पॅलेस्टाईन प्रश्नावर भारताची भूमिका स्पष्ट; वाटाघाटीद्वारे 'टू-स्टेट सोल्युशन'ला भारताचा पाठिंबा - श्रीप्रिया रंगनाथन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 6 h ago
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव श्रीप्रिया रंगनाथन आणि पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र मंत्री वारसेन आगाबेकियान शाहीन यांची भेट
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव श्रीप्रिया रंगनाथन आणि पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र मंत्री वारसेन आगाबेकियान शाहीन यांची भेट

 

पॅलेस्टाईन

पॅलेस्टाईनमध्ये वाटाघाटीद्वारे 'टू-स्टेट सोल्युशन' (Two-State Solution) असावे, या आपल्या दीर्घकालीन भूमिकेचा भारताने पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव (कॉन्स्युलर, पासपोर्ट, व्हिसा आणि प्रवासी भारतीय व्यवहार) श्रीप्रिया रंगनाथन यांनी पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र व्यवहार आणि प्रवासी मंत्री वारसेन आगाबेकियान शाहीन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पॅलेस्टाईनी जनतेला भारताचे सातत्यपूर्ण समर्थन असल्याचे स्पष्ट केले.

गाझा पट्ट्यातील सद्यस्थितीवर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. गाझातील मानवतावादी परिस्थिती सुधारण्यासाठी निरंतर मदत, संवाद आणि मुत्सद्देगिरी अत्यंत महत्त्वाची असल्याचे श्रीप्रिया रंगनाथन यांनी अधोरेखित केले. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार इस्रायल आणि पॅलेस्टाईनने शांततेत आणि सुरक्षिततेत एकमेकांच्या शेजारी राहावे, या भारताच्या 'टू-स्टेट' संकल्पनेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

द्विपक्षीय संबंध आणि विकासकामांचा आढावा

या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि पॅलेस्टाईन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा सविस्तर आढावा घेतला. आरोग्य, शिक्षण आणि क्षमता बांधणी (Capacity Building) या क्षेत्रांत भारताने सुरू ठेवलेल्या विकास प्रकल्पांची चर्चा करण्यात आली. पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताकडून मिळणाऱ्या विकास मदत, शिष्यवृत्ती आणि मानवतावादी साहाय्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सचिव श्रीप्रिया रंगनाथन यांचा १६ ते २१ ऑगस्ट या काळातील इजिप्त, पॅलेस्टाईन आणि लेबनॉन हा दौरा भारताचे या प्रदेशातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.