अंत्योदय अन्न योजना: कुटुंबाऐवजी आता प्रति व्यक्ती ७ किलो धान्य; केंद्र सरकारचा मोठा प्रस्ताव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
अंत्योदय अन्न योजनेतील नियमांत बदल; आता कुटुंबाऐवजी प्रति व्यक्ती ७ किलो धान्य मिळणार
अंत्योदय अन्न योजनेतील नियमांत बदल; आता कुटुंबाऐवजी प्रति व्यक्ती ७ किलो धान्य मिळणार

 

नवी दिल्ली

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत (AAY) मिळणाऱ्या धान्याच्या वाटपाच्या पद्धतीत बदल करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मांडला आहे. सध्या या योजनेत प्रत्येक कुटुंबाला दरमहा ३५ किलो धान्य मिळते. मात्र, आता हा नियम बदलून 'प्रति व्यक्ती ७ किलो' धान्य देण्याचा विचार केला जात आहे. या बदलामुळे मोठ्या गरीब कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, २०१३ मध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावित 'राष्ट्रीय अन्न सुरक्षा (दुरुस्ती) विधेयक, २०२६' वर नागरिकांकडून १३ जुलैपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.

सध्याच्या नियमातील त्रुटी

सध्याच्या नियमानुसार, अंत्योदय योजनेतील कुटुंबांना कुटुंबाचा आकार कितीही मोठा असला तरी दरमहा ३५ किलो धान्य मिळते. याउलट, प्राधान्य गटातील (Priority Households) कुटुंबांना प्रति व्यक्ती ५ किलो धान्य दिले जाते. यामुळे मोठ्या अंत्योदय कुटुंबांना मिळणारे धान्य आणि प्राधान्य गटातील कुटुंबांना मिळणारे धान्य यामध्ये मोठी तफावत होती. ही विषमता दूर करण्यासाठी सरकार आता ही नवीन रचना आणत आहे.

नवीन प्रस्तावाचा फायदा

नवीन रचनेनुसार, दोन सदस्यांचे कुटुंब असेल तर त्यांना १४ किलो धान्य मिळेल. पाच किंवा त्यापेक्षा जास्त सदस्यांचे कुटुंब असेल तर त्यांना सध्याच्या ३५ किलोच्या मर्यादेपर्यंत धान्य दिले जाईल. सरकारचा हा बदल अन्न आणि पोषण सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने उचललेले पाऊल आहे. सध्या अंत्योदय आणि प्राधान्य गटातील कुटुंबांना तांदूळ आणि गहू मोफत दिले जातात. सरकार आता या प्रक्रियेला मानवी जीवनचक्र दृष्टिकोनातून अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर बनवण्याचा प्रयत्न करत आहे.