इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) १९ वा हंगाम २८ मार्चपासून सुरू होण्यासाठी सज्ज झाला आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. गेल्या वर्षी आपले पहिले विजेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहली आणि आरसीबीचा संघ यंदाही वर्चस्व राखण्यासाठी मैदानात उतरेल. या आगामी स्पर्धेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सर्व १० फ्रँचायझींना काही कडक निर्देश दिले आहेत. संपूर्ण हंगामात हे नियम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
क्रिकबझच्या अहवालानुसार, संघांना सामन्याच्या दिवशी सराव सत्रे घेता येणार नाहीत, हा सर्वात मुख्य नियम आहे. प्रत्यक्ष सामन्यासाठी खेळपट्टी आणि विकेट सुरक्षित ठेवणे हा यामागचा मूळ उद्देश आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआय प्रत्येक संघाला सराव क्षेत्रात दोन नेट आणि मुख्य मैदानावर रेंज-हिटिंगसाठी एक साईड विकेट देईल. एकाच वेळी दोन संघ एकाच ठिकाणी सराव करत असल्यास प्रत्येकी दोन विकेट दिल्या जातील.
दुसऱ्या संघासाठी राखीव असलेले सराव क्षेत्र रिकामे असले तरीही, ते वापरण्यास संघांना सक्त मनाई आहे. खेळपट्टीचा वापर मर्यादित राहावा आणि सर्वांना समान संधी मिळावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, सामन्याच्या दिवशी खेळाडूंच्या तंदुरुस्तीच्या चाचण्या (Fitness Tests) घेण्यासही परवानगी नाकारण्यात आली आहे.
खेळाडूंच्या कुटुंबीयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
आयपीएल दरम्यान खेळाडूंच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीबाबतही बोर्डाने स्पष्ट नियम दिले आहेत. संघांना केवळ टीम बसनेच मैदानावर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सराव सत्रांदरम्यान खेळाडूंचे कुटुंबीय आणि मित्रांना मैदानात प्रवेश दिला जाणार नाही. त्यांना केवळ नियुक्त केलेल्या हॉस्पिटॅलिटी एरियामधूनच सराव पाहता येईल.
खेळाडूंना ड्रेस-कोडचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सामन्यानंतर होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभात ऑरेंज आणि पर्पल कॅप निर्देशित केल्यानुसारच परिधान करणे बंधनकारक आहे.