सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही राज्यातल्या हिंदू संघटनांकडून होणाऱ्या, भावना भडकवणाऱ्या भाषणांवर राज्य सरकार नियंत्रण ठेवू शकलं नाही. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाचा अवमान झाला असल्याने सरकारविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाने सरकार षंढ असल्याची टीका करत सुनावलही आहे.
धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांच्या मुद्द्यावरुन आज सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. मुंबईतल्या हिंदू जन आक्रोश रॅलीविरोधातली एक सुनावणी आज पार पडली. यावेळी न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकार षंढ आहे, ते काहीच करत नाही, त्यामुळंच हे सगळ काही होत आहे, अशा भाषेत सुनावल आहे.
ज्यावेळी राजकारण आणि धर्म वेगळे होतील, तेव्हा हे सगळं थांबेल. राजकारण्यांनी धर्म आणि राजकारण वेगळं करायला हवं, असंही न्यायमूर्ती जोसेफ म्हणाले आहेत.
न्यायमूर्ती जोसेफ म्हणाले की, तेढ निर्माण करणारी भाषा एक दुष्टचक्र आहे. यावर लोक प्रतिक्रिया देणारच. हे थांबवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं. कायदा तुम्हाला धर्मासंबंधी मोर्चा काढण्याची परवानगी देतो. पण कायदा तोडण्याची परवानगी देत नाही.
अशा मोर्चांमधून अल्पसंख्याक समाजाला कमीपणा दाखवणारी वक्तव्यं केली जात आहे, त्यांना पाकिस्तानला जाण्यास सांगितलं जात आहे, अशी चिंताही न्यायालयाने व्यक्त केली आहे.