पुण्यातील कामगाराच्या हत्येवरून ममता बॅनर्जी आक्रमक; महाराष्ट्राकडे केली कारवाईची मागणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे पुरुलियातील २४ वर्षीय स्थलांतरित कामगार सुखेण महातो याच्या हत्येबद्दल तीव्र धक्का आणि संताप व्यक्त केला. बॅनर्जी यांनी ही घटना म्हणजे द्वेषातून केलेला गुन्हा असल्याचे म्हटले आहे. पीडिताला त्याची भाषा आणि ओळखीमुळे लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला असून अशा हल्ल्यांसाठी वाढत्या परकीय द्वेषाच्या वातावरणाला जबाबदार धरले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करून कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, "पुणे, महाराष्ट्र येथे पुरुलियातील बंदवान येथील २४ वर्षीय स्थलांतरित कामगार सुखेण महातो याच्या अमानुष हत्येमुळे मला शब्दांत न मांडता येणारा धक्का बसला आहे आणि मी संतापले आहे. सुखेण हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. हा निव्वळ द्वेषातून केलेला गुन्हा आहे. एका तरुणाची त्याची भाषा, त्याची ओळख आणि त्याच्या मुळांमुळे शिकार करण्यात आली, छळ करण्यात आला आणि त्याची हत्या करण्यात आली. हे सर्व परकीय द्वेषाचे हत्यार म्हणून वापरल्या जाणाऱ्या वातावरणाचा थेट परिणाम आहे, जिथे निर्दोष लोकांना लक्ष्य केले जात आहे." 

बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, "मी गुन्हेगारांना तात्काळ अटक आणि कठोर शिक्षेची मागणी करते. सुखेणच्या कुटुंबाला मी सांगू इच्छिते की, बंगाल या अकल्पनीय दुःखाच्या काळात तुमच्या पाठीशी उभा आहे. न्याय मिळवण्यासाठी कोणतेही प्रयत्न कमी पडू दिले जाणार नाहीत."

दुसरीकडे, सोमवारी भाजप नेते दिलीप घोष यांनी पश्चिम बंगाल सरकारवर राज्यातील हिंदूंचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. महिलांवरील वाढते अत्याचार आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. 

कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना घोष म्हणाले की, "आज बंगालमध्ये ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत, महिलांवरील अत्याचार, विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले आणि जेव्हा आम्ही आमचे कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा पोलीस आमचे झेंडे काढून टाकतात. पोलीस आणि गुंड मिळून हे काम करत आहेत. हिंदू समाजाला या परिस्थितीत ढकलले जात आहे." 

घोष पुढे म्हणाले की, "आता बंगालमध्ये मुर्शिदाबादमधून मालदामध्ये हिंदू स्थलांतर करत आहेत. त्यामुळे हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदूंना स्वतःला पुढे यावे लागेल आणि त्यांचे रक्षण करेल असा नेता निवडावा लागेल."

पश्चिम बंगालमध्ये या वर्षाच्या उत्तरार्धात विधानसभा निवडणुका होणार असल्याने येथील राजकारण तापले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेससमोर भारतीय जनता पक्षाचे मोठे आव्हान आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा भाग असूनही काँग्रेस किंवा इतर कोणत्याही मित्रपक्षासोबत अद्याप युतीची चर्चा सुरू केलेली नाही.