लोककलेतून महाभारताची परंपरा जिवंत ठेवणारे पद्मश्री गफरुद्दीन जोगी मेवाती

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
गफरुद्दीन जोगी मेवाती
गफरुद्दीन जोगी मेवाती

 

युनूस अल्वी

 

"हा आनंद अगदी तसाच आहे, जसा एखाद्या मजुराने सकाळी कष्ट करायला जावे आणि संध्याकाळी त्याला त्याची मजुरी मिळावी." हे शब्द त्या कलाकाराचे आहेत ज्याने अर्धशतकाहून अधिक काळ मेवातच्या खडतर वाटांपासून ते सातासमुद्रापार आपल्या कलेचा डंका वाजवला.

भारत सरकारकडून 'पद्मश्री' सन्मानाची घोषणा होताच, अलवरच्या टायगर कॉलनीमध्ये राहणारे ६८ वर्षीय गफरुद्दीन जोगी मेवाती यांचा कंठ दाटून आला. मेवातच्या गावागावांत अनवाणी पायांनी फिरून, भपंग वाजवत पिठाची भिक्षा मागण्याचे ते सर्व प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोर तरळले.

आज त्यांना मिळालेली ही 'मजुरी' भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या 'पद्मश्री'च्या रूपाने त्यांच्यासमोर होती. हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, शतकानुशतके जपलेल्या मेवाती संस्कृतीचा, जोगी समाजाच्या वारशाचा आणि 'भपंग' या वाद्याचा गौरव आहे. हे वाद्य आधुनिकतेच्या गदारोळात कुठेतरी हरवून जाण्याच्या भीतीने काळवंडले होते.

गफरुद्दीन जोगी मेवाती यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे संगीत हे भारताच्या संमिश्र संस्कृतीचे एक असे उदाहरण आहे, ज्याला आजचे जग 'सामायिक संस्कृती' (Syncretism) म्हणते. हरियाणा आणि राजस्थानच्या सीमांना जोडणारा मेवात प्रदेश आपली एक विशिष्ट ओळख जपून आहे.

g येथे जोगी समाज मुस्लीम धर्माचे पालन करत असूनही पिढ्यानपिढ्या महाभारतातील प्रसंग आणि लोककथांचे गायन करत आला आहे. गफरुद्दीन या परंपरेचे सर्वात भक्कम आधारस्तंभ आहेत. ते म्हणतात, "आपल्या भाषेशी, संस्कृतीशी आणि लोककलेशी जोडून राहा, तीच आपली खरी ओळख आहे." त्यांच्यासाठी हा सन्मान मेवातच्या त्या मातीचे कर्ज आहे, ज्या मातीने त्यांना संघर्षाच्या दिवसांत लहानाचे मोठे केले.

राजस्थानच्या दीग जिल्ह्यातील कैथवाडा गावात जन्मलेल्या गफरुद्दीन यांचे बालपण एखाद्या चित्रपटातील संघर्षापेक्षा कमी नव्हते. त्यांचे वडील दिवंगत बुधसिंग जोगी हे स्वतः एक सिद्धहस्त कलाकार होते. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी वडिलांनी गफरुद्दीन यांच्या हातामध्ये 'भपंग' दिले होते.

भपंग हे दिसायला एका लहान डमरूसारखे असते पण त्याला एक तार लावलेली असते; हे वाद्य भगवान शिवाच्या डमरूचेच एक विकसित रूप मानले जाते. हे वाजवणे सोपे काम नाही; यासाठी पोटाचे स्नायू, हाताची बोटे आणि गळ्यातील लय यांचा विलक्षण मेळ साधावा लागतो.

बालपणात वडिलांसोबत गावागावांत फिरणे, चौपालांवर बसणे आणि लोकगाथा ऐकवणे हीच त्यांची पाठशाळा होती. आर्थिक ओढाताण एवढी होती की घर चालवण्यासाठी त्यांना गावागावांत जाऊन धान्य आणि पिठाची भिक्षा मागावी लागत असे. ते दिवस कठीण होते, पण भपंगच्या तालाने त्यांना कधीही खचू दिले नाही.

f गफरुद्दीन जोगी यांच्या कलेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 'महाभारत' गायन. विशेष म्हणजे, एक मुस्लीम कलाकार भगवान श्रीकृष्ण आणि पांडवांची गाथा इतक्या तन्मयतेने आणि शुद्धतेने गातो की ऐकणारा मंत्रमुग्ध होतो.

अलवर आणि आसपासचा परिसर ऐतिहासिकदृष्ट्या 'विराटनगर'शी जोडला जातो, जिथे पांडवांनी आपला अज्ञातवास घालवला होता. गफरुद्दीन जेव्हा या लोककथा मेवाती बोलीत ऐकवतात, तेव्हा इतिहास डोळ्यांसमोर जिवंत होतो. संगीत आणि संस्कृतीला कोणतीही धार्मिक सीमा नसते, हेच त्यांच्या कलेने सिद्ध केले आहे.

त्यांचा हा प्रवास कैथवाडाच्या गल्ल्यांपासून आंतरराष्ट्रीय मंचांपर्यंत कसा पोहोचला, ही सुद्धा एक प्रेरणादायी कथा आहे. १९९२ हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील मोठे वळण ठरले. पहिल्यांदा त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स आणि दुबईसह ६० हून अधिक देशांत त्यांनी भपंगचा आवाज पोहोचवला. लंडनमध्ये राणी एलिझाबेथ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात जेव्हा त्यांनी मेवाती लोकधुनी छेडल्या, तेव्हा परदेशी श्रोतेही त्या जादुई लयीवर डोलू लागले होते. त्यांनी मेवातच्या लोककलेला केवळ मनोरंजनाचे साधन उरू दिले नाही, तर तिला एका 'आंतरराष्ट्रीय ब्रँड'मध्ये रूपांतरित केले.

गफरुद्दीन जोगी मेवाती केवळ प्रदर्शन करणारे कलाकार नाहीत, तर ते लोकसंस्कृतीचे एक 'जिवंत ग्रंथालय' (Living Library) आहेत. त्यांनी आपल्या जीवनकाळात ३००० हून अधिक लोकगीते, दोहे आणि कथा मुखोद्गत केल्या असून त्या जतन केल्या आहेत.

आज जेव्हा लोकसंगीतावर बॉलीवूडचा रंग चढत आहे, अशा काळात गफरुद्दीन यांनी आपल्या कलेचा मूळ बाज जपून ठेवला आहे. त्यांनी आपल्या कलेला सामाजिक प्रश्नांशीही जोडले. कोरोना काळात जेव्हा लोक घाबरलेले होते, तेव्हा त्यांनी आपल्या गाण्यांच्या माध्यमातून जनजागृती केली.

 

स्वच्छता अभियान असो वा साक्षरतेचा प्रसार, त्यांच्या भपंगच्या तालाने नेहमीच समाजाला जोडण्याचे काम केले. गृह मंत्रालयाकडून जेव्हा त्यांना 'पद्मश्री'ची माहिती मिळाली, तेव्हा ते अलवरमध्ये 'वंदे मातरम'च्या १५० व्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात व्यग्र होते.

 

तिथेही ते आपल्या साधनेत लीन होते. फोन आल्यावर सुरुवातीला त्यांना वाटले की कोणीतरी आपली थट्टा करत आहे, पण जेव्हा बातमीची खात्री पटली तेव्हा ते भावूक झाले. त्यांच्यामधील हा साधेपणाच त्यांना मोठे बनवतो. ते या सन्मानाचे श्रेय आपली संपूर्ण मेवात भूमी आणि जोगी समाजाला देतात.

त्यांच्या कुटुंबामध्ये आज आठवी पिढी ही कला पुढे नेत आहे. त्यांचा मुलगा डॉ. शाहरुख खान मेवाती जोगी याने केवळ संगीतच शिकले नाही, तर मेवातच्या संस्कृतीवर पीएच.डी. देखील केली आहे. जिथे अनेक पारंपरिक कला दम तोडत आहेत, तिथे गफरुद्दीन यांचे कुटुंब ही मशाल तेवत ठेवून आहे.

नव्या पिढीला ही कला शिकवण्यासाठी एक समर्पित शाळा सुरू करण्याचे गफरुद्दीन जोगी मेवाती यांचे स्वप्न आहे. सरकारकडून त्यांना जमीन उपलब्ध व्हावी अशी त्यांची इच्छा आहे, जिथे ते नव्या पिढीला भपंग वादन, मेवाती लोकगायन आणि आपल्या पारंपरिक कथांचे शिक्षण देऊ शकतील.

त्यांचे असे म्हणणे आहे की, जर तरुण पिढी आपल्या मुळांशी जोडली गेली नाही, तर ही ओळख पुसली जाईल. 'पद्मश्री' मिळणे हे त्यांच्यासाठी अंतिम ध्येय नसून, शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहणाऱ्या एका प्रवासाची ही नवी सुरुवात आहे. मेवातच्या टेकड्यांमधून निघून राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचलेला हा प्रवास सांगतो की, खरी साधना कधीही वाया जात नाही.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter