संसदेत महिलांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देण्याच्या प्रक्रियेत एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी महिला आरक्षण बिलाला (Women's Reservation Bill) पाठिंबा देण्यावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना थेट आव्हान दिले आहे.
लोकसभेत १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक फेटाळले गेल्यानंतर रिजिजू यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी काँग्रेसवर थेट आरोप करत म्हटले की, केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी विरोधकांनी या महत्त्वाच्या बिलाला विरोध केला आहे.
हा देशासाठी काळा दिवस "देशातील महिलांना संसदेत आणि विधानसभेत त्यांचा हक्क मिळवून देणारे हे एक ऐतिहासिक बिल होते. याला विरोध करण्याचे कारणच काय असू शकते? हा देशासाठी एक काळा दिवस आहे," अशा शब्दांत रिजिजू यांनी संताप व्यक्त केला.
महिलांच्या हक्कांसाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज होती, पण विरोधकांनी साथ न दिल्याने हे शक्य झाले नाही, असे ते म्हणाले.
महिलांच्या रागाचा करावा लागेल सामना रिजिजू यांनी पुढे इशारा दिला की, "काँग्रेस पक्ष आणि इतर विरोधकांना आता देशातील महिलांच्या रागाचा सामना करावा लागेल. त्यांनी महिलांच्या न्यायाच्या मार्गात जो अडथळा आणला आहे, तो डाग कधीही पुसला जाणार नाही."
त्यांनी स्पष्ट केले की हे बिल मंजूर न होणे हे सरकारचे अपयश नसून, विरोधकांनी मुद्दामहून आणलेला तो एक मोठा अडथळा आहे.
येणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सर्व राजकीय पक्षांना आपले राजकीय मतभेद विसरून या बिलाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. देशातील महिलांना त्यांचा योग्य तो हक्क मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे हीच काळाची मोठी गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.