले आहे.

'जब वी मेट'ची स्क्रिप्ट होती केवळ एक खेळ

इम्तियाज अलीने नुकतीच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत 'जब वी मेट'च्या निर्मितीचा प्रवास उलगडला. आपला पहिला चित्रपट 'सोचा ना था' बनवत असताना रिकाम्या वेळेत त्याने ही कथा लिहिली होती. "ही अशी कथा होती जिचा मला अजिबात अभिमान नव्हता. मी ती केवळ स्वतःच्या मनोरंजनासाठी लिहिली होती. हा चित्रपट बनण्याइतका चांगला आहे असे मला कधीच वाटले नाही. तो माझ्यासाठी केवळ एक वैयक्तिक खेळ होता," असे इम्तियाजने स्पष्ट केले. जेव्हा त्याने ही कथा निर्मात्यांना ऐकवली, तेव्हा अनेक निर्माते आणि अभिनेत्यांनी ती नाकारली. या कथेत कोणताही संघर्ष नाही आणि ती खूप बालिश आहे, अशी कारणे देत लोकांनी त्याला नकार दिला होता.

प्रीती झिंटाला सर्वात आधी आवडली होती कथा

अनेक नकारांनंतर, अभिनेत्री प्रीती झिंटा ही पहिली व्यक्ती होती जिने या कथेवर विश्वास ठेवला. इम्तियाजने जेव्हा तिला ही कथा ऐकवली, तेव्हा रेल्वे स्टेशनवर शाहीदचे पात्र 'आदित्य' गीतला सोडून पळून जातो त्या दृश्यावर ती खूप हसली. "मला वाटले ती मला हसत आहे, पण ती म्हणाली की हे खूप मजेदार आहे. तिला ती कथा खूप आवडली होती," अशी आठवण इम्तियाजने सांगितली. सुरुवातीला या चित्रपटासाठी प्रीती झिंटाचीच निवड होणार होती, पण चित्रपट रखडल्यामुळे शेवटी करीना कपूरला ही भूमिका मिळाली.

एका रात्रीत लिहिले सर्व हिट डायलॉग्स

'जब वी मेट' मधील गीतचे डायलॉग्स, जसे की "मैं अपनी फेवरेट हूँ!" किंवा "बचपन से ही ना मुझे शादी करने का बहुत क्रेझ है", आजही अत्यंत लोकप्रिय आहेत. हे संवाद इम्तियाजने अत्यंत कमी वेळात लिहिले होते. शूटिंगसाठी जागा शोधण्यासाठी ते मनालीला गेले असताना अचानक बर्फवृष्टी सुरू झाली आणि संपूर्ण टीम हॉटेलमध्ये अडकली. त्या एका रात्रीत आणि दिवसात हॉटेलच्या खोलीत बसून इम्तियाजने चित्रपटाचे सर्व संवाद सलग लिहून काढले. वेळेअभावी त्याला ते पुन्हा तपासून पाहण्याची संधीही मिळाली नाही.

करीनाचा सहज अभिनय

करीना कपूरच्या नैसर्गिक अभिनयाने 'गीत' हे पात्र संस्मरणीय बनवले, याचे श्रेय इम्तियाज अली तिला देतो. "ती एक अत्यंत सहज अभिनय करणारी अभिनेत्री आहे. ती दिग्दर्शकासाठी पर्वणी असते. तिला जे काही सांगितले जाते, ते ती पूर्ण ताकदीने करते. अनेकदा मला तिला रोखून धरावे लागायचे," असे तो म्हणाला. भविष्यात करीनासोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त करत, इम्तियाजने तिला 'गीत'पेक्षा वेगळ्या पण तितक्याच चैतन्यशील भूमिकेत पाहण्याची आशा व्यक्त केली.