Iran US War : LPG संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सुन्नी मुस्लिमांच्या शिष्टमंडळाने घेतली इराणच्या दूतांची भेट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 9 h ago
डावीकडून इराणचे महावाणिज्य दूत महामहीम मोतलाख आणि महाराष्ट्र राज्य हज समितीचे माजी अध्यक्ष हाजी इब्राहिम शेख
डावीकडून इराणचे महावाणिज्य दूत महामहीम मोतलाख आणि महाराष्ट्र राज्य हज समितीचे माजी अध्यक्ष हाजी इब्राहिम शेख

 

मुंबई,

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे भारतात संभाव्य एलपीजी (घरगुती गॅस) संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुंबईतील लब्बैक एज्युकेशनल वेल्फेअर कमिटीने मानवतावादी आणि आर्थिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाठवले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्य हज समितीचे माजी अध्यक्ष हाजी इब्राहिम शेख यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ बुधवारी मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासात पोहोचले. या शिष्टमंडळात प्रामुख्याने मौलाना, उलेमा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. त्यांनी इराणचे महावाणिज्य दूत महामहीम मोतलाख यांची भेट घेऊन त्यांना एक औपचारिक निवेदन सादर केले.

 
सादर केलेल्या निवेदनात सध्या सुरू असलेल्या संघर्षाचा भारतावर होणारा परिणाम, विशेषतः एलपीजी पुरवठ्यातील व्यत्यय आणि सागरी व्यापारी मार्गांमधील अडचणींबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. शिष्टमंडळाने महावाणिज्य दूतांच्या नुकत्याच झालेल्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि या युद्धाच्या मानवतावादी परिणामांबाबत सखोल चर्चा केली.

संस्थेच्या वतीने बोलताना इब्राहिम शेख यांनी इराणी प्रशासनाला तातडीने युद्धविराम करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यामुळे निष्पाप लोकांचा जीव वाचवता येईल आणि प्रादेशिक स्थिरता टिकून राहील, असे त्यांनी सांगितले. इराण किंवा प्रभावित क्षेत्रांमध्ये सध्या असलेल्या भारतीय नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
 

परिस्थिती बिघडल्यास भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याची विनंतीही या शिष्टमंडळाने केली. जागतिक तेल आणि वायू वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या भारतीय जहाजांच्या सुरक्षेवर विशेष चर्चा करण्यात आली.

यावर प्रतिसाद देताना महावाणिज्य दूत मोतलाख यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले की, भारतीय नागरिकांची सुरक्षा ही त्यांची प्राथमिकता आहे. भारत आणि इराणमध्ये दीर्घकाळापासून व्यापार आणि सांस्कृतिक संबंध असल्याचे त्यांनी नमूद केले. या कठीण काळात भारतीय नागरिकांना सर्व आवश्यक सहकार्य आणि पाठिंबा दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच हॉर्मुझच्या सामुद्रधुनीसह सर्व सागरी मार्गांवर भारतीय जहाजांना व्यापार सुलभतेसाठी प्रवेश दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 
या संघर्षात प्राण गमावलेल्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि जगात शांतता प्रस्थापित होवो, अशा प्रार्थनेने या बैठकीचा समारोप झाला. महामहीम मोतलाख यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान इब्राहिम शेख यांनी युद्धग्रस्त लोकांसाठी वैद्यकीय मदत देण्याचा प्रस्तावही मांडला.

या शिष्टमंडळात हाजी इब्राहिम गुलाम नबी, हाजी रफिक शेख, शाकीर मन्सुरी, जफर सिद्दीकी, इर्शाद काझी, यासीन कुरेशी, इरफान खान, झियाउद्दीन हुसेन, शाकीर कुरेशी, नासिर खान, रफिक जरीवाला, शॅने नक्वी, चिराग शेख, मुन्ना भाई उस्मान, शेख झिया शेख, रफिक हनीफ शेख, फहीम इब्राहिम शेख यांसह इतरांचा समावेश होता.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter 



Latest News