इंग्लंड दौऱ्यासाठी वगळण्यात आल्यानंतर संधी मिळताच आपली क्षमता सिद्ध करत असलेल्या सर्फराझ खानने बुची बाबू क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी १३८ धावांची आक्रमक खेळी साकार केली.
बुची बाबू ही स्पर्धा देशांतर्गत मोसमापूर्वीची महत्त्वाची निमंत्रित स्पर्धा समजली जाते. मुंबई आणि तमिळनाडू संघातील या सामन्या पहिल्या दिवशी मुंबईने ८५ षटकांत पाच बाद ३६७ धावा केल्या.
कर्णधार आयुष म्हात्रे १३ धावांवर बाद झाला असला तरी दुसरा सलामीवीर मुशीर खानने ३० धावा केल्या. त्यानंतर सुवेद पारकरने ७२ धावांची खेळी केली. सर्फराझ खानने ११४ चेंडूंत १० चौकार आणि सहा षटकार मारत १३८ धावा केल्या. इतरांना फलंदाजीची संधी मिळण्यासाठी तो या धावसंख्येवर निवृत्त झाला. त्यानंतर आकाश पारकरने ६७धावा फटकावल्या.
संक्षिप्त धावफलक : मुंबई ५ बाद
३६७ (मुशीर खान ३०, सुवेद पारकर ७२, सर्फराझ खान १३८, आकाश पारकर खेळत आहे ६७, हिमांशू सिंग खेळत आहे २०, सिद्धार्थ एम ३१-१-१२४-२)
ओसवाल, वाळुंज चमकले
दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने छत्तीसगडला २५२ धावांत गुंडाळले. विकी ओसवाल आणि हितेश वाळुंज यांनी प्रत्येकी तीन विकेट मिळवल्या. ऋतुराज गायकवाडने गोलंदाजी केली. त्याने तीन चेंडू टाकत एक विकेट मिळवली. छत्तीसगडकडून अवनिश सिंगने ५२ तर संजीत देसाईने ९३ धावांची खेळी केली. त्यानंतर शुभम अगरवालने ४१ धावांचे योगदान दिले.